पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण
आज जिंद आणि हरियाणाने इतिहासाच्या पानांवर आपली नावे कायमची कोरली आहेत. आज येथूनच देशाला पहिली 'हायड्रोजन ट्रेन' भेट म्हणून मिळाली आहे: पंतप्रधान
पूर्णपणे उत्सर्जन-मुक्त असण्यासोबतच, भारताची ही हायड्रोजन ट्रेन 'मेक इन इंडिया'चे एक अत्यंत यशस्वी उदाहरण आहे: पंतप्रधान
रेल्वे असो वा रस्ते मार्ग, संपर्क व्यवस्थेतील अशी प्रगती सुविधा पुरवते आणि विकासाची गती अनेक पटींनी वाढवते : पंतप्रधान
आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि 'खेलो भारत' धोरणही तयार केले आहे; 'खेलो इंडिया' अभियानापासून ते 'टॉप्स' (TOPS) योजनेपर्यंत, आज खेळाडूंना अभूतपूर्व सुविधा पुरवल्या जात आहेत: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2026 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,17 जुलै 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील जिंद येथे सुमारे 14,700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर आनंद व्यक्त करत, पंतप्रधानांनी या प्रदेशाचा समृद्ध ऐतिहासिक, लढाऊ आणि आध्यात्मिक वारसा अधोरेखित केला; ज्याला 'शक्तीपीठ माता जयंती'चा विशेष आशीर्वाद लाभला आहे. अनेक दशकांपूर्वी संघटनात्मक कामांसाठी या शहराला दिलेल्या भेटींची आठवण सांगताना, त्यांनी तेथील लोकांकडून मिळालेल्या अविस्मरणीय प्रेमाचाही आवर्जून उल्लेख केला; तिथल्या 'मुर्रा' जातीच्या म्हशींचे दुग्धजन्य पदार्थ, 'देसी बुरा' आणि 'घेवर' यांसारख्या स्थानिक खाद्यपदार्थांशी हे नाते घट्टपणे जोडलेले आहे. "ही काही सामान्य भूमी नाही; तर इतिहास, शौर्य, धर्म आणि असीम अभिमानाची ही एक महान भूमी आहे," असे मोदी यांनी नमूद केले.
या प्रदेशातील कालातीत स्थानिक वैशिष्ट्ये आणि आमूलाग्र बदललेले विकासाचे चित्र यांची तुलना करत, पंतप्रधानांनी हे शहर 'सुशासनाच्या प्रारूपाचे' एक उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांमध्ये संपूर्ण राज्य विकासाच्या एका नवीन मार्गावर वाटचाल करत आहे यावर भर देत, त्यांनी नमूद केले की आजचे कार्यक्रम या मोहिमेला एक नवी गती देत आहेत. "आजचा कार्यक्रम सरकारच्या या मोहिमेला पूर्णपणे नवीन ऊर्जा देत आहे," असे मोदी म्हणाले.
या प्रदेशाचे नाव आता इतिहासाच्या पानांवर कायमचे कोरले गेले आहे असे सांगत, पंतप्रधानांनी देशातील पहिली हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी सुरु झाल्याचे अभिमानाने जाहीर केले. मुंबई आणि ठाणे दरम्यान ऐतिहासिक पहिली रेल्वे गाडी सुरु झाली होती याची आजही आठवण काढली जाते असे सांगत ते म्हणाले की, भविष्यात जेव्हा प्रगत 'ग्रीन मोबिलिटी'ची चर्चा होईल, तेव्हा या कॉरिडॉरचीही अशीच दखल घेतली जाईल आणि तो अजरामर ठरेल."भारतीय रेल्वेच्या व्यापक आधुनिकीकरणाशी संबंधित या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल मी तुम्हा सर्वांचे आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो," असे मोदी यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांच्या मोठ्या प्रकल्पांबाबत सविस्तर बोलताना , पंतप्रधानांनी रेल्वे, महामार्ग आणि सांस्कृतिक वारसा संबंधी 14,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या नवीन प्रकल्पांची माहिती दिली, जे थेट राज्याच्या कल्याणासाठी समर्पित आहेत. आरोग्यसेवेच्या मोठ्या विस्ताराचा उल्लेख करत त्यांनी भिवानी येथील पंडित नेकी राम शर्मा वैद्यकीय महाविद्यालय आणि नारनौल येथील 'महर्षी च्यवन वैद्यकीय महाविद्यालय व 'राव तुलाराम रुग्णालय' राष्ट्राला समर्पित केल्याची घोषणा केली; या उपक्रमांचा उद्देश वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या नवोदितांसाठी उत्तम नवीन संधी निर्माण करणे हा आहे. "या नवीन संस्थांमुळे हरियाणामधील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सुलभ होतील," असे मोदी यांनी नमूद केले.
