पंतप्रधान कार्यालय

राजकोट, गुजरात येथे एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 31 DEC 2020 6:39PM by PIB Mumbai

 

नमस्कार!

केम छै, गुजरात में ठण्डी वण्डी छै के नहीं, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री  विजय रुपाणीजी, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी, उपमुख्यमंत्री भाई नितीन पटेलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी चौबे, मनसुख भाई मंडावीयाजी, पुरुषोत्तम रुपालाजी, भूपेंद्रसिंग विटासामाजी, किशोर कानानीजी, इतर सर्व मंत्री, खासदार, इतर सर्व मान्यवर.

 

बंधू आणि भगिनींनो,

नवीन वर्ष उंबरठ्यावर उभं आहे. देशाच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांना अजून बळकटी प्रदान करणारा आणखी एक दुवा आज जोडला जात आहे. गुजरात तसेच देशभरातील आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या नेटवर्कला राजकोटमधील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या पायाभरणीमुळे बळकटी येईल.

 

बंधू आणि भगिनींनो,

नवीन राष्ट्रीय आरोग्य सुविधेसह वर्ष 2020 ला निरोप देताना या सगळ्यात या वर्षाची आव्हाने देखील प्रतिबिंबित होतात आणि नवीन वर्षासाठीचे प्राधान्यक्रम देखील ठळकपणे समोर येतात. हे संपूर्ण वर्ष जगासाठी अभूतपूर्व आरोग्य आव्हानांचे वर्ष होते. या वर्षाने आरोग्य हीच संपत्ती असल्याचे वेळोवेळी दर्शवून दिले, पूर्वजांनी आपल्याला हे वेळोवेळी शिकविले होते. पुन्हा पुन्हा का शिकविले होते ?  2020 ने तर आपल्याला हे अगदी चांगल्या प्रकारे शिकवले. जेव्हा आरोग्य धोक्यात येते तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक घटकावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि केवळ कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण सामाजिक चक्र यात गुंडाळले जाते आणि म्हणून वर्षाच्या शेवटच्या दिवशी लाखो डॉक्टर, आरोग्य योद्धा, स्वच्छता कामगार, औषधाच्या दुकानात काम करणारे कामगार आणि इतर अग्रणी कोरोना योद्धा जे मानवतेच्या रक्षणासाठी सतत आपले जीवन पणाला लावत आहेत, त्यांचे स्मरण केले पाहिजे. कर्तव्य बजावताना ज्यांनी आपले प्राण गमावले अशा सर्वांना  आज मी आदरपूर्वक अभिवादन करतो.   कोरोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारे सहकारी, वैज्ञानिक, कर्मचार्‍यांचे आज देश वारंवार स्मरण करत आहे. आजचा दिवस हा, या कठीण काळात गरीबांना अन्न व इतर सुविधा पुरविण्याच्या समर्पण भावनेने काम केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करण्याचा दिवस आहे. इतका मोठा कालावधी, इतकी मोठी आपत्ती, परंतु समाजातील संघटित सामूहिक सामर्थ्य, समाजसेवा, समाजातील संवेदनशीलता या सगळ्यामुळेच या कठीणकाळात देखील देशवासीयांनी कोणत्याही गरीबांना रात्री उपाशी झोपू दिले नाही. हे सर्व अभिवादन आणि आदराचे पात्र आहेत.

 

मित्रांनो,

भारत जेव्हा एकवटलेला असतो तेव्हा कठीणातील कठीण संकटाचा सामना देखील अत्यंत प्रभावीपणे करू शकतो हेच या संकटांनी भरलेल्या वर्षाने दाखवून दिले आहे. भारताने एकत्रितपणे वेळेवर आणि प्रभावीपणे उचललेल्या पाऊलांमुळेच आपण आज इतक्या चांगल्या स्थितीत आहोत. ज्या देशात 130 कोटींहून अधिक लोक राहतात, दाट लोकसंख्या आहे, तिथे जवळपास 1 कोटींहून अधिक लोकांनी या आजाराशी लढा देऊन तो जिंकला आहे. कोरोनापासून लोकांना वाचवण्याची भारताचा विक्रम जगापेक्षा खूप चांगला आहे. त्याचबरोबर संसर्गाच्या आकड्यात देखील भारतात सतत घट होत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

