पंतप्रधान कार्यालय

विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण

Posted On: 16 JUN 2021 4:20PM by PIB Mumbai

महामहिम, माझे चांगले मित्र राष्ट्रपती मॅक्रॉन,

 मॉरिस लेवी, पब्लिसिस समूहाचे  अध्यक्ष,

जगभरातील सहभागी,

नमस्कार !

सध्याच्या कठीण काळात विवाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन.

या व्यासपीठातून  फ्रान्सची तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते.  भारत आणि फ्रान्स विविध विषयांवर एकत्रितपणे  काम करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल ही सहकार्याची  उदयोन्मुख क्षेत्रे  आहेत.  हे  सहकार्य असेच पुढे वाढत राहणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ आपल्या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला मदत होईल.  

अनेक युवकांनी अतिशय उत्कंठतेने फ्रेंच  खुली टेनिस  स्पर्धा पाहिली. या स्पर्धेसाठी भारताच्या तंत्रज्ञानविषयक  कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसने  तांत्रिक सहाय्य पुरवले. त्याचप्रमाणे अटोस ही फ्रेंच कंपनी भारतात सर्वात वेगवान सुपर संगणक बनवण्याच्या प्रकल्पात सहभागी झाली आहे. फ्रान्सची केपजेमिनी असेल, किंवा भारताच्या टीसीएस आणि विप्रो असतील, आपली आयटी क्षेत्रातील गुणवत्ता  जगातील सर्व कंपन्या आणि नागरिकांना सेवा देत आहे.

मित्रानो,

माझा विश्वास आहे -जिथे पूर्वापार चालत आलेल्या पद्धती अपयशी ठरतात तिथे नवसंशोधन मदत करू शकते. कोविड -19 जागतिक महामारी  जे  आपल्या काळातील सर्वात मोठे संकट आहे , या काळात ते आपण पाहिले आहे. सर्वच देशांचे नुकसान झाले आहे आणि त्यांना भविष्याबद्दल चिंता वाटली आहे. कोविड -19 ने आपल्या अनेक पारंपारिक पद्धतीची जणू परीक्षाच घेतली. मात्र आपल्या बचावासाठी तंत्रज्ञान पुढे सरसावले. नावीन्यपूर्ण संशोधनाचा उल्लेख करताना मला म्हणायचे आहे :

महामारीपूर्वीचे नवसंशोधन

महामारीच्या काळातील नवसंशोधन

जेव्हा मी महामारी पूर्वीच्या  नावीन्यपूर्ण संशोधनाबाबत  बोलतो , तेव्हा मी पूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रगतीचा संदर्भ देतो ज्यानी महामारीच्या काळात आपली मदत केली. डिजिटल तंत्रज्ञानाने आपल्याला सावरण्यात , जोडण्यात , दिलासा देण्यात आणि आनंदी ठेवण्यात  मदत केली.. डिजिटल माध्यमांद्वारे आपण काम  करू शकतो, आपल्या प्रियजनांशी  बोलू शकतो आणि इतरांना मदत करू शकतो. भारताची सार्वत्रिक आणि वैशिष्ट्यपूर्ण  बायो-मेट्रिक डिजिटल ओळख प्रणाली -आधारने   गरीबांना वेळेवर आर्थिक सहाय्य पुरवण्यात मदत केली. आम्ही 80 कोटी लोकांना मोफत अन्न पुरवठा करू शकलो  आणि अनेक  घरांना स्वयंपाकासाठी अनुदानित इंधन  देऊ शकलो. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी भारतात आम्ही स्वयं आणि दिक्षा हे दोन सार्वजनिक डिजिटल शिक्षण कार्यक्रम त्वरित  राबवू शकलो.