स्थानिक जनतेने दाखवलेल्या प्रचंड नागरी निष्ठेचे कौतुक करत, पंतप्रधानांनी त्यांच्या आगमनापूर्वीच स्वच्छता स्वागत उपक्रमात ज्या गांभीर्याने जनतेने सहभाग घेतला त्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. जनसमुदाय स्वच्छता मोहिमेत सक्रियपणे आणि उत्साहाने सहभागी होत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि जनसहभागाची ही गती कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. "याच पद्धतीने आपण स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे," असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
जागतिक रेल्वे क्षेत्राच्या तांत्रिक उत्क्रांतीचा आढावा घेताना, पंतप्रधानांनी आठवण करून दिली की 19 वे शतक वाफेच्या इंजिनांसाठी तर 20 वे शतक विद्युत शक्तीसाठी ओळखले गेले. आता 21 वे शतक हायड्रोजनवर आधारित गतिशीलतेचे असेल, ज्याची अधिकृत सुरुवात जिंद आणि सोनीपत दरम्यान नव्याने उद्घाटन झालेल्या 90 किलोमीटरच्या मार्गाने झाली असे त्यांनी सांगितले. "आज, भारतीय रेल्वेने 21 व्या शतकातील तंत्रज्ञानात एक मोठी झेप घेतली आहे, ज्यात भविष्यातील विस्तारासाठी प्रचंड क्षमता आहे," असे पंतप्रधानांनी नमूद केले.
देशाच्या या कामगिरीला जागतिक दृष्टिकोनातून पाहताना पंतप्रधानांनी नमूद केले की, हायड्रोजन रेल्वे तंत्रज्ञान जगभरात केवळ 7-8 वर्षांपूर्वीच व्यावहारिकरित्या वापरात आले. सध्या केवळ काही मोजक्याच देशांकडे अशा रेल्वे चालवण्याची क्षमता आहे आणि त्याही अजून प्राथमिक टप्प्यातच आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. "या नव्याने सुरू झालेल्या भारतीय हायड्रोजन ट्रेनच्या खऱ्या क्षमतांबद्दल ऐकून प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रचंड अभिमान वाटेल," असे पंतप्रधान म्हणाले.
या नवीन वाहतूक नवलाची तांत्रिक वैशिष्ट्ये उघड करताना पंतप्रधानांनी, नव्याने सुरू झालेल्या रेल्वेचे वर्णन केले. ही जागतिक स्तरावर अशा प्रकारची सर्वात शक्तिशाली रेल्वे आहे, असे ते म्हणाले. या रेल्वेची क्षमता तब्बल 3,200 अश्वशक्ती असून त्यात दहा डबे आहेत. इतर देशातील हायड्रोजन रेल्वेमध्ये साधारणपणे केवळ तीन ते चार डबे असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्याच प्रयत्नात देशाने मिळवलेल्या धाडसी कार्यात्मक वर्चस्वावर पंतप्रधानांनी अभिमानाने प्रकाश टाकला. "भारताने पूर्ण दहा डब्यांची हायड्रोजन ट्रेन चालवून आपले सामर्थ्य यशस्वीरित्या सिद्ध केले आहे," असे त्यांनी सांगितले.
ही पूर्णपणे धूरमुक्त रेल्वे देशांतर्गत उत्पादन उपक्रमाचा एक मोठा, मूर्त विजय आहे, असे पंतप्रधानांनी हरित गतिशीलतेच्या महत्त्वपूर्ण टप्प्याचा गौरव करताना सांगितले. या प्रगत प्रणालीची संपूर्ण रचना करणाऱ्या प्रतिभावान भारतीय अभियंत्यांना आणि निर्दोषपणे या रेल्वेची निर्मिती पूर्ण करणाऱ्या स्थानिक उत्पादन कंपन्यांना त्यांनी या यशाचे श्रेय दिले. "हे 'मेक इन इंडिया' उपक्रमाचे एक अत्यंत यशस्वी आणि अभिमानास्पद उदाहरण आहे," असे पंतप्रधान म्हणाले.
या हायड्रोजन रेल्वेसाठी पूर्णपणे वेगळ्या पायाभूत सुविधा आणि विशेष सहाय्यक प्रणालींची आवश्यकता असते, असे पंतप्रधानांनी या प्रगत तंत्रज्ञानाच्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कार्यान्वयन आवश्यकता स्पष्ट करताना सांगितले. या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी नजीकच्या काळात नवीन कारखाने आणि संबंधित सुविधांची वेगाने स्थापना होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यातून मोठे स्थानिक आर्थिक दूरगामी परिणाम दिसून येतील असा अंदाज त्यांनी वर्तवला."हे प्रगत रेल्वे नेटवर्क हरियाणाच्या तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नवीन संधी निर्माण करेल याची पूर्ण खात्री आहे," असे मोदींनी सांगितले.
यानंतर पंतप्रधानांनी महत्त्वाच्या भूराजकीय आव्हानांचा उल्लेख करत गेल्या बारा वर्षात भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या मोठ्या परिवर्तनामुळे देशाच्या धोरणात्मक आणि वाहतूक विषयक क्षमतेत झालेली वाढ अधोरेखित केली.पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या संघर्षाचा उल्लेख करुन त्यांनी स्पष्ट केले की पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि खतांच्या अत्यावश्यक पुरवठ्यात जलवाहतुकीचे मार्ग कशाप्रकारे कित्येक महिन्यांपासून सातत्याने गंभीर अडथळ्यांनी घेरले आहेत. या महत्त्वपूर्ण सागरी मार्गाद्वारे भारत मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक इंधन आणि कृषी निविष्ठा आयात करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
देशावर असे जागतिक इंधन संकट 2014 पूर्वी आले असते तर त्यावेळच्या भीषण परिणामांच्या कल्पनेबाबत पंतप्रधान म्हणाले की, त्यावेळी डिझेलवर असलेल्या मोठ्या प्रमाणातील अवलंबित्वामुळे देशाचे संपूर्ण रेल्वे जाळे अक्षरशः ठप्प झाले असते. 1925 ते 2014 या कालावधीत रेल्वे नेटवर्कपैकी केवळ 30 टक्के मार्गांचे विद्युतीकरण झाले होते, असे सांगून त्यांनी नमूद केले की, प्रशासनाच्या ठोस प्रयत्नांमुळे आता देशातील जवळपास 99 टक्के राष्ट्रीय ग्रीडचे आणि राज्यातील 100 टक्के रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संपूर्ण विद्युतीकरणामुळे, गंभीर जागतिक तेल संकट असूनही आपल्या रेल्वेगाड्या पूर्णपणे विनाअडथळा धावत राहिल्या असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या समृद्ध संपर्कव्यवस्थेच्या सामाजिक आणि आर्थिक अशा दुहेरी लाभांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी विस्तृत रस्ते आणि रेल्वे नेटवर्क कशाप्रकारे जनसामान्यांना सोईस्कर ठरते आणि त्याचवेळी प्रादेशिक विकासाला अभूतपूर्व गती प्रदान करते ते विशद केले. दिल्ली-अमृतसर-कटरा द्रुतगती मार्गाचा स्थानिक विभाग, जिंद-गोहाना राष्ट्रीय महामार्ग आणि अंबाला-काला अंब चार पदरी प्रकल्पाचे अधिकृतपणे उद्घाटन करताना, या प्रकल्पामुळे आंतरराज्यीय वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेला अनेक लाभ होतील, असे पंतप्रधान म्हणाले . अशा व्यापक संपर्कव्यवस्थेच्या कामांमुळे प्रचंड दिलासा मिळतो आणि त्याचबरोबर सर्वांगीण विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढतो, असे ते म्हणाले.