वर्ष 2020 मध्ये, संसर्गाची निराशा होती, चिंता होती, चहुदिशांना प्रश्नचिन्हे होती, 2020 ची हीच ओळख बनली होती. परंतु 2021 उपचारांची आशा घेऊन येत आहे. भारतात लशीसंदर्भात  महत्त्वपूर्ण तयारी चालू आहे. भारतात तयार केलेली लस सर्व वर्गांपर्यंत वेगाने पोहोचण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबविण्याची भारताची तयारी जोरात सुरू आहे. मला विश्वास आहे की संसर्ग रोखण्यासाठी जसे गेल्या वर्षभरात  आपण एकत्रित प्रयत्न केले त्याचप्रमाणे संपूर्ण लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण भारत एकत्रितपणे पुढे जाईल. 

 

मित्रांनो,

गुजरातने देखील संसर्ग रोखण्यासाठी आणि लसीकरणासाठी केलेले काम कौतुकास्पद आहे. गेल्या दोन दशकांत गुजरातमध्ये विकसित झालेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमुळेच, गुजरातने सक्षमपणे कोरोनाच्या आव्हानाचा सामना केला आहे. एम्स, राजकोट गुजरातचे आरोग्य नेटवर्क आणखी मजबूत  करेल. गंभीरातील गंभीर आजारांसाठी आता राजकोटमध्येच आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. उपचार आणि शिक्षणा व्यतिरिक्त रोजगाराच्या बर्‍याच संधी निर्माण होतील. नवीन रुग्णालयात रोजगाराच्या थेट 5 हजार संधी उपलब्ध असतील. यासह राहणे, खाणे-पिणे, वाहतूक, इतर वैद्यकीय सुविधांशी संबंधित बर्‍याच अप्रत्यक्ष नोकर्‍याही उपलब्ध होतील आणि आपण पाहिलेच आहे की एखाद्या मोठ्या शहराच्या जवळ जिथे एक मोठे रुग्णालय आहे त्या शहराच्या बाहेर एक छोटेसे शहर वसलेच जाते.

 

बंधू आणि भगिनींनो,

वैद्यकीय क्षेत्रातील गुजरातच्या या यशामागे दोन दशकांचे अथक प्रयत्न, समर्पण आणि निर्धार आहे. गेल्या 6 वर्षात देशभरात उपचार आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात ज्या पातळीवर काम झाले आहे  त्याचा फायदा गुजरातलाही निश्चित मिळत आहे.

 

मित्रांनो,

मोठ्या रुग्णालयांची परिस्थिती, त्यांच्यावरील ताण याची तुम्हाला माहिती आहे. परिस्थिती अशी होती की स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतरही देशात केवळ 6 एम्स स्थापन झाल्या . 2003 मध्ये अटलजींच्या सरकारने आणखी 6 एम्स उभारण्यासाठी पावले उचलली. हे 6 एम्स सुरु होता-होता 2012 उजाडले म्हणजेच 9 वर्षे लागली. गेल्या 6 वर्षात, 10 नवीन एम्सचे काम सुरू झाले असून त्यापैकी बरेच एम्सचे काम पूर्ण झाले आहे. एम्सबरोबरच देशात 20 एम्स सारखीच सुपर स्पेशालिटी रुग्णालयेही बांधली जात आहेत.

 

मित्रांनो,

2014 पूर्वी, आमचे आरोग्य क्षेत्र वेगवेगळ्या दिशेने, वेगवेळ्या दृष्टीकोनातून काम करत होते. प्राथमिक आरोग्यसेवेची स्वतःची एक प्रणाली होती. खेड्यांमधील सुविधा नगण्य होत्या. आम्ही आरोग्य क्षेत्रात समग्रपद्धतीने काम करण्यास सुरवात केली. आम्ही एकीकडे प्रतिबंधात्मक काळजी घेण्यावर भर दिला तर दुसरीकडे आम्ही आधुनिक उपचार सुविधांनाही प्राधान्य दिले. आम्ही गरिबांच्या उपचारावरील खर्च कमी करीत असताना डॉक्टरांची संख्या वेगाने वाढली पाहिजे यावरही जोर दिला आहे.

 

मित्रांनो,

आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशभरातील दुर्गम भागात सुमारे दीड लाख आरोग्य व कल्याण केंद्रे बांधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत यापैकी 50 हजार केंद्रांनी सेवा सुरू केली असून त्यापैकी सुमारे 6 हजार केंद्रे गुजरातमध्ये आहेत. आतापर्यंत देशातील सुमारे दीड कोटी गरीब लोकांना 5 लाख रुपयांपर्यत मोफत उपचार मिळाले आहेत. या योजनेमुळे गरीब बंधू-भगिनींना कशी मदत झाली यासाठी मी देशाला एक आकडा सांगू इच्छितो.

 

मित्रांनो,

आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांच्या सुमारे 30 हजार कोटींपेक्षा जास्त पैशांची बचत झाली आहे. 30 हजार कोटी रुपये ही मोठी रक्कम आहे. विचार करा, या योजनेने गरीबांना आर्थिक चिंतांपासून किती मुक्त केले आहे. मग तो कर्करोग असो, हृदय रोग असो, मूत्रपिंडाचा त्रास, बर्‍याच गंभीर आजारांवर उपचार असो, माझ्या देशातील गरीब जनतेचे या सगळ्या आजारावरील उपचार  मोफत झाले आहेत आणि तेदेखील चांगल्या रुग्णालयात.

 

मित्रांनो,

आजारपणात गरिबांचा आणखी एक मित्र आहे आणि तो म्हणजे जन औषधी केंद्र. देशात सुमारे 7 हजार जन औषधी केंद्रे आहेत जी गरीबांना अत्यंत कमी दरात औषधे पुरवित आहेत. या जन औषधी केंद्रांवरील औषधे जवळपास 90 टक्के स्वस्त आहेत. म्हणजेच शंभर रुपयांचे औषध दहा रुपयांना मिळते. दररोज साडे तीन लाखांहून अधिक गरीब रुग्ण या जन औषधी केंद्राचा लाभ घेत आहेत आणि या केंद्रांमधून स्वस्त औषधे मिळाल्यामुळे दरवर्षी गरिबांचे सरासरी 3600 कोटी रुपयांची बचत होत आहे. आपण कल्पना करू शकता की किती मोठी मदत मिळत आहे. काही लोकांच्या मनात हा प्रश्न उद्भवू शकतो की सरकार उपचारांचा खर्च कमी करण्यावर, औषधांवरील खर्च कमी करण्यावर इतका भर का देत आहे?

 

मित्रांनो,

आपल्यातील बहुतेक लोक यासारख्याच पार्श्वभूमीतून आलो आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांमध्ये उपचारांचा खर्च हा नेहमीच एक चिंतेचा विषय असतो. जेव्हा एखाद्या गरीब व्यक्तीला एखादा गंभीर आजार होतो तेव्हा तो त्या आजारावर उपचारच करणार नाही हीच शक्यता जास्त असते. उपचारासाठी पैसे नसणे, इतर घरगुती खर्चाची जबाबदारी, त्यांच्या जबाबदारींचे ओझे यामुळे त्या व्यक्तीच्या वागण्यात हा बदल घडून येतो आणि आपण पाहिलेच असेल, जेव्हा एखादी गरीब व्यक्ती आजारी पडते आणि त्यावेळी जर त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसतील तेव्हा गंडे-दोरे, पूजा-पाठ या सगळ्या गोष्टी करू लागतो. त्याला असे वाटते की हे सर्व केल्यामुळे त्याचा जीव वाचेल पण खरे म्हणजे योग्य ठिकाणी जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसतात, गरिबी त्याला त्रास देत असते.

 

मित्रांनो,

आपण हे देखील पाहिले आहे की जे वर्तन पैशांच्या कमतरतेमुळे बदलते, तेच वर्तन जेव्हा गरीबाकडे  एक सुरक्षा कवच असते तेव्हा ते आत्मविश्वासात बदलते.  आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीबांचे उपचार, लोकांची ही  चिंता, हे वर्तन बदलण्यात यशस्वी झाले आहे. ज्यामध्ये पैशांच्या चणचणीमुळे ते उपचारासाठी रुग्णालयात जातच नव्हते. आणि कधी-कधी तर मी पाहिले आहे की घरातील जी ज्येष्ठ मंडळी आहेत, जास्त वयस्कर नाहीत, 45-50 वयोगटातील मोठी माणसे , ते कर्ज होईल म्हणून उपचार करून घेत नसत . ते म्हणायचे सगळे कर्ज मुलांना फेडावे लागेल आणि मुले रस्त्यावर येतील. मुलांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये यासाठी अनेक माता-पिता आयुष्यभर हालअपेष्टा सहन करतात आणि त्या वेदनांमध्येच त्यांचा अंत होतो. कारण कर्ज काढावे लागू नये, वेदना सहन करतील मात्र मुलांच्या नशीबात कर्जफेड येऊ नये यासाठी ते इलाज करून घेत नाहीत. हे देखील खरे आहे की खासगी रुग्णालयात जाण्याबाबत तर पूर्वी गरीब विचारही करू शकत नव्हता. आयुष्मान भारतनंतर आता ही स्थिती देखील बदलत आहे. 

