पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 18 APR 2026 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 एप्रिल 2026

 

आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेषतः देशातील माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी आलो आहे! आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या नारी शक्तीच्या भरारीला कशा प्रकारे रोखले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांना निर्दयीपणे चिरडले गेले आहे. आमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही! आणि मी यासाठी सर्व माता-भगिनींची, क्षमा मागतो.

मित्रांनो,

आमच्यासाठी देशहित सर्वोच्च आहे, परंतु जेव्हा काही लोकांसाठी पक्षहित सर्वकाही बनते, आणि पक्षहित हे देशहितापेक्षा मोठे होते, तेव्हा त्याचा फटका नारीशक्तीला आणि देशहिताला सहन करावा लागतो. या वेळीही तेच झाले आहे. काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्ष यांसारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचे नुकसान देशातील नारी शक्तीला सहन करावे लागत आहे.

मित्रांनो,

काल देशातील कोट्यवधी महिलांचे लक्ष संसदेकडे होते, देशाची नारीशक्ती पाहत होती. मलाही हे पाहून अतिशय दुःख झाले की, जेव्हा महिलांच्या हिताचा प्रस्ताव फेटाळला गेला, तेव्हा काँग्रेस, डीएमके, टीएमसी, समाजवादी पक्ष यांसारखे घराणेशाही असलेल्या पक्षांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. महिलांचे अधिकार हिरावून घेऊन हे लोक बाकं वाजवतं होते. त्यांनी जे केले ती केवळ बाकांवरची थाप नव्हती, तर तो नारीच्या स्वाभिमानावर, तिच्या आत्मसन्मानावर केलेला आघात होता. स्त्री सर्व काही विसरू शकते, पण आपला अपमान कधीही विसरत नाही, म्हणूनच संसदेत काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वर्तनाची प्रत्येक स्त्रीच्या मनात कायम राहील. देशातील महिला जेव्हा आपल्या भागातील या नेत्यांना पाहतील, तेव्हा त्यांना आठवेल की याच लोकांनी, याच लोकांनी संसदेत महिला आरक्षणाला रोखल्याचा जल्लोष केला होता, आनंद साजरा केला होता. काल संसदेत नारी शक्ती वंदन दुरुस्तीला ज्या पक्षांनी विरोध केला आहे, त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, ते नारी शक्तीला गृहीत धरत आहेत. ते विसरत आहेत की 21 व्या शतकातील महिला देशातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून आहे, ती त्यांचा हेतू ओळखून आहे आणि सत्यही पूर्णपणे जाणून आहे. म्हणूनच, महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी जे पाप केले आहे, त्याची शिक्षा त्यांना नक्कीच मिळेल. या पक्षांनी संविधान निर्मात्यांच्या भावनांचाही अपमान केला आहे आणि जनतेकडून मिळणाऱ्या शिक्षेपासूनही ते वाचू शकणार नाहीत.

मित्रांनो,

सभागृहातील नारी शक्ती वंदन दुरुस्ती कोणाकडून काहीही हिरावून घेण्यासाठी नव्हती. नारी शक्ती वंदन दुरुस्ती प्रत्येकाला काही ना काही देण्यासाठी होती. 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या हक्कांना, 2029 च्या लोकसभा निवडणुकीपासून त्यांचा अधिकार मिळवून देणारी ही दुरुस्ती होती.

नारी शक्ती वंदन दुरुस्ती 21 व्या शतकातील भारतातील महिलांना नवीन संधी देण्यासाठी, नवीन भरारी देण्यासाठी, तिच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठीचा एक महायज्ञ होता. देशाच्या 50% म्हणजेच निम्म्या लोकसंख्येला त्यांचा अधिकार देण्यासाठी स्पष्ट हेतूने, प्रामाणिकपणे केलेला हा एक पवित्र प्रयत्न होता. महिलांना भारताच्या विकास प्रवासात सहप्रवासी बनवण्याचा आणि सर्वांना जोडण्याचा हा प्रयत्न होता. नारी शक्ती वंदन दुरुस्ती ही काळाची गरज आहे. नारी शक्ती वंदन दुरुस्ती उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा सर्व राज्यांच्या सामर्थ्यात समान वाढ करण्याचा प्रयत्न होता. संसदेत सर्व राज्यांच्या आवाजाला अधिक ताकद देण्याचा हा प्रयत्न होता. राज्य लहान असो वा मोठे, राज्याची लोकसंख्या कमी असो वा जास्त, सर्वांची ताकद समान प्रमाणात वाढवण्याचा हा प्रयत्न होता. परंतु या प्रामाणिक प्रयत्नाची काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभागृहात संपूर्ण देशासमोर भ्रूणहत्या केली आहे. हे काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पक्ष, डीएमके सारखे पक्ष या भ्रूणहत्येचे दोषी आहेत. हे देशाच्या संविधानाचे अपराधी आहेत, हे देशाच्या नारी शक्तीचे अपराधी आहेत.