दळणवळणाच्या संदर्भातून जिंद जिल्ह्यात झालेल्या आमूलाग्र परिवर्तनाबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की आता हे शहर पाच स्वतंत्र राष्ट्रीय महामार्गांनी धोरणात्मकदृष्ट्या जोडले गेले आहे. या सुधारणेमुळे झालेल्या प्रचंड मोठ्या आर्थिक लाभाबद्दल त्यांनी सांगितले की शेतकरी आणि पशुपालकांना आता लक्षणीय रित्या कमी खर्चात व्यापारी बाजारपेठांमध्ये सुलभ प्रवेश करता येईल. ही भक्कम संपर्क व्यवस्था उद्योगांना नवी चालना देईल, पर्यटनाला नवे पंख देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या त्यांच्या अलीकडेच झालेल्या अत्यंत यशस्वी राजनैतिक दौऱ्याचे स्मरण करताना पंतप्रधानांनी या राष्ट्रांसोबत झालेल्या अनेक आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय करारांचा उल्लेख केला. त्यांनी एका अतिशय महत्त्वपूर्ण आणि अद्याप फारसे लक्ष न वेधले गेलेल्या मात्र प्रादेशिक युवा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण दुर्लक्षित धोरणात्मक मुद्द्याचा उल्लेख केला. हरियाणाच्या तरुणांशी घनिष्ठ संबंध असलेला एक विशिष्ट विषय आहे ज्यावर फारशी चर्चा झालेली नाही, आणि तो म्हणजे क्रीडा असे ते म्हणाले.
परदेशी सरकारांबरोबर झालेल्या धोरणात्मक चर्चांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी क्रीडा आणि स्पर्धात्मक क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने आगामी काळात व्यापक आंतरराष्ट्रीय सहकार्य राबवण्यात येणार असल्याची माहिती दिली. व्यापक क्रीडा उद्योग आणि उच्च दर्जाच्या खेळाडू प्रशिक्षण पद्धतींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या संयुक्त उपक्रमांवर भर दिल्यास त्यामुळे स्थानिक कौशल्याला अफाट लाभ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या राष्ट्रांसोबत मिळून काम करून, आपण येत्या काळात क्रीडा उद्योगात महत्त्वपूर्ण काम साध्य करणार आहोत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
देशातील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांच्या व्यापक सुधारणांचा तपशील सांगताना पंतप्रधानांनी कशाप्रकारे शारीरिक तंदुरुस्ती आणि रोजगार या दोन्ही आघाड्यांवर क्रीडा क्षेत्राचे एका सक्रिय आणि नियोजनबद्ध रीतीने महत्त्वपूर्ण आणि व्यवहार्य माध्यमामध्ये रुपांतर केले जात आहे, हे सांगितले.नवीन राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि खेलो भारत नीतीच्या यशस्वी अंमलबजावणीचा उल्लेख करत, त्यांनी खेलो इंडिया आणि टॉप्स (TOPS) सारख्या अत्यंत प्रभावी योजनांच्या माध्यमातून खेळाडूंना देण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण आर्थिक आणि संस्थात्मक पाठिंब्याची प्रशंसा केली. "येथील राज्य सरकारही खेळांना आणि आमच्या समर्पित खेळाडूंना प्रचंड, तसेच सातत्यपूर्ण प्रोत्साहन देत आहे," असे मोदींनी सांगितले.
तरुण खेळाडूंना थेट संबोधित करताना, पंतप्रधानांनी पायाभूत सुविधांमधील महत्त्वाच्या टप्प्यांवरून आगामी भव्य जागतिक स्पर्धात्मक व्यासपीठांकडे सर्वांचे लक्ष वेधले. 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धासाठीच्या यजमानपदासाठी भारताची तयारी आणि 2036 च्या ऑलिम्पिक क्रीडास्पर्धासाठीच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय बोलीचे, तसेच अहमदाबादमधील जागतिक पोलीस आणि अग्निशमन खेळांचे यजमानपद भूषवण्याच्या भारताच्या तयारीची घोषणा करताना, त्यांनी स्थानिक स्पर्धकांना अत्यंत परिश्रमपूर्वक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. "मी तुम्हाला खात्री देतो की, तुमच्या कसून केलेल्या तयारीसाठी सरकार तुम्हाला सर्व आवश्यक सुविधा पूर्णपणे उपलब्ध करून देईल," असे आश्वासन मोदी यांनी दिले.
स्थानिक पातळीवरील शासन मॉडेलची प्रशंसा करताना, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकासाच्या मंत्राचे काटेकोरपणे पालन केल्याबद्दल राज्य प्रशासनाची प्रशंसा केली. लाचखोरी किंवा घराणेशाही विरहित, पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित रोजगार पद्धतींच्या कठोर अंमलबजावणीवर प्रकाश टाकत, त्यांनी अशा प्रणालीगत सुधारणा लागू करण्यात येणाऱ्या राजकीय अडचणींची दखल घेतली.
कृषी कल्याणाप्रती असलेल्या सरकारच्या अढळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, पंतप्रधानांनी स्थानिक बाजारपेठेला राज्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळख मिळाल्याचे सांगून शेतकऱ्यांना थेट मिळणाऱ्या प्रचंड आर्थिक लाभांवर प्रकाश टाकला. या संस्थात्मक मदतीचे संख्यात्मक विश्लेषण करताना, त्यांनी सांगितले की, पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना अंदाजे 8,000 कोटी रुपये मिळाले असून, त्यातील एक मोठा हिस्सा स्थानिक शेतकऱ्यांना मिळाला आहे. "एकट्या जिंदमधील आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांना 600 कोटींहून अधिक रुपये आधीच थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत," असे मोदींनी यावेळी सांगितले.
राष्ट्राच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचा गौरव करताना, पंतप्रधानांनी हा प्रदेश समृद्ध ऐतिहासिक वारशाचे एक विशाल, शाश्वत केंद्र म्हणून ओळखला जातो असे नमूद केले. महाराजा रणजीत सिंग यांचा गौरवशाली वारसा आणि पांडवांच्या पवित्र श्रद्धेचा उल्लेख करत, आजही लाखो श्रद्धाळू अनुयायांना आकर्षित करणाऱ्या स्थानिक तीर्थक्षेत्रांकडे त्यांनी लक्ष वेधले. "हाच तो श्रद्धा आणि अध्यात्माचा गौरवशाली वारसा आहे, ज्याचे आधुनिक भारत आज सक्रियपणे जतन करत आहे," असे मोदी यावेळी म्हणाले.
आपला इतिहास पूर्ण आदराने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्र कटिबद्ध आहे, असे सांगत; भूतकाळाप्रती असलेल्या निस्सीम आदराला भविष्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रयत्नांशी जोडून घेता यायला हवे असेपंतप्रधानांनी नमूद केले.हे उद्दिष्ट साकार करण्यासाठी, त्यांनी कुरुक्षेत्र येथे एका नव्या शीख संग्रहालयाच्या पायाभरणीची अधिकृत घोषणा केली. "हे नवीन संग्रहालय भारताची महान गुरु परंपरा आपल्या आगामी पिढ्यांपर्यंत यशस्वीपणे आणि अभिमानाने पोहोचवेल," असे मोदींनी यावेळी अधोरेखित केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी कृषी आणि उद्योग या दुहेरी आर्थिक व्यवस्थेच्या चाकांच्या जोरावर राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने घोडदौड करत आहे,असे या राज्याचे वर्णन त्यांनी केले. या गतीला आणखी प्रचंड वेग देण्यासाठी नव्याने उद्घाटन झालेल्या प्रकल्पांना शुभेच्छा देताना, त्यांनी राष्ट्रीय प्रवासात या प्रदेशाच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला. "हरियाणाचा हा वेगवान विकास, पूर्ण विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या आपल्या प्रवासाला निःसंशयपणे आणि जोमदार ऊर्जा देईल," असे प्रतिपादन मोदींनी यावेळी केले.
निलीमा चितळे/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/भक्ती सोनटक्के/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285857)
आगंतुक पटल : 10