 

मित्रांनो,

आपल्या आरोग्याच्या सुरक्षेची जाणीव, उपचारासाठी पैशांची तेवढी  चिंता नसणे , यामुळे समाजाचा दृष्टिकोनच बदलला आहे आणि आपण त्याचे परिणाम देखील पाहत आहोत. आज आरोग्य आणि निरामयता बाबत  एक जागरूकता आली आहे, गांभीर्य आहे. आणि हे केवळ शहरात होत आहे असे नाही. दूर -सुदूर आपल्या देशातील गावांमध्येही ही जागरूकता आपल्याला पहायला मिळत आहे. वागणुकीत बदलाची अशी उदाहरणे अन्य क्षेत्रांमध्येही दिसून येत आहेत. उदा. शौचालयांच्या उपलब्धतेने लोकांना स्वच्छतेप्रति जागरूक केले आहे. प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचे अभियान लोकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करत आहे, पाण्यामुळे होणारे आजार कमी करत आहे. स्वयंपाकघरात गॅस पोह्चल्यानंतर आपल्या बहिणी-मुलींचे आरोग्य तर सुधारतच आहे मात्र संपूर्ण कुटुंबात एक  सकारात्मक दृष्टिकोन आला आहे. असेच पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाने गर्भवती महिलांना नियमित तपासणीसाठी  प्रोत्साहित केले आहे. आणि तपासणी केल्यामुळे त्यांना आधीच गंभीर बाबींबाबत पूर्वसूचना दिली जाते. याचा लाभ असा होत आहे की गरोदरपणाच्या काळात ज्या जटिल समस्या उदभवायच्या त्यावर वेळीच निदान होऊन उपचार देखील होत आहेत. तसेच पंतप्रधान मातृ वंदना योजनेद्वारे हे  सुनिश्चित केले जात आहे की  गर्भवती महिलाना पुरेसे  पोषण मिळेल, देखभाल होईल. पोषण अभियानाने देखील त्यांच्यात  जागरूकता वाढवली आहे. या सर्व प्रयत्नांचा एक खूप मोठा लाभ हा झाला की देशात माता मृत्यु दर पूर्वीच्या तुलनेत खूप कमी होत आहे.

 

मित्रांनो,

केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नसते. प्रभाव - महत्वपूर्ण आहे, मात्र अंमलबजावणी देखील तितकीच महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच , मला वाटते की वर्तनात व्यापक परिवर्तन आणण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम  प्रक्रियेत सुधारणा करणे गरजेचे असते. गेल्या काही वर्षात देशात यावर खूप भर देण्यात आला आहे. याचा परिणाम आपण पाहत आहोत की आरोग्य क्षेत्रात वास्तवात जे बदल होत आहेत आणि लोकांना जी सर्वात मोठी गोष्ट मिळाली आहे ती आहे आरोग्य सुविधा त्यांना सहज उपलब्ध झाल्या आहेत. आणि मी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना आज अशी विनंती देखील करतो की त्यांनी सरकारच्या या योजनांचा मुलींच्या शिक्षणावर जो  प्रभाव पडला आहे, त्याचा अवश्य अभ्यास करावा. या योजना , ही जागरूकता, एक मोठे कारण आहे ज्यामुळे शाळांमधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी होत आहे.

 

मित्रांनो,

देशात वैद्यकीय शिक्षणाला चालना देण्यासाठी देखील मिशन मोडवर काम सुरु आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या व्यवस्थापनेशी निगडित संस्थांमध्ये सुधारणा केल्या गेल्या आहेत.  पारंपरिक भारतीय औषध प्रणाली संबंधी शिक्षणात देखील आवश्यक सुधारणा केल्या. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन झाल्यानंतर आरोग्य शिक्षणाचा दर्जा देखील सुधारेल आणि संख्यात्मक प्रगती देखील होईल. पदवीधरांसाठी नॅशनल एक्सिट टेस्ट आणि त्याबरोबर 2 वर्षांचा पोस्ट एमबीबीएस डिप्लोमा असेल किंवा मग पदव्युत्तर डॉक्टरांसाठी जिल्हा निवासी योजना असेल, अशा नवीन उपाययोजनांमुळे गरज आणि  गुणवत्ता या दोन्ही स्तरावर  काम केले जात आहे.

