गृह मंत्रालय

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले, एफ रुस्तमजी यांच्या स्मरणार्थ व्याख्यान देखील दिले


यापूर्वी आपल्या देशासाठी स्वतंत्र संरक्षण धोरणच आखले गेले नव्हते, उत्तम संरक्षण धोरणाविना देशाचा विकासही होऊ शकत नाही आणि लोकशाहीची वाढही होऊ शकत नाही

सीमांचे संरक्षण म्हणजे राष्ट्राचे संरक्षण, ज्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत तो देश सुरक्षित राहू शकत नाही

लवकरच ड्रोन विरोधी प्रणालीसह देशाच्या सीमांवर अधिक प्रमाणात संरक्षण वाढविण्यात  येईल

Posted On: 17 JUL 2021 8:10PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाच्या 18 व्या सन्मान सोहोळ्यात दुर्दम्य साहस, शौर्य आणि वीरता तसेच उत्कृष्ट सेवेसाठी दलातील शूर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. शहा यांनी या वेळी रुस्तमजी यांच्या स्मरणार्थ व्याख्यान देखील दिले. या प्रसंगी, सीमा सुरक्षा दल या विषयावर बावानावाच्या माहितीपटाचे प्रदर्शन देखील करण्यात आले. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सीमा सुरक्षा दलाचे पहिले महासंचालक एफ रुस्तमजी यांना श्रद्धांजली वाहताना शाह म्हणाले की सीमा सुरक्षा दल आणि देशाच्या इतर निम-लष्करी दलांमुळेच भारत जगाच्या नकाशावर स्वतःचे गौरवशाली अस्तित्व टिकवून ठेवू शकत आहे. ते म्हणाले की आजदेखील उणे 45 डिग्री तापमान असुदे, लडाखच्या सीमा असुदेत, वाळवंटातील अतिउष्ण वातावरण असुदे, देशाच्या पूर्व भागातील नदी-नाले, जंगल, पर्वत असुदेत, अशा सर्व टोकाच्या वातावरणांमध्ये जे सैनिक त्यांचे कर्तव्य बजावत आहेत त्या त्यागी, वीर आणि योद्ध्यांना कधीही विसरता येणार नाही. बीएसएफ आणि आपल्या सर्व निमलष्करी सेना देशाच्या सीमांचे संरक्षण करण्याच्या कामी तत्पर आहेत. त्यांच्याचमुळे आज भारत जागतिक नकाशावर ठामपणे आणि तेजस्वीपणे उठून दिसतो आहे असे शाह यांनी सांगितले.

सन 1965 च्या लढाईनंतर भारताच्या सीमावर्ती क्षेत्रातील राज्यांच्या 25 बटालियन एकत्र करून एका बीजाच्या रुपात सीमा सुरक्षा दलाच्या रोपट्याची रुजवात झाली, आज या रोपट्याचा  वटवृक्ष झाला आहे आणि पावणेतीन कोटी सदस्यांचे हे कुटुंब देशाला संरक्षक कवच प्रदान करत आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की युद्धाचा काळ असो वा शांतीचा, बीएसएफ च्या जवानांनी त्यांच्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही. आणि म्हणूनच सीमा सुरक्षा दलातील अनेकांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शाह म्हणाले की सुमारे 7,516 किलोमीटर लांबीची सागरी सीमा आणि 15 हजार किलोमीटर लांबीची भूसीमा यांच्यासह आपल्या देशाला वाटचाल करावी लागली आणि त्याच वेळेस सीमा सुरक्षेच्या विषयामध्ये लक्ष घालून रचना करण्याची आवश्यकता होती, मात्र दीर्घकाळ पर्यंत याबाबतीत साकल्याने विचार झाला नाही. जेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार आले तेव्हा पहिल्यांदाच वन बॉर्डर, वन फोर्सअर्थात एका सीमेसाठी समर्पित एक सुरक्षा दल, हा सिद्धांत स्वीकारण्यात आला आणि त्याचा एक संरचनात्मक आराखडा तयार झाला तसेच यासंदर्भात सर्वांच्या जबाबदाऱ्या देखील निश्चित करण्यात आल्या.

