राष्ट्रपती कार्यालय
एकविसाव्या शतकात भारताला जागतिक ज्ञानाधारित महाशक्ती बनविणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एक उद्दीष्ट आहे आणि एनआयटी राउरकेलासारख्या संस्थांनी ही राष्ट्रीय उद्दीष्टे साध्य करण्यासाठी मोठी भूमिका निभावणे आवश्यक आहेः राष्ट्रपती कोविंद
राष्ट्रपतींनी भूषविले एनआयटी राउरकेला च्या 18 व्या वार्षिक पदवीप्रदान समारंभाचे अध्यक्षपद
Posted On:
21 MAR 2021 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2021
एकविसाव्या शतकात भारताला जागतिक ज्ञानाधारित महा शक्ती बनविणे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एक उद्दीष्ट आहे आणि एनआयटी राउरकेलासारख्या संस्थांनी ही राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोठी भूमिका निभावली पाहिजे, असे मत भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केले. ते आज (21 मार्च 2021) ओदिशा मधील राउरकेला येथे एनआयटी राउरकेलाच्या 18 व्या वार्षिक पदवीप्रदान समारंभात बोलत होते.
राष्ट्रपती म्हणाले की, पूर्व भारतातील सर्वात मोठी शासकीय तंत्रज्ञान संस्था म्हणून एनआयटी राउरकेला ने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सहा दशकांहून अधिक काळ, ही संस्था देशातील तांत्रिक व्यवसायिकांचा ओघ वाढवत आहे.
एनआयटी राउरकेलामध्ये संपूर्ण भारतातील आणि इतर देशांचे विद्यार्थी आहेत याकडे लक्ष वेधत राष्ट्रपती म्हणाले की, 700 एकर परिसरातील 7000 हून अधिक विद्यार्थ्यांचा समुदाय समृद्ध विविधतेचे प्रतिनिधित्व करतो. यामुळे शिक्षणाची देवाणघेवाण आणि भिन्न संस्कृतींमधील समजूतदारपणा वाढतो. हे भिन्न राष्ट्रांमधील व्यक्तीमधील परस्पर संबंधही मजबूत करते.
तांत्रिक शिक्षणात महिलांचा कमी सहभाग असण्याचा मुद्दा उपस्थित करीत राष्ट्रपती म्हणाले की, त्यांनी हजेरी लावलेल्या देशभरातील बहुतेक पदवीप्रदान समारंभात कला, मानव्यविद्या, वैद्यकीय विज्ञान, कायदा आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनी सरस असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. तथापि, असे दिसून आले आहे की तांत्रिक आणि वैज्ञानिक शाखांमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतभरातील अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थांमध्ये मुलींचे प्रमाण केवळ 20 टक्के आहे. मुलींना तांत्रिक शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही त्यांनी उज्वल कामगिरी करण्यावर त्यांनी भर दिला.
“कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी” अर्थात सामाजिक उत्तरदायित्वच्या अनुषंगाने “युनिव्हर्सिटीज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात विद्यापीठ’ सामाजिक उत्तरदायित्वाची ’गरज असल्याचे सांगताना राष्ट्रपती म्हणाले की विद्यापीठांनी आणि संस्थांनी त्यांच्या सभोवतालचा समुदाय सक्षम करण्यासाठी योगदान दिले पाहिजे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचा संदर्भ देताना राष्ट्रपती म्हणाले की, अभियांत्रिकी संस्थांनी कला आणि मानव्यविद्यांवर अधिक भर देऊन अधिक सर्वसमावेशक व बहु-शास्त्रीय शिक्षणाकडे वळावे ही या धोरणाची कल्पना आहे.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706481)
Visitor Counter : 117