रसायन आणि खते मंत्रालय
देशात चालू खरीप हंगामात खतांचा तुटवडा नाही: गौडा
मागणीनुसार युरियाचा पुरेसा पुरवठा करण्याची केंद्रीय मंत्र्यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दिली खात्री
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सदानंद गौडा यांची घेतली भेट
Posted On:
06 JUL 2020 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2020
चालू खरीप हंगामात देशात कुठेही खतांचा तुटवडा नाही. राज्य सरकारांशी सल्लामसलत करून पुरेशी प्रमाणात तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज दिली.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत गौडा यांची भेट घेतली. या भेटीत गौडा यांनी त्यांना मागणीनुसार राज्यात युरिया पुरेशा प्रमाणात उपलब्ध केला जाईल, असे आश्वासन दिले.
यंदा राज्यात यूरियाची कमतरता भासली नसली तरी, यंदा जास्त पाऊस झाल्याने यूरियाचा वापर वाढला आहे आणि मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीत 47 टक्के वाढ झाली आहे, असे चौहान यांनी सांगितले.
याकडे लक्ष वेधत त्यांनी केंद्र सरकारला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात राज्याला यूरियाचे अतिरिक्त वाटप करण्याची विनंती केली; शेतकऱ्यांकडून यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात युरियाची मागणी अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
गौडा यांनी आश्वासन दिले की, आगामी काळात मध्य प्रदेशला युरियाचा पुरेसा पुरवठा केला जाईल. जूनपर्यंत राज्याला सुमारे 55000 मेट्रिक टन अतिरिक्त युरिया मिळाला आणि 3 जुलै 2020 रोजी जुलै पुरवठा नियोजनाव्यतिरिक्त 19000 मेट्रिक टन वाटप करण्यात आले. केंद्रीय खते विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी युरियाचा पुरेसा पुरवठा करण्यास वचनबद्ध आहे. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आवश्यक वेळेत शेतकऱ्यांना किफायतशीर दरात पुरेशा प्रमाणात खतांचा पुरवठा करण्याबाबत दक्ष आहे.
अपेक्षेपेक्षा उत्तम मान्सूनचा अंदाज असल्यामुळे मे आणि जून महिन्यात देशभरात खरीप हंगामात खतांच्या डीबीटी विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीच्या मे आणि जून महिन्यांच्या तुलनेत यंदा मध्यप्रदेशात मे आणि जून महिन्यात युरियाची डीबीटी विक्री अनुक्रमे 176% आणि 167% टक्क्यांनी वाढली आहे. मात्र मध्य प्रदेशात युरियाची उपलब्धता सध्या पुरेशी आहे. 4 जुलै 2020 रोजी राज्यात 4.63 लाख मेट्रिक टन साठा आहे. खते विभाग परिस्थितीचा बारकाईने आढावा घेत आहे, तसेच वाढीव देशांतर्गत उत्पादन, तसेच आयात माध्यमातून कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाशी सल्लामसलत करून खतांची कोणतीही अतिरिक्त मागणी पूर्ण केली जाईल, असे ते म्हणाले.
* * *
S.Pophale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636831)
Visitor Counter : 246