सांस्कृतिक मंत्रालय

डिजिटल युगाशी सुसंगत राहण्यासाठी संग्रहालयांची नव्याने पुनर्रचना करण्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांचे आवाहन



केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी 'भारतातील संग्रहालयांची पुनर्कल्पना' या विषयावरील दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन केले

Posted On: 15 FEB 2022 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022

केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी हैदराबाद येथे ‘भारतातील संग्रहालयांची पुनर्रचना’ या विषयावरील दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदेचे उद्घाटन केले. भारत, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधील प्रतिनिधी  15 -16 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या शिखर परिषदेत व्हर्च्युअली सहभागी होत आहेत. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमालाआंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेचे अध्यक्ष अल्बर्टो गार्लिंडिनी, सांस्कृतिक संपत्ती जतन आणि संवर्धन संबंधी अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे महासंचालक वेबर नोडोरो आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहसचिव लिली पांडेया हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी संबोधित देखील केले.

शिखर परिषदेच्या उद्घाटनाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी म्हणाले, “भारत ही समृद्ध सांस्कृतिक वारशाची भूमी आहे आणि तिचे जतन, प्रचार आणि चिरस्थायी बनवणे आवश्यक आहे. मला विश्वास आहे की आपली  संग्रहालये ही उद्दिष्टे साध्य करण्याचे एक अद्भुत माध्यम आहे". “आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना 'विकास आणि विरासतचा' मंत्र दिला आहे. विकासाच्या या दृष्टीकोनातून आपण हे सुनिश्चित करत आहोत की गरीबातील गरीबांना विकासाचे फायदे मिळतील आणि विरासतच्या मदतीने आपण आपल्या अद्भुत वारशाचे रक्षण करू.”

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आणि इथल्या  लोकांचा, संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले, “आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि तो चिरायू करण्याकडे नव्याने समर्पित वृत्तीने लक्ष देत आहोत याचा अभिमान वाटतो. मला विश्वास आहे की आपला गौरवशाली भूतकाळ पुन्हा जिवंत करण्यात संग्रहालये महत्त्वाची भूमिका बजावतील. आज भारतातील 1000 हून अधिक संग्रहालये सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि जतनच नव्हे तर भावी पिढ्यांना शिक्षित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी देशभरातील संग्रहालयांना प्रोत्साहन आणि अद्ययावत बनवण्यात इतर मंत्रालये आणि विभागांची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले, “आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची ओळख करून देण्यासाठी भारत सरकार 10 संग्रहालये देखील विकसित करत आहे आणि वस्त्रोद्योग आणि हस्तकला संग्रहालये, संरक्षण संग्रहालये आणि रेल्वे संग्रहालय यासारख्या विशेष संग्रहालयांना सहाय्य करत  आहे”.

नंतर, माध्यमांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी इथून परदेशात नेलेल्या प्राचीन वस्तू मायदेशात परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जी किशन रेड्डी म्हणाले, चोरीला गेलेल्या किंवा हिरावून घेण्यात आलेल्या 95% प्राचीन वस्तू “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात परत आणण्यात आल्या. 1976 पासून परत आणलेल्या 212 पुरातन वस्तूंपैकी 199 वस्तू 2014 नंतर भारतात परत आणल्या आहेत. यापैकी 157 प्राचीन वस्तू नुकत्याच अमेरिकेतून आणण्यात आल्या आहेत”. ते पुढे म्हणाले, "यातून पुन्हा एकदा विकास आणि विरासतप्रति सरकारची वचनबद्धता दिसून येते".

आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषदेचे अध्यक्ष अल्बर्टो गॅरिअंडिनी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले, “भविष्यातील संग्रहालये आधीच बांधली जात आहेत आणि संग्रहालय व्यावसायिक समुदायांशी नव्याने संबंध निर्माण करत आहेत आणि सांस्कृतिक सहभागाच्या नाविन्यपूर्ण प्रकारांचा वापर करत आहेत. ते पुढे म्हणाले की, संग्रहालये ही सर्वात विश्वासार्ह संस्थांपैकी एक आहे आणि समावेशकता, विविधता आणि वैज्ञानिक माहितीचा प्रसार करण्यासाचे अद्भुत साधन आहेत.

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798607) Visitor Counter : 212


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu