सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत गोव्यात 27 फेब्रुवारीला भव्य युवा रॅली
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्रकुमार कार्यक्रमाला राहणार उपस्थित
Posted On:
25 FEB 2026 3:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2026
नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत गोव्यात 27 फेब्रुवारीला अमली पदार्थांविरोधात भव्य युवा रॅली काढण्यात येणार आहे. नशामुक्त भारत अभियान आपल्या सहाव्या वर्षात एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने, गोवा सरकारच्या सहयोगाने 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 09:00 वाजता बांबोलीम इथल्या श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे नशा मुक्त भारत अभियान (एनएमबीए) अंतर्गत एक भव्य सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
या विशेष कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक, विशेषतः तरुण सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यात 3,000 हून अधिक लोक प्रत्यक्ष सहभागी होण्याचा अंदाज असून या अभियानाअंतर्गत गोव्यातील या आयोजनामुळे हा सर्वात मोठ्या जागरूकता कार्यक्रमांपैकी एक ठरेल.
या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, गोवा सरकारचे समाज कल्याण मंत्री, तसेच इतर मान्यवर, अतिविशिष्ट व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- अमली पदार्थांविरोधात भव्य युवा रॅलीचे आयोजन
- अमली पदार्थांविरोधात सामूहिक प्रतिज्ञा(ऑनलाईन आणि ऑफलाईन) घेणे
- सांस्कृतिक कार्यक्रम आणि सादरीकरणे
- सक्रिय सहभागी आणि भागीदारांचे स्वागत
- नशा मुक्त भारत अभियानात साध्य कामगिरी आणि यशोगाथा सामायिक करणे
कोण सहभागी होणार: शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवावर्ग, पालक, बचत गट, स्वयंसेवक, विभागाचे अधिकारी, आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी, बिगर सरकारी संस्था, पोलिस कर्मचारी, नागरी समाज गट आणि नागरिक.
नशामुक्त भारत अभियानाची पार्श्वभूमी:
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने 15 ऑगस्ट2020 रोजी सुरू केलेले, नशा मुक्त भारत अभियान सुरुवातीला सर्वाधिक संवेदनशील 272 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले आणि आता ते देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये विस्तारित करण्यात आले आहे.
हे अभियान जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित करते. यात उच्च शैक्षणिक संस्था, विद्यापीठ परिसर, शाळा आणि समुदाय-स्तरीय पोहोच यावर विशेष भर दिला जातो.
आतापर्यंतची प्रमुख कामगिरी:
- अमली पदार्थांच्या समस्येबाबत 25.93 कोटींहून अधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.
- 9.35 कोटींहून अधिक युवकांशी संपर्क.
- 6.38 कोटींहून अधिक महिलांमध्ये जागृती करण्यात आली आहे.
- 16.15 लाखांहून अधिक शैक्षणिक संस्थांचा सहभाग सुनिश्चित करण्यात आला असून यामुळे मुले व युवांपर्यंत व्यापक स्तरावर पोहोच साध्य झाली आहे.
धोरणात्मक भागीदारी: जनजागृतीच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी विभागाने आठ प्रमुख आध्यात्मिक संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत: द आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रह्माकुमारी, संत निरंकारी मिशन, इस्कॉन, श्री राम चंद्र मिशन, ऑल वर्ल्ड गायत्री परिवार, शिवानंद योग वेदांत धन्वंतरी आश्रम आणि पतंजली विद्यापीठ.
डिजिटल व्याप्ती:
- ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सक्रिय अधिकृत सोशल मीडिया हँडल्स
- सर्वसमावेशक माहिती, डॅशबोर्ड, ई-प्रतिज्ञा सुविधा, चर्चा मंच आणि संसाधने प्रदान करणारे समर्पित एनएमबीए संकेतस्थळ
अलीकडील उल्लेखनीय कार्यक्रम:
- 5 वा वर्धापन दिन सोहळा - दिल्ली येथे एनसीटी दिल्ली सरकारच्या सहयोगाने 13 ऑगस्ट 2025 रोजी कार्यक्रम (1,000 हून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी तर देशभरातून लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग)
- भव्य राष्ट्रीय कार्यक्रम - अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठ येथे, 18 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजन (10,000 हून अधिक प्रत्यक्ष सहभागी; तर देशभरातून 2.10 लाखांहून अधिक ठिकाणी 6.3 कोटींहून अधिक लोकांचा सहभाग)
गोवा कार्यक्रमाचे उद्दिष्ट: अभियानाची प्रगती आणि कामगिरी अधोरेखित करणे; मोठ्या प्रमाणात समुदाय सहभाग वाढवणे; नागरिकांना विशेषतः तरुणांना अमली पदार्थांच्या प्रतिरोधासाठी प्रेरित करणे आणिआणि नशामुक्त भारत निर्माण करण्यासाठी सामूहिक संकल्प मजबूत करणे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग व गोवा सरकार सर्व नागरिकांना, विशेषतः युवांना, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आणि अमली पदार्थमुक्त समाजासाठी या चळवळीत भागीदार होण्यासाठी आमंत्रित करत आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2232653)
अभ्यागत कक्ष : 27