विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते, राष्ट्रीय विज्ञान दिवस (NSD) 2022 च्या ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एकात्मिक दृष्टिकोन’या संकल्पनेचा शुभारंभ
तुकड्या तुकड्यांमध्ये काम करण्याचा काळ संपला; आता सर्वांनी एकात्मिक संकल्पनेवर आधारित प्रकल्पासाठी एकत्रित काम करण्याची गरज
Posted On:
05 JAN 2022 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
केंद्र सरकारमधील, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांशी विविध मंत्रालयांना, वेगवेगळे काम न करता, सामायिक संकल्पनेवर आधारित संयुक्त प्रकल्पासाठी एकत्रित काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली. सिंह यांच्या हस्ते,राष्ट्रीय विज्ञान दिन-2022 या वर्षाची संकल्पना, “शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रासाठी एकात्मिक दृष्टिकोन’ चा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला, डीएसआरआर चे सचिव डॉ शेखर मांडे, सीएसआरआर चे महासंचालक डॉ राजेश गोखले. तसेच विज्ञान तंत्रज्ञान विभाग, जैव तंत्रज्ञान विभाग आणि सीएसआयआर चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विज्ञानात विशेष रस आहे, एवढेच नाही, तर गेल्या सात-आठ वर्षात, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यात, त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे, असेही डॉ सिंह यावेळी म्हणाले.
एकात्मिक दृष्टिकोन या संकल्पनेविषयी बोलतांना ते म्हणाले, की विज्ञानाचे एकात्मिकरण चार स्तंभांवर आधारलेले आहे. ते स्तंभ म्हणजे : - 1) विज्ञानाशी संबंधित सर्व मंत्रालये आणि विभागांनी एकत्रित येऊन, समस्या सोडवण्यासाठी संकल्पना-आधारित दृष्टिकोनानुसार काम करणे.2) विज्ञानाच्या एकात्मिकरणाचा अधिक विस्तार करत, तांत्रिक, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संस्थांनाही त्याच्याशी जोडून घेणे. 3) अतिरिक्त विज्ञान एकात्मिकरण करत, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी मंत्रालये/विभागांशी जोडणे आणि शेवटचा स्तंभ- 4) विस्तारीत विज्ञान-प्रणित दृष्टिकोन ठेवत उद्योग क्षेत्र आणि स्टार्ट अप्स च्याअ सहभागातून शाश्वत भविष्यासाठी कार्य करणे.
येत्या काही दिवसात, राष्ट्रीय विज्ञान परिषद आयोजित करण्याचा आपला विचार असून, त्यात केंद्र तसेच सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशातील सरकारमधील विज्ञान मंत्रालये आणि विभागांचा सहभाग घेतला जाणार आहे. या परिषदेत भारतासमोर असलेल्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करुन विज्ञानाद्वारे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती डॉ सिंह यांनी दिली.
दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. ‘रामन इफेक्ट’ च्या महत्वाच्या संशोधनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. 1986 साली या दिवसाची घोषणा करण्यात आली होती.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय एक नोडल संस्था म्हणून मार्गदर्शन, पाठिंबा आणि समन्वयाचे काम करते.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787728)
Visitor Counter : 224