उपराष्ट्रपती कार्यालय

सार्वजनिक जीवनात मूल्ये टिकवून ठेवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


चर्चेचा दर्जा घसरणे म्हणजे लोकशाहीची घसरण : उपराष्ट्रपती

श्री नायडू यांनी संसदीय कामकाजात वेळेचा विधायक वापर करण्याची केली सूचना

श्री नुकला नरोथम रेड्डी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे केले उद्घाटन

Posted On: 27 MAR 2021 4:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 मार्च 2021

 

सार्वजनिक जीवनात मूल्ये टिकवून ठेवायला हवेत असे उपराष्ट्रपती श्री. एम. वेंकैया नायडू यांनी म्हटले आहे. विधिमंडळ आणि संसदेच्या कामकाजात वारंवार येणारा व्यत्यय तसेच चर्चेचा खालावत चाललेला दर्जा याबद्दल त्यांनी  चिंता व्यक्त केली. माजी खासदार आणि हैदराबाद येथील  शिक्षणतज्ज्ञ श्री नुकला नरोथम रेड्डी यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते. श्री नायडू म्हणाले की काही राज्य विधानसभांमध्ये नुकत्याच झालेल्या घटना मन विदीर्ण करणाऱ्या आहेत.  

“व्यत्यय आणि चर्चेचा खालवलेला दर्जा म्हणजे पर्यायाने लोकशाहीची घसरण आणि देशाचीही” असे ते म्हणाले. हे असेच सुरु राहीले तर जनतेचा भ्रमनिरास होईल असा इशाराही त्यांना दिला. श्री नायडू यांनी आठवण करून दिली की संसद आणि विधिमंडळांमधील कामकाजात तीन "डी" यांना खूप महत्व आहे. डिस्कस (संवाद), डिबेट(चर्चा) आणि डिसिजन( निर्णय).  

श्री नरोथम रेड्डी हे संसदेच्या चर्चेत  भाग घेत असत तेव्हा चर्चा कशी करावी या अनुकरणीय गुणवत्तेचे प्रतिबिंब साकारात असे. श्री नायडू यांनी सुचवले की विधिमंडळांमधील प्रतिनिधींच्या वर्तनाने लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित केल्या पाहिजेत. यासाठी त्यांनी विधिमंडळातल्या वेळेचा अधिक विधायक आणि अर्थपूर्ण वापर करण्याची सूचना त्यांनी केली.

उपराष्ट्रपतींनी संबंधित सभागृहात खासदार आणि आमदारांच्या कमी होत चाललेल्या उपस्थितीवरही चिंता व्यक्त केली. सदस्यांनी सभागृहात नियमित उपस्थित राहावे, चर्चेत अर्थपूर्ण योगदान द्यावे या गरजेवर त्यांनी भर दिला. थोर संसदपटू तसेच विधानसभा सदस्यांच्या चर्चेचा त्यांनी अभ्यास करावा अशी इच्छाही उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.

नैतिक मूल्ये, देशभक्ती आणि सार्वजनिक जीवनात प्रगती करण्यासाठी शिक्षणाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. श्री नायडू म्हणाले की शिक्षणाने “परिपूर्ण सर्वंकष व्यक्ती” घडवल्या पाहिजेत. भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, कोणत्याही अन्य देशाला या प्रकारचा फायदा होत नाही आणि देशाच्या प्रगतीसाठी याचा पुरेपूर लाभ घेण्यावर त्यांनी भर दिला.

उपराष्ट्रपतींनी, मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येकाने आपल्या सहभाषकांशी मातृभाषेतून संवाद साधण्याची गरज व्यक्त केली.

शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल दिवंगत श्री नरोथम रेड्डी यांचे कौतुक करत करताना, उस्मानिया विद्यापीठातील प्रशासक म्हणून रेड्डी यांनी केलेल्या कामाचा गौरव केला. विद्यापीठातल्या शिक्षकांना चांगले वेतन मिळावे यासाठी तसेच विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांची आणि मानकांची उन्नती व्हावी यासाठी रेड्डी आग्रही राहिले, असे त्यांनी सांगितले

उपराष्ट्रपती म्हणाले की या प्रकारचे महोत्सव तरुण पिढीला राष्ट्र निर्माणात श्री नरोथम रेड्डी यांच्यांसारख्या महान नेत्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण देत प्रेरणा देतात.

श्री मो. मोहम्मद अली, तेलंगणाचे गृहमंत्री, प्रा. ई. शिवा रेड्डी, शताब्दी उत्सवांच्या आयोजन समितीचे अध्यक्ष, श्री नुक्कला राजेंद्र रेड्डी, संयोजक, आयोजन समिती व इतर यावेळी उपस्थित होते.

 

* * *

Jaydevi PS/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1708056) Visitor Counter : 221