दुसरा भाग, महामारीच्या काळातले  नावीन्यपूर्ण संशोधन म्हणजे त्याप्रसंगी मानवता कशी एकजूट होऊन उभी ठाकली आणि महामारी विरोधातील लढा अधिक प्रभावी केला.  यामध्ये आमच्या स्टार्ट-अप क्षेत्राची भूमिका सर्वश्रेष्ठ आहे. मी तुम्हाला भारताचे उदाहरण देतो.  जेव्हा महामारीने आमच्या देशात प्रवेश केला तेव्हा आमच्याकडे चाचणीची  क्षमता आणि मास्क, पीपीई, व्हेंटिलेटर आणि  अशा अन्य गोष्टींची कमतरता होती. ही कमतरता दूर करण्यात आमच्या खासगी क्षेत्राने महत्वाची भूमिका पार पाडली. आमच्या डॉक्टरांनी टेलि-मेडिसिनचा  मोठ्या प्रमाणात अवलंब केला जेणेकरून काही कोविड आणि बिगर -कोविड रुग्णांच्या समस्या व्हर्च्युअली दूर करता येतील.  दोन लसी भारतात तयार केल्या जात आहेत आणि आणखी काही  विकास किंवा चाचणीच्या  टप्प्यात आहेत. सरकारच्या बाबतीत आपल्या स्वदेशी आयटी प्लॅटफॉर्म, आरोग्य-सेतु मुळे संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात मदत झाली.  आमच्या कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मने लाखो लोकांना लस सुनिश्चित करण्यात मदत केली आहे. जर आपण नाविन्यपूर्ण संशोधन केले नसते तर कोविड -19  विरूद्ध आमचा लढा खूपच कमकुवत  झाला असता. आपण हा नाविन्यपूर्ण आवेश सोडून देऊ नये जेणेकरून पुढचे आव्हान उभे ठाकेल  तेव्हा आपण अधिक उत्तम प्रकारे सज्ज राहू. .

मित्रानो,

टेक आणि स्टार्ट अपच्या जगातील भारताची प्रगती सुपरिचित आहे. आमच्या देशात  जगातील सर्वात मोठ्या स्टार्ट-अप परिसंस्थांचा समावेश आहे. अलिकडच्या वर्षांत अनेक नवकल्पना समोर आल्या आहेत.  भारत नवसंशोधक आणि गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करतो.  प्रतिभा, बाजारपेठ, भांडवल , परिसंस्था  आणि खुलेपणाची संस्कृती या पाच स्तंभांवर आधारित भारतात गुंतवणूक करण्यासाठी  मी जगाला आमंत्रित करतो.

भारतीय तंत्रज्ञान प्रतिभा जगभरात प्रसिद्ध आहे. जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी भारतीय तरुणांनी काहींना तंत्रज्ञान विषयक उपाय दिले आहेत. आज भारताकडे 1.18 अब्ज मोबाइल फोन आणि 775 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते आहेत. ही संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. भारतातील डेटा वापर जगात सर्वाधिक  आणि स्वस्त दरात आहे. समाजमाध्यमांचा सर्वाधिक वापर करणारे भारतीय आहेत.एक वैविध्यपूर्ण आणि विस्तृत बाजारपेठ आहे जी आपली वाट पाहत आहे.

मित्रांनो,

देशभरातील अत्याधुनिक सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा उभारून हा डिजिटल विस्तार केला जात आहे. 523 हजार किलोमीटर फायबर ऑप्टिक नेटवर्कने  1,56,000 ग्रामपंचायती आधीच जोडलेल्या आहेत. आगामी  काळात आणखी बऱ्याच जोडल्या जाणार आहेत. देशभरात सार्वजनिक वायफाय नेटवर्क सुविधा सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे भारत नवोन्मेषाची  संस्कृती जोपासण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. अटल नवोन्मेष  अभियानाअंतर्गत 7,500 शाळांमध्ये अत्याधुनिक नवनिर्मिती प्रयोगशाळा  आहेत. आमचे विद्यार्थी परदेशी विद्यार्थ्यांसह अनेक  हॅकाथॉनमध्ये भाग घेत आहेत.यामुळे त्यांना जागतिक प्रतिभा  आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीच्या अत्यंत आवश्यक अशा संधी  प्राप्त होतात.  