 

मित्रांनो,

लक्ष्य हे आहे कि प्रत्येक राज्यात एम्स पोहचावी आणि प्रत्येक  3 लोकसभा क्षेत्रात एक वैद्यकीय महाविद्यालय आवश्यक आहे. याच प्रयत्नांचा परिणाम आहे की मागील 6 वर्षात एमबीबीएसमध्ये 31 हजार नवीन जागा आणि पदव्युत्तरसाठी 24 हजार नवीन जागा वाढवण्यात आल्या आहेत. मित्रानो, आरोग्य क्षेत्रात भारत वास्तववादी मोठ्या परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.  2020 हे जर आरोग्यविषयक आव्हानांचे वर्ष होते तर 2021 हे आरोग्यविषयक उपायांचे वर्ष असणार आहे. 2021 मध्ये जागतिक आरोग्याबाबत अधिक सतर्क होऊन उपायांच्या दिशेने भारत पुढे मार्गक्रमण करेल. भारताने देखील 2020 मध्ये ज्याप्रकारे आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यात आपले योगदान दिले आहे , ते जगाने पाहिले आहे. मी सुरुवातीलाच याचा उल्लेख देखील केला आहे.

 

मित्रांनो,

भारताचे हे योगदान 2021 मध्ये आरोग्यविषयक उपायांसाठी, उपायांच्या व्याप्तीसाठी महत्वपूर्ण असणार आहे. भारत, आरोग्याचे भविष्य आणि भविष्याचे आरोग्य या दोन्ही बाबतीत सर्वात महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. इथे जगाला सक्षम वैद्यकीय व्यावसायिक देखील मिळतील आणि त्यांचा सेवा भाव देखील मिळेल. इथे जगाला मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा अनुभव देखील मिळेल आणि तज्ज्ञ देखील मिळतील. इथे जगाला आरोग्य उपाय आणि तंत्रज्ञान एकत्र आणणारे स्टार्टअप्स आणि स्टार्टअप परिसंस्था देखील मिळतील.  ते स्टार्टअप्स आरोग्यसेवेला सुगम्य बनवत आहे आणि आरोग्यविषयक परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणत आहेत.

 

मित्रांनो,

आज आपण सगळे हे पाहत आहोत की आजाराचे कसे जागतिकीकरण  होत आहे.  म्हणूनच हीच वेळ आहे आरोग्य उपायांचे देखील जागतिकीकरण व्हावे, संपूर्ण जग एकत्र येऊन प्रयत्न करेल, प्रतिसाद देईल. आज स्वतंत्रपणे प्रयत्न, एकट्याने काम करणे हा मार्ग उपयुक्त ठरणार नाही. मार्ग आहे सर्वाना सोबत घेऊन चालणे, सगळ्यांचा विचार करणे आणि भारत आज एक असा देश आहे ज्याने हे करून दाखवले आहे. भारताने मागणीनुसार  'Adapt, Evolve and Expand' करण्याची आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे. आपण जगाबरोबर पुढे गेलो, सामूहिक प्रयत्नांमध्ये मूल्यवर्धन केले आणि सर्व गोष्टी बाजूला ठेवून केवळ मानवतेला केंद्रस्थानी ठेवले, मानवतेची सेवा केली. आज भारताकडे  क्षमता देखील आहे आणि सेवा भावना देखील आहे. म्हणूनच , भारत जागतिक आरोग्याचा मुख्य केंद्र बनून उदयाला येत आहे.  2021 मध्ये आपल्याला भारताची ही भूमिका अधिक मजबूत करायची आहे.

