कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या वृक्षारोपणाच्या प्रतिज्ञेला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 19 फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रम


एका दिवसाला एक रोपटे : केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिला पर्यावरण संरक्षण ही जीवनशैली बनवण्‍याचा संदेश

Posted On: 18 FEB 2026 10:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री  शिवराज सिंह चौहान यांनी 19 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी पुसा, नवी दिल्ली येथील एपी शिंदे सभागृहामध्ये आपल्या  अनोख्या वृक्षारोपणाच्या प्रतिज्ञेला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पाच वर्षापूर्वी -  19 फेब्रुवारी, 2021 रोजी नर्मदा जयंतीनिमित्त त्यांनी अमरकंटक येथे 'रुद्राक