आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते दीप मार्केट, अशोक विहार येथील जन औषधी केंद्राचे उद्घाटन
सर्व नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि किफायतशीर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2021 7:10PM by PIB Mumbai
जनौषधी दिवसानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज अशोक विहार , दीप मार्केट येथील जनौषधी केंद्राचे उदघाटन केले.

7 मार्च 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते की, जनौषधींचा प्रसार करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी दरवर्षी 7 मार्च हा दिवस हा दिवस जनौषधी दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. 3 ऱ्या जनौषधी दिवसाची संकल्पना '' सेवाही - रोजगारही' असून औषध उत्पादक आणि विक्रेत्यांना अर्थपूर्ण रोजगारासह समाजातील सर्व घटकांना दर्जेदार औषधे मिळण्याची हमी, या संकल्पनेतून अधोरेखित झाली आहे , असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

डॉ. हर्ष वर्धन यांनी माहिती दिली की, आठवडाभर सुरु असलेल्या ' जनौषधी सप्ताह' सोहळ्याचा आज समारोप आहे . जनौषधीबाबत जनजागृती करण्यासाठी , 1 मार्च ते 6 मार्च 2021 या कालावधीत वैद्यकीय शिबीरे , सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरण , पदयात्रा , दुचाकी रॅली इत्यादींचे आयोजन यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना (पीएमबीजेपी) च्या आतापर्यंतच्या प्रवासाची सविस्तर माहिती देताना डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की, देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू झाली आहे. आज 7 मार्च , 2021 रोजी आम्ही 7500 वे केंद्र सुरु केले आहे. 2024 वर्षापर्यंत या केंद्रांची संख्या 10,000 पर्यंत वाढविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत .
त्यांनी सांगितले की, दर महिन्याला सुमारे 1ते 1.25 कोटी नागरिक जनौषधी केंद्रातून औषधांची खरेदी करतात .
यावर्षी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना (पीएमबीजेपी) ला बळकटी देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत ,डॉ. हर्षवर्धन म्हणाले की , यादृष्टीने नवीन वर्षात दोन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत . पहिला उपक्रम म्हणजे, ही योजना अधिक आकर्षक करण्यासाठी नवी प्रोत्साहन योजना . या योजनेअंतर्गत , केंद्र मालकांना दिले जाणारे प्रोत्साहनपर अनुदान 2.50 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले , जास्तीत जास्त 15,000 रुपये दरमहा. पुढे, महिला , अनुसूचित जाती जमातीतील तसेच आकांक्षी जिल्ह्यातील किंवा ईशान्येकडील राज्यांमधील कोणत्याही उद्योजकाने सुरु केलेल्या केंद्रांमध्ये संगणक आणि सामानासाठी 2 लाख रुपये एकवेळ प्रोत्साहनपर अनुदान मंजूर करण्यात आले. हाती घेतलेला दुसरा उपक्रम म्हणजे , केंद्रांची उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेअंतर्गत असणाऱ्या औषधांमध्ये 75 आयुष औषधांचा समावेश.
कोविड -19 महामारीच्या काळात प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या योगदान अधोरेखित करत डॉ. हर्ष वर्धन यांनी प्रशंसा केली.
सर्वांगीण आरोग्यासाठी सरकारच्या बांधिलकीचा , हा उपक्रम केवळ एक वीट आहे असे डॉ. हर्ष वर्धन यांनी समारोप करताना सांगितले .
***
M.Chopade/S.Chavhan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1703036)
आगंतुक पटल : 198