रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांकडून आयआरसीटीसीच्या 'वॉर रूम'चा आढावा; खानपान सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रवाशांचे अभिप्राय आणि स्वयंपाकघरांवरील देखरेख यंत्रणा अधिक बळकट करण्याचे निर्देश.

प्रविष्टि तिथि: 24 AUG 2026 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली: 24 ऑगस्ट 2026

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सतीश कुमार यांनी 23 ऑगस्ट रोजी आयआरसीटीसीच्या कार्यालयात घेतलेल्या बैठकीत प्रामुख्याने प्रवाशांचे अभिप्राय, स्वयंपाकघराची निगराणी आणि  खानपान सेवांचा खात्रीशीर दर्जा यांच्याशी संबंधित यंत्रणा अधिक बळकट करण्यास प्राधान्य देऊन  'आयआरसीटीसी वॉर रूम'च्या कामकाजाचा आढावा घेतला.

या बैठकीत, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी देखरेख आणि अभिप्राय-संबंधित कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समर्पित चमूशी संवाद साधला. देखरेख प्रक्रिया अधिक तत्पर, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि परिणाम-केंद्रित करण्यासाठी सध्याची यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.

तपासणी करणाऱ्या संस्थांचे उत्तरदायित्व आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने, त्यांच्या कामावर सतत देखरेख आणि त्याचे मूल्यमापन करणे शक्य व्हावे यासाठी प्रत्येक संस्थेने तपासणीत आढळलेल्या त्रुटी आणि कामगिरीचे तपशील पद्धतशीरपणे नोंदवावेत असे निर्देश रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिले .

स्वयंपाकघरांची स्थिती आणि कार्यपद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी कॅमेरा-आधारित देखरेख प्रणालीचाही वापर केला जात आहे. ज्या ठिकाणची परिस्थिती असमाधानकारक असल्याचे आढळेल, तिथे योग्य ती नोटीस बजावली जाईल आणि सुधारणात्मक कारवाई केली जाईल. दक्षिण मध्य रेल्वेच्या अनंतपूर येथील एका स्वयंपाकघरात सुधारणेची आवश्यकता असल्याचे व्हिडिओ देखरेखीतून आढळून आल्याचे निरीक्षण आढावा घेताना नोंदवण्यात आले .

खानपान सेवांचा दर्जाचा राखण्यात त्रयस्थ तपासणी संस्थांच्या भूमिकेचाही सतीश कुमार यांनी आढावा घेतला. अनेक ठिकाणी त्रयस्थ परीक्षणाची व्यवस्था उपलब्ध असली, तरी या तपासण्या प्रभावी, फलदायी आणि परिणाम-केंद्रित असतील हे सुनिश्चित करण्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित देखरेख आणि शोध घेणाऱ्या प्रणालींच्या वापराबाबतही चर्चा करण्यात आली. उंदीर, झुरळे आणि इतर त्रुटींशी संबंधित एआय-आधारित सूचना केवळ त्रुटी शोधण्यापुरत्याच मर्यादित राहू नयेत. अशा घटनांनंतर योग्य समज देणारी पत्रे पाठवणे आणि त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक आहे, त्यामुळे निदर्शनास आलेल्या त्रुटींवर वेळच्यावेळी सुधारणात्मक उपाययोजना केल्या जातील हे सुनिश्चित करता येईल.

रेल्वेच्या खानपान सेवांचा दर्जा सातत्याने सुधारण्यासाठी अधिक प्रभावी तपासणी, तंत्रज्ञानावर आधारित बळकट देखरेख आणि त्वरित पाठपुरावा करण्याची आवश्यकता या आढाव्यात अधोरेखित करण्यात आली. प्रवाशांचा विश्वास बळकट करणे, अन्नाचा दर्जा आणि स्वच्छता मानकांत सुधारणा करणे आणि भारतीय रेल्वेमध्ये अधिक प्रतिसादक्षम व प्रवासी-केंद्रित खानपान व्यवस्था सुनिश्चित करणे, हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

***

राधिका अघोर/मंजिरी गानू/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2302888) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Kannada