पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेटवर्क18 रायझिंग भारत शिखर परिषदेत भाषण


आत्मविश्वासयुक्त भारत हा साशंकता आणि निराशेतून बाहेर पडल्यामुळेच विकसित देश भारतासोबत व्यापार करार करण्यास उत्सुक: पंतप्रधान

गेल्या 11 वर्षात, देशाच्या चेतनेत नवीन ऊर्जेचा संचार, आपले उचित सामर्थ्य पुन्हा प्राप्त करण्याचा भारताचा ठाम निर्धार: पंतप्रधान

भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा हा आज जगात चर्चेचा विषय: पंतप्रधान

आज, भारताच्या प्रत्येक हालचालीवर जग बारकाईने लक्ष ठेवत असून त्यांचे विश्लेषण केले जात आहे, एआय समिट हे याचे स्पष्ट उदाहरण: पंतप्रधान

राष्ट्राची उभारणी कधीही अल्पकाळाच्या विचाराने होत नाही; दीर्घकालीन दृष्टिकोन, संयम आणि वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे ती आकारास येते: पंतप्रधान

Posted On: 27 FEB 2026 11:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "स्ट्रेंथ विदीन" या विषयावर आधारित रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकत देशाचे गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त करणे, आर्थिक स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठीचा आराखडा या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, "आपल्या धर्मग्रंथांमध्ये 'तत् त्वम् असि' असे म्हटले आहे, त्याचा अर्थ असा आहे की, ज्या ब्रह्माचा आपण शोध घेत आहोत ते आपल्यामध्येच दडलेले आहे. आपण आपल्यामध्ये असलेली क्षमता ओळखणे गरजेचे आहे. गेल्या 11 वर्षांत, भारताने आपले तेच सामर्थ्य ओळखले असून ते सशक्त करण्याचा तो निरंतर प्रयत्न करत आहे."

देशात सामर्थ्य अचानक जन्मास येत नाही, ते पिढ्यानपिढ्या निर्माण होत जाते असे पंतप्रधानांनी नमूद केले. गेल्या 11 वर्षांत, भारत सक्रियपणे आपले गमावलेले सामर्थ्य पु्न्हा प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असताना राष्ट्रीय चेतनेत एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे यावर मोदींनी भर दिला. देश आता उत्पादन, उत्पादनाचा दर्जा वाढविण्यासोबत भक्कम पाया तयार करण्यासाठी आर्थिक धोरणे मजबूत करण्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "बँकिंग व्यवस्था मजबूत करून आणि दोन-अंकी महागाई दर यशस्वीरित्या नियंत्रणात ठेवून, सरकारने भारताला प्रभावीपणे जगाच्या विकासाचे इंजिन बनविले आहे." 

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताने प्राप्त केलेल्या अग्रस्थानाची चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी जनधन, आधार आणि मोबाईल या 'त्रिमूर्ती'चा उल्लेख करत, इतर देशांच्या सरकारांचे प्रमुख याबद्दल बहुतेकदा जाणून घेण्यास उत्सुक असतात असे सांगितले. त्यांनी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) च्या यशाचा उल्लेख केला, यामुळे कोणत्याही गळतीशिवाय लाभार्थ्यांना 24 लाख कोटी रु. वितरित करण्यात केले गेले आहेत. पूर्वीच्या काळात जिथे 30 दशलक्ष कुटुंबे वीजेपासून वंचित होती तोच देश आता सौरऊर्जा निर्मितीत आघाडीचा देश बनला आहे तसेच वंदे भारत आणि नमो भारतच्या काळात रेल्वे व्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी मेट्रो नेटवर्क बनली आहे यावरही त्यांनी भर दिला.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विषयावर पंतप्रधान म्हणाले, "मागील औद्योगिक क्रांतीमध्ये भारत आणि ग्लोबल साऊथ केवळ क्रांतीचा लाभ घेणारे अनुयायी होते. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात भारत निर्णयांमध्ये भागीदार आहे आणि त्यांना आकार देत आहे. आज आपली स्वतःची कृत्रिम बुद्धिमत्ता नवोन्मेष परिसंस्था आहे आणि आपण माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जा गरजांवर वेगाने काम करत आहोत."  मोदी यांनी पुढे असेही नमूद केले की, 100 हून अधिक देशांच्या सहभागासह झालेली कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद हा अभिमानाचा क्षण होता.

आज स्वावलंबनामध्ये केलेली गुंतवणूक भावी पिढ्यांसाठी आवश्यक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. "येणाऱ्या अनेक दशकांसाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आज आपण सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करत आहोत आणि हरित हायड्रोजन, सौर ऊर्जा, इथेनॉल मिश्रण, संरक्षण उत्पादन, मोबाईल निर्मिती, ड्रोन तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिज पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहोत,” पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  राष्ट्र उभारणी कधीही तात्कालिक विचाराने होत नाही; ती एका मोठ्या दृष्टीकोनातून, संयमाने आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांनी होते, असे ते म्हणाले.

शेतीसाठी 28 लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे, जे पूर्वीच्या काळापेक्षा चार पटीने अधिक आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले,  मोदी यांनी सांगितले की, पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. "या सुधारणांमुळे आपला देश आघाडीच्या कृषी निर्यातदार राष्ट्रांपैकी एक बनत आहे," असे मोदी यांनी अधोरेखित केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी सर्व नागरिक आणि संस्थांना आवाहन केले, "मी लाल किल्ल्यावरून म्हटले आहे की—हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. भारताला नवीन उंचीवर नेण्याची हीच वेळ आहे. प्रत्येक व्यक्तीने उत्कृष्टतेचे ध्येय ठेवावे... आपण केवळ नित्यनेमाचे काम करू नये, तर जागतिक दर्जाचे काम केले पाहिजे."

 

 

 

 

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/शैलेश पाटील/मंजिरी गानू/दर्शना राणे


(Release ID: 2233849) अभ्यागत कक्ष : 9