मित्रांनो ,

 गेल्या वर्षभरात, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा आल्याचे आम्ही पाहिले आहे. तो बराचसा अजूनही आहे.तरीही, व्यत्यय म्हणजे निराशा असा अर्थ  होत नाही. त्याऐवजी सुधारणा आणि सज्जतेच्या  दुहेरी पायावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. गेल्या वर्षी याच काळात जगात अद्याप  लस संशोधन सुरु होते. आज आपल्याकडे बऱ्याच लसी आहेत.त्याचप्रमाणे आरोग्याच्या पायाभूत सुविधांची आणि अर्थव्यवस्थांची सुधारणाही आपण सुरूच ठेवली पाहिजे.

आम्ही भारतात खाण, अंतराळ , बँकिंग, अणु उर्जा वगैरे सर्व क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात सुधारणा राबवल्या. यावरून से दिसून येते की, अगदी महामारीच्या मध्यावरही भारत परिवर्तनाभिमुख आणि क्रियाशील राष्ट्र आहे. आणि जेव्हा मी म्हणतो - सज्ज  - म्हणजे :पुढील महामारीपासून आपल्या वसुंधरेला सुरक्षित ठेवले पाहिजे  पर्यावरणीय र्‍हास थांबविणारी शाश्वत जीवनशैली यावर आम्ही  लक्ष केंद्रित करण्याचे  सुनिश्चित करीत आहोत.  संशोधन आणि नवोन्मेषला  पुढे नेण्यासाठी सहकार्य मजबूत करीत आहोत.

मित्रांनो, 

आपल्या ग्रहासमोरील आव्हानांचा सामना केवळ सामूहिक भावनेने आणि मानवी केंद्रित दृष्टिकोनाने केला जाऊ शकतो, त्यासाठी मी स्टार्ट अप समुदायाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. स्टार्ट-अप च्या अवकाशात  तरुणांचे वर्चस्व आहे. हे लोक भूतकाळाच्या ओझ्यापासून  मुक्त आहेत. जागतिक  परिवर्तनात त्यांना उत्तम स्थान आहे. आपल्या स्टार्ट अप्सने आरोग्यसेवा, पर्यावरणस्नेही  तंत्रज्ञानासह कचरा पुनर्प्रक्रिया, शेती, शिकण्याची नवी साधने यांसारख्या क्षेत्रात  संशोधन  केले पाहिजे. 

मित्रांनो.

एक मुक्त समाज आणि अर्थव्यवस्था आणि  आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी वचनबद्ध राष्ट्र म्हणून भारतासाठी भागीदारी  महत्त्वाची आहे. फ्रान्स आणि युरोप हे आमचे महत्वाचे भागीदार आहेत. मे महिन्यात पोर्तो येथे झालेल्या युरोपियन युनियनच्या  नेत्यांसमवेत झालेल्या शिखर परिषदेत अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी माझा संवाद झाला तेव्हा स्टार्ट-अप्सपासून क्वांटम कंप्यूटिंगपर्यंत डिजिटल भागीदारी ही प्रमुख प्राधान्य ठरली. इतिहासाने हे सिद्ध केले आहे की , नवीन तंत्रज्ञानाचे नेतृत्व आर्थिक सामर्थ्य , रोजगार आणि समृद्धी आणते.मात्र आपल्या भागीदारीच्या माध्यमातूनदेखील मानवतेच्या सेवेचा उदात्त हेतू  साध्य करण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. ही महामारी  केवळ आपल्या कणखरपणाचीच नाही तर आपल्या कल्पनाशक्तीचीही परीक्षा आहे.  ही सर्वांसाठी अधिक समावेशक, काळजीवाहक आणि शाश्वत भविष्य घडविण्याची संधी आहे. ते भविष्य साध्य करण्यात मदत करण्यासाठी, अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या प्रमाणे विज्ञानाच्या सामर्थ्यावर आणि नवनिर्मितीच्या शक्यतांवर माझा विश्वास आहे.

***

MC/Sushma/Sonal/DY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1727848) Visitor Counter : 270