 

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटले आहे - 'सर्वम् अन्य परित्यज्य शरीरम् पालयेदतः'॥ म्हणजे सर्वात मोठी प्राथमिकता शरीराच्या आरोग्याचे रक्षण ही आहे. सगळे काही सोडून आधी आपल्या आरोग्याची चिंता करायला हवी. नव्या वर्षात आपल्याला हा मंत्र आपल्या आयुष्यात  प्राधान्याने अंमलात आणायचा आहे. आपण निरोगी राहिलो तर देश निरोगी राहील. आणि आपल्याला हे देखील माहीत आहे की जी फिट इंडिया चळवळ सुरु आहे ती केवळ तरुणांसाठी आहे असे नाही , प्रत्येक वयोगटातील लोक या फिट इंडिया चळवळीत सहभागी व्हायला हवेत आणि सध्याचे हवामान देखील फिट इंडिया चळवळीला गती देण्यासाठी खूप चांगले आहे. कुठलेच कुटुंब नसेल जिथे योगाबाबत बोलले जात नसेल, फिट इंडिया चळवळीबद्दल बोलले जात नसेल. आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवायलाच हवे.  आजारी पडल्यानंतर जो त्रास होतो , निरोगी राहण्यासाठी तेवढे प्रयत्न करावे लागत नाहीत.  आणि म्हणूनच फिट इंडिया ही गोष्ट आपण कायम स्मरणात ठेवायला हवी, स्वतःला तंदुरुस्त ठेवणे, आपल्या देशाला तंदुरुस्त ठेवणे हे देखील आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.  राजकोटचे माझे प्रिय बंधू-भगिनींनोगुजरातचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट विसरू नका की कोरोना संक्रमण कमी होत आहे मात्र तो असा विषाणू आहे जो वेगाने पुन्हा पसरतो. म्हणूनच सुरक्षित सहा फुटांचे अंतरमास्क आणि स्वच्छतेच्या बाबतीत अजिबात ढिलाई नको. नवीन वर्ष आपणा सर्वांसाठी आनंद घेऊन येवो . तुमच्यासाठी आणि देशासाठी नवीन वर्ष मंगलदायी ठरो. आणि मी हे देखील सांगेन मी आधी सांगायचो जोवर औषध नाही तोवर लापरवाही नाही. वारंवार सांगायचो. आता औषध समोर दिसत आहे. काही काळाचा प्रश्न आहे. तरीही मी सांगेन, आधी मी सांगायचो जोवर औषध नाही तोवर लापरवाही नको, मात्र आता मी पुन्हा सांगतो आहे औषधही आणि काटेकोर पालन देखील . काटेकोर पालन करायचे आहे  आणि औषध घ्यायचे आहे. लस आली म्हणजे सगळे काही माफ या भ्रमात राहू नका. जग हेच सांगत आहेवैज्ञानिक हेच सांगत आहेत आणि म्हणूनच आता 2021 चा आपला मंत्र असेल औषधही आणि नियमांचे काटेकोर पालनही .

दुसरी गोष्ट, आपल्या देशात अफवांचा बाजार तेजीत असतो. विविध प्रकारचे लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी , कधी बेजबाबदार वर्तनासाठी वेगवेगळ्या अफवा पसरवतात. जेव्हा लसीकरण सुरु होईल तेव्हाही अफवांचा बाजार तेवढाच तेजीत असू शकेल. एखाद्याला वाईट ठरवण्यासाठी सामान्य माणसाचे किती नुकसान होत आहे याची पर्वा न करता अगणित   काल्पनिक खोटी वृत्ते पसरवली जातील. काही प्रमाणात तर सुरु झालेही आहे आणि साधेभोळे गरीब लोक किंवा वाईट हेतूने काम करणारे लोक ठामपणे या अफवा पसरवतात. माझी देशवासियांना विनंती आहे की कोरोना विरोधात एका अज्ञात शत्रूविरोधात लढाई आहे.  अफवांचा बाजार चालू देऊ नका, आपणही सोशल मीडियावर काहीही पाहिले तरी ते फॉरवर्ड करू नये. आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून आगामी काळात देशात आरोग्याचे जे अभियान चालेल , आपण सर्वजण त्यात  आपल्यापरीने योगदान देऊ. सर्वानी आपापली जबाबदारी उचलावी आणि ज्या लोकांना आधी ही लस द्यायची आहे त्यात आपण पूर्ण सहकार्य करू . जसजसे लसीकरण पुढे जाईल तसतसे देशवासियांना त्याबाबत वेळोवेळी माहिती दिली जाईल. मी पुन्हा एकदा  2021 साठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.

धन्यवाद!

***

G.Chippalkatti/S.Mhatre/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685135) Visitor Counter : 306