राष्ट्रपती कार्यालय
कोविड-19 ने लादलेल्या सक्तीमुळे आपण न्यायदानाचे नवे मार्ग शोधण्यास प्रवृत्त झालो : राष्ट्रपती रामनाथ कोविंद
सर्वोच्च न्यायालयाच्यावतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रमाचे राष्ट्रपतींकडून दूरस्थ पद्धतीने उद्घाटन
Posted On:
26 NOV 2020 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 26 नोव्हेंबर 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संविधान दिवस सोहळ्याचे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केले. संविधान स्वीकाराचा 71 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी, आज 26 नोव्हेंबर 2020 ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने या महामारीच्या दिवसातही आपले कार्य सुरू ठेवून न्यायदान केले. यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच ई-फायलिंग सारख्या तंत्रज्ञानाची मदत त्यांनी घेतली. सर्वांना न्याय देण्याच्या कर्तव्यात कोरोना विषाणूला बार, बेंच आणि अधिकाऱ्यांनी प्रवेश करू दिला नाही याची त्यांनी प्रशंसा केली. कोरोना विषाणूमुळे लादली गेलेले सक्ती ही खरोखरच आपल्याला , आपली कामे करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्यासाठी प्रवृत्त करत गेली आणि न्यायदानासाठी अधिक मार्ग खुले झाले.
भारताचे सर्वोच्च न्यायालय हे त्याच्या उच्चतम मानके आणि उदात्त आदर्श यामुळे मानाचं स्थान मिळवून आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. न्यायालयाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे आपल्या देशातील कायद्याची तसेच घटनेची चौकट दृढ होत गेली, असे निरीक्षण मांडताना आपली खंडपीठे आणि बारकौन्सिल हे त्यांची सखोल बुद्धिमत्ता आणि कायद्याचे ज्ञान यासाठी ओळखली जातात असे त्यांनी सांगितले. न्यायपालिका नेहमीच न्यायाची बुज राखतील याची आपल्याला संपूर्ण खात्री आहे असे ते म्हणाले.
आपले संविधान सर्वात मोठे असून त्यातील तरतुदी विचारपूर्वक आयोजिलेल्या आहेत. संविधानाची प्रशंसा करताना ते म्हणाले की आमच्या काळातील या महाकाव्याचे सार त्याच्या उद्देशिकेत योग्य रीतीने मांडले गेले आहे. केवळ 85 शब्दात स्वातंत्र्य युद्ध संघर्ष, आपल्या पूर्वसूरींची दूरदृष्टी आणि प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आणि आकांक्षा याचे प्रतिबिंब त्यात आहे असे त्यांनी सांगितले. आपल्या जीवनाच्या मार्गात या महान आदर्शांना समोर ठेवणे म्हणजेच या शब्दांचे रूपांतर आपल्या दैनंदिन कार्यात करणे हे आपले काम आहे, असे त्यांनी नमूद केले. न्यायपालिकेसाठी यातील काय लागू पडते हे सांगताना ते म्हणाले ही उद्देशिका सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाच्या दृष्टीने सुरक्षित करण्यावर भर देते. न्यायासाठी प्रेरित करणे हा न्यायदानाचा हेतू असतो. म्हणजेच न्याय मिळवण्यासाठी मार्ग खुला असणे म्हणजेच न्याय.
सार्वजनिक जीवनातील आचरणाबद्दल बोलतांना राष्ट्रपतींनी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे नाव भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया उद्धृत केली.
“मनुष्य कार्यभार स्वीकारतो ती त्याच्या अभिनंदनाची वेळ नसते तर जेव्हा तो कार्य निवृत्त होतो तेव्हा त्याचे अभिनंदन करावे. माझ्यावर सर्वांनी आणि जीवलगांनी उधळलेल्या स्तुती सुमनांसाठी मी पात्र आहे का हे बघण्यासाठी मला येथे थांबून रहावे लागेल त्या क्षणाची मी वाट बघत आहे. “
राष्ट्रपती म्हणाले की सर्वोच्च घटनात्मक पद मिळवणाऱ्या व्यक्तीच्या या अपेक्षांनी आपणास पक्षपात आणि पूर्वग्रह यांच्यापासून दूर राहण्याचा एक वस्तुपाठ घालून दिला आहे. राजेंद्रबाबू यांचे हे बोल आपणा सर्वांनाच लागू आहेत असे म्हणत राष्ट्रपतींनी आपल्या पूर्वसूरींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण अधिक चांगले कसे होऊ याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याचे आवाहन केले.

Jaydevi P.S/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676289)
अभ्यागत कक्ष : 254