केद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने सीमा भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले. ते म्हणाले की तुलनात्मक पद्धतीने पाहायला गेले तर सीमावर्ती भागात सन 2008 ते 2014 या काळात 3,610 किलोमीटर लांबीचे रस्ते निर्माण झाले तर सन 2014 ते 2020 या कालावधीत 4,764 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात आले.

सन 2008 ते 2014 या काळात 7,270 मीटर लांबीच्या पुलांची निर्मिती झाली तर सन 2014 ते 2020 या कालावधीत हे प्रमाण दुप्पट म्हणजे 14,450 मीटर झाले. वर्ष 2008-14 च्या दरम्यान फक्त एका भूमिगत बोगद्याचे काम झाले, तर वर्ष 2014-2020 च्या दरम्यान सहा नवे भूमिगत बोगदे बांधण्यात आले आणि इतर 19 बोगद्यांचे काम सुरु आहे. आणखी एक महत्त्वाची आकडेवारी सांगताना केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की सीमेवर कुंपण घालण्याच्या प्रकल्पात माकल्या राहिलेल्या जागी  कुंपण घालण्याचा प्रश्न केंद्र सरकारने चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडविला . वर्ष 2022 पर्यंत सर्व सीमेवर कुंपण असेल  अशी ग्वाही त्यांनी दिली.

अमित शाह म्हणाले की केंद्र सरकारने सीमांत भागाचा विकास आणि सीमेवरील  घुसखोरी रोखण्यासाठी देखील खूप योजना सुरु केल्या. त्या अंतर्गत, दोन वर्षांसाठी 888 कोटी रुपयांच्या सीमा विकास योजनांची सुरुवात करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की एका सीमांत विकास उत्सवाची सुरुवात गुजरातमधील कच्छ येथून झाली आहे. यामध्ये,सीमावर्ती भागात सशक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या, या भागातील गावांचा विकास करण्यात आला, सर्व निम-लष्करी दलांना उत्तम वातावरण निर्माण करून दिले, त्यांच्या गरजांचा विचार केला, या भागासाठी रिक्त पदांवर नवीन भर्ती करण्यासारखी कामे झाली आणि अशा सर्व प्रयत्नांतून एका सुनियोजित आराखड्यासह आगेकूच सुरु आहे.

यापूर्वी आपल्या देशासाठी स्वतंत्र संरक्षण धोरणच आखले गेले नव्हते, जे धोरण तेव्हा अस्तित्वात होते ते देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रभावाखाली होते असे देखील केंद्रीय गृह मंत्री म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर याविषयीचे  स्वतंत्र संरक्षण धोरण आखण्यात आले. उत्तम संरक्षण धोरणाविना देशाचा विकासही होऊ शकत नाही आणि लोकशाहीची वाढही होऊ शकत नाही असे ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, सीमांचे संरक्षण म्हणजे राष्ट्राचे संरक्षण आणि ज्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत तो देश सुरक्षित राहू शकत नाही.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अनेक गुप्त भुयारी मार्गांचा शोध लावून त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करून एक खूप उत्तम कार्य केले आहे असे त्यांनी सांगितले. ड्रोनच्या वाढत्या धोक्याविरुद्धची आपल्या देशाची मोहीम खूप महत्त्वाची आहे आणि हा धोका कमी करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि इतर संस्था स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करीत आहेत आणि लवकरच ड्रोन विरोधी प्रणालीसह देशाच्या सीमांवर अधिक प्रमाणात संरक्षण वाढविण्यात येईल असे ते म्हणाले.

सुरक्षा दलांनी केलेल्या अन्य महत्त्वाच्या कार्यांचा उल्लेख करत केंद्रीय गृह मंत्री म्हणाले की सुरक्षा दलांनी 15 अब्ज रुपयांचे मादक पदार्थ पकडले, साडेचार कोटी रुपयांची सोनंचांदी जप्त केली, 15 दहशतवाद्यांना ठार केले आणि सुमारे 2,000 दहशतवादी आणि घुसखोरांना पकडले आहे.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736456) Visitor Counter : 255