उपराष्ट्रपती कार्यालय
संसद आणि राज्य विधिमंडळ कामकाजातील आणल्या जाणाऱ्या व्यत्ययाबद्दल उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले तीव्र दु:ख
लोकप्रतिनिधींनी "आदर्श" घालून द्यावा आणि सार्वजनिक जीवनातील स्तर वाढवावा - उपराष्ट्रपतींचे आवाहन
फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FKCCI) द्वारे आयोजित ‘सर एम विश्वेश्वरय्या स्मृती पुरस्कार’ समारंभात उपराष्ट्रपती झाले सहभागी
Posted On:
18 AUG 2021 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2021
संसद आणि राज्य विधिमंडळ कामकाजात आणल्या जाणाऱ्या व्यत्ययाबद्दल भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. लोकप्रतिनिधींनी "आदर्श" घालून द्यावा आणि सार्वजनिक जीवनातील स्तर वाढवावा आणि पुढल्या पिढीसाठी आदर्श घालून द्यावा असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
बंगरुळुच्या एम एस रामय्या संस्था समूहाचे अध्यक्ष श्री एम आर जयराम यांना सर एम विश्वेश्वरय्या स्मृती पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते. संसद तसेच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह काही राज्य विधिमंडळातील वर्तनाचा खालावलेला निचांकी दर्जा पाहून तीव्र दु:ख झाल्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती नायडू यांनी सांगितले.
व्यत्यय आणणाऱ्या काही खासदारांचे वर्तन स्वीकारार्ह नाही. संसद आणि राज्य विधिमंडळे ही मते मांडणे, चर्चा करणे आणि निर्णय घेण्यासाठी आहेत व्यत्यय आणण्यासाठी नाहीत असे ते म्हणाले.
विविध स्तर, पद आणि पातळीवर सभागृह सदस्यांच्या चर्चेचा दर्जा उंचावायला हवा, भविष्यात यात सुधारणा होईल अशी आशा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
सर एम विश्वेश्वरय्या यांच्यासारख्या थोरांकडून प्रेरणा घेत तरुण पिढीने देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी नवोन्मेषी आणि चौकटी बाहेरच्या संकल्पनांसह पुढे यावे असे आवाहन नायडू यांनी केले.
आधुनिक भारताचे महान निर्माते-अभियंता या शब्दात गौरव करत त्यांनी विश्वेश्वरैया यांना आदरांजली वाहिली.
म्हैसूरमधील कृष्णा सागर धरण आणि हैदराबादमधील पूर संरक्षण यंत्रणा यासारख्या पथदर्शक प्रकल्पांच्या संरेखनातील त्यांच्या योगदानाची आठवण उपराष्ट्रपतींनी करुन दिली. श्री विश्वेश्वरैया यांच्या अभियांत्रिकी प्रतिभेचा सन्मान करत दरवर्षी त्यांची जयंती 'अभियंता' दिवस म्हणून आपण साजरी करत असतो असे ते म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी एम एस रामय्या संस्था समूहाचे अध्यक्ष श्री एम आर जयराम यांना सर एम विश्वेश्वरय्या स्मृती पुरस्कार प्रदान केला. श्री जयराम यांनी अतिशय निष्ठेने, समर्पणवृ्तीने, चिकाटीने संस्थेचे रुपांतर शैक्षणिक हबमधे केले याबद्दल नायडू यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Please click here for full speech
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747012)