मित्रांनो,

काँग्रेसचा  महिला आरक्षणाच्या विषयलाच विरोध आहे, त्यांनी नेहमीच महिला आरक्षण रोखण्यासाठी कट रचले आहेत. या दिशेने यापूर्वी जितक्या वेळा प्रयत्न झाले, त्या प्रत्येक वेळी काँग्रेसने त्यात अडथळे निर्माण केले आहेत. या वेळीही काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला आरक्षण रोखण्यासाठी एकापाठोपाठ एक नवीन खोटे दावे मांडले आहेत. कधी संख्येवरून, तर कधी इतर मुद्द्यांच्या नावाखाली, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. असे करून या पक्षांनी भारताच्या नारी शक्तीसमोर आपला खरा चेहरा समोर आणला आहे, त्यांचा मुखवटा उतरला आहे.

मित्रांनो,

मला वैयक्तिकरित्या आशा होती की काँग्रेस आपली दशकांपासूनची जुनी चूक सुधारेल. काँग्रेस आपल्या पापांचे प्रायश्चित्त करेल, परंतु काँग्रेसने इतिहास घडवण्याची, महिलांच्या बाजूने उभे राहण्याची संधी गमावली. आज काँग्रेस स्वतः देशाच्या बहुतांश भागांत आपले अस्तित्व गमावून बसली आहे. काँग्रेस एखाद्या परजीवाप्रमाणे प्रादेशिक पक्षांच्या पाठीवर स्वार होऊन स्वतःला जिवंत ठेवून आहे. पण काँग्रेसला हे देखील नको आहे की प्रादेशिक पक्षांची ताकद वाढावी, म्हणूनच काँग्रेसने या दुरुस्तीला विरोध करून अनेक प्रादेशिक पक्षांचे भवितव्यही अंधारात ढकलण्याचे राजकीय कारस्थान रचले आहे.

मित्रांनो,

काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, टीएमसी आणि इतर पक्ष, इतक्या वर्षांपासून प्रत्येक वेळी तीच कारणे, तेच चुकीचे तर्क रचत आले आहेत, बनवत आले आहेत. कोणता ना कोणता तांत्रिक पेच निर्माण करून त्यांनी महिलांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. देश, राजकारणाचा हा ओंगळवाणा नमुना नीट समजून चुकला आहे आणि त्यामागचे कारणही जाणतो आहे.

बंधू आणि भगिनींनो,

नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करण्याचे एक मोठे कारण म्हणजे या घराणेशाही असलेल्या पक्षांची भीती. त्यांना भीती वाटते की जर महिला सशक्त झाल्या, तर या घराणेशाहीतील पक्षांचे नेतृत्व धोक्यात येईल. आपल्या कुटुंबाबाहेरील महिलांनी पुढे यावे, हे त्यांना मान्य नाही. आज पंचायतींमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या हजारो लाखो महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे, जेव्हा त्या पुढे, लोकसभा आणि विधानसभांमध्ये येऊ इच्छितात, देशाची सेवा करू इच्छितात, तेव्हा या घराणेशाही असलेल्या पक्षांच्या मनात त्यांच्याबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर महिलांसाठी अधिक जागा उपलब्ध होतील, महिलांचा प्रभाव, म्हणूनच या लोकांनी नारी शक्ती वंदन दुरुस्तीला विरोध केला आहे. देशाची नारीशक्ती, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या पापासाठी कधीही माफ करणार नाही.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्ष मतदारसंघ पुनर्रचने बाबत सातत्याने खोटे दावे करत आहेत. या निमित्ताने त्यांना विभाजनाची आग पेटवायची आहे. कारण, 'फोडा आणि राज्य करा' ही राजकारणाची पद्घत काँग्रेस इंग्रजांकडून वारसाहक्काने शिकून आली आहे आणि काँग्रेस आजवर त्याच आधारावर चालत आहे. काँग्रेसने नेहमीच देशात दरी निर्माण करणाऱ्या भावनांना खतपाणी घातले आहे. म्हणूनच, हा खोटा प्रचार केला गेला की डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेमुळे काही राज्यांचे नुकसान होईल! प्रत्यक्षात सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले आहे की, कोणत्याही राज्याच्या भागीदारीचे प्रमाण बदलणार नाही, किंवा कोणाचे प्रतिनिधित्वही कमी होणार नाही. उलट, सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणातच वाढतील. तरीही काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्ष हे मान्य करायला तयार झाले नाहीत.

मित्रांनो,

हे दुरुस्ती विधेयक सर्व पक्षांसाठी आणि सर्व राज्यांसाठी एक संधी होती. हे विधेयक मंजूर झाले असते तर तामिळनाडू, बंगाल, उत्तर प्रदेश, केरळ, प्रत्येक राज्याच्या जागा वाढल्या असत्या. पण आपल्या स्वार्थी राजकारणामुळे या पक्षांनी आपल्या राज्यातील जनतेलाही फसवले आहे. उदाहरणार्थ, डीएमकेकडे संधी होती की ते आणखी तमिळ लोकांना खासदार, आमदार बनवू शकले असते, तामिळनाडूचा आवाज अधिक मजबूत करू शकले असते! पण त्यांनी ती संधी गमावली. टीएमसीकडेही बंगालच्या जनतेला पुढे नेण्याची संधी होती, पण टीएमसीने देखील ही संधी गमावली. समाजवादी पक्षाकडेही आपली महिलाविरोधी प्रतिमा पुसण्याची संधी होती, पण समाजवादी पक्षाने ही संधी चुकवली. समाजवादी पक्ष लोहियाजींना तर आधीच विसरला आहे. समाजवादी पक्षाने नारीशक्ती वंदन दुरुस्तीला विरोध करून लोहियाजींची सर्व स्वप्ने पायदळी तुडवली आहेत. समाजवादी पक्ष महिला आरक्षण विरोधी आहे, हे उत्तर प्रदेश आणि देशातील महिला कधीही विसरणार नाहीत.

मित्रांनो,

ही तीच काँग्रेस आहे, जिने जनधन-आधार-मोबाईल या त्रिशक्तीला विरोध केला. काँग्रेसने डिजिटल पेमेंटला विरोध केला, काँग्रेसने जीएसटीला विरोध केला, काँग्रेसने सामान्य वर्गातील गरिबांच्या आरक्षणाला विरोध केला, काँग्रेसने तिहेरी तलाक विरुद्धच्या कायद्याला विरोध केला. काँग्रेसने कलम 370 हटवण्यास विरोध केला. आपले संविधान, आपले न्यायालय ज्या 'समान नागरी कायद्या'ला आवश्यक मानतात, काँग्रेसने त्यालाही विरोध केला. 'सुधारणा' हे नाव ऐकताच काँग्रेस विरोधाची पाटी घेऊन धावू लागते. देशाची ताकद वाढवणारे असे कोणतेही काम असो, त्यात अडथळे निर्माण करण्यासाठी काँग्रेस आपली सर्व शक्ती पणाला लावते. काँग्रेस 'एक देश एक निवडणूक' ला विरोध करते, काँग्रेस देशातून घुसखोरांना हाकलून देण्यास विरोध करते, काँग्रेस मतदार यादीच्या शुद्धीकरणाला, एसआयआरला विरोध करते, काँग्रेस वक्फ बोर्डातील सुधारणांना विरोध करते.

मित्रांनो,

काँग्रेसने निर्वासितांना सुरक्षा देणाऱ्या सीएए (CAA) कायद्यालाही विरोध केला. याविषयी खोटे बोलून, अफवा पसरवून देशात गोंधळ निर्माण केला. देशातील माओवादी-नक्षलवादी हिंसाचार संपवण्याच्या प्रयत्नांमध्येही काँग्रेसने अडथळे आणले आहेत. काँग्रेसचा एकच पॅटर्न राहिला आहे – कोणतीही सुधारणा आली की खोटे बोला आणि भ्रम पसरवा. इतिहास साक्षी आहे, काँग्रेसने नेहमीच हा नकारात्मक मार्ग निवडला आहे.

मित्रांनो,

जो निर्णय देशासाठी आवश्यक असतो, तो काँग्रेसने कायमच कार्पेटच्या खाली दडपून ठेवला. काँग्रेसच्या याच वृत्तीमुळे भारताला अपेक्षित विकासाची उंची गाठता आली नाही, ज्याचा भारत खऱ्या अर्थाने हक्कदार आहे. स्वातंत्र्याच्या काळात आपल्यासोबत इतरही अनेक देश स्वतंत्र झाले होते. त्यातील बहुतेक देश आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेले आणि त्याचे कारण हेच होते की काँग्रेसने प्रत्येक सुधारणा रोखून धरली. लटकवणे, भटकवणे आणि अडकवणे हेच काँग्रेसचे तत्व राहिले आहे, हीच काँग्रेसची कार्यसंस्कृती राहिली आहे. काँग्रेसने शेजारील देशांसोबतचे सीमावाद लटकवून ठेवले, काँग्रेसने पाकिस्तानसोबतच्या पाणीवाटपाचे वाद लटकवून ठेवले, काँग्रेसने ओबीसी आरक्षणाचा निर्णय 40 वर्षांपर्यंत लटकवून ठेवला. काँग्रेसने सैनिकांसाठी 'वन रँक वन पेन्शन'चा निर्णय ४० वर्षांपर्यंत रोखून ठेवला.

मित्रांनो,

काँग्रेसच्या या वृत्तीमुळे नेहमीच देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसचा प्रत्येक विरोध, प्रत्येक न घेतलेला निर्णय, प्रत्येक कट- कारस्थानांचा फटका देशाने सोसला आहे, देशाच्या अनेक पिढ्यांनी सोसला आहे. आज देशासमोर जितकी मोठी आव्हाने आहेत, ती काँग्रेसच्या याच वृत्तीमुळे निर्माण झाली आहेत. म्हणूनच, ही लढाई केवळ एका कायद्याची नाही, ही लढाई काँग्रेसच्या त्या सुधारणाविरोधी मानसिकतेविरुद्ध आहे, ज्यामध्ये केवळ नकारात्मकता भरलेली आहे. आणि मला यात शंका नाही की, देशातील सर्व माता-भगिनी आणि मुली काँग्रेसच्या या मानसिकतेचा नक्कीच चोख प्रत्युत्तर देतील.

मित्रांनो,

काही लोक देशातील महिलांच्या स्वप्नांचा भंग झाला, याला सरकारचे अपयश म्हणत आहेत. परंतु, हा विषय यश-अपयश किंवा श्रेयाचा नाही. मी संसदेतही म्हटले होते की, निम्म्या लोकसंख्येला त्यांचा हक्क मिळू द्या, मी जाहिराती देऊन याचे श्रेय विरोधी पक्षातील सर्व लोकांना देण्यासही तयार आहे. परंतु, महिलांकडे जुन्या, संकुचित विचारांनी पाहणारे लोक तरीही आपल्या चुकीच्या भूमिकेवर ठाम राहिले.

मित्रांनो,

नारी शक्तीला सहभाग मिळवून देण्याची लढाई अनेक दशकांपासून सुरू आहे. अनेक वर्षांपासून मीदेखील यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक आहे. कितीतरी महिलांनी हा विषय माझ्यासमोर मांडला आहे. अनेक भगिनींनी पत्राद्वारे मला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. माझ्या देशातील माता-भगिनी आणि मुलींनो, मी जाणतो की आज तुम्ही सर्व दुःखी आहात. तुमच्या या दुःखात मीदेखील सहभागी आहे. आज जरी विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले 66% मते आपल्याला मिळाली नसली, परंतु मला खात्री आहे की, देशातील 100% नारी शक्तीचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. मी देशातील प्रत्येक नारीला विश्वास देतो की, महिला आरक्षणाच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा आम्ही संपवू, तो दूर करूनच राहू. आमचा निर्धार ही ठाम आहे, आमची हिंमतही अढळ आहे आणि आमचा संकल्प ही ठाम आहे. महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष, देशातील नारी शक्तीचा संसद आणि विधानसभांमधील सहभाग वाढण्यापासून कधीही रोखू शकणार नाहीत, आता फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे. नारी शक्तीच्या सक्षमीकरणाचा भाजप-एनडीएचा संकल्प अढळ आहे. काल आपल्याकडे संख्याबळ नव्हते, पण याचा अर्थ असा नाही की हा आपला पराजय आहे. आमचे आत्मबळ अजेय आहे. आमचे प्रयत्न थांबणार नाहीत, आमचे प्रयत्न मंदावणार नाहीत. आमच्याकडे भविष्यात आणखी संधी येतील, आपल्याला निम्म्या लोकसंख्येच्या स्वप्नांसाठी, देशाच्या भविष्यासाठी हा संकल्प पूर्ण करायचाच आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2253441) अभ्यागत कक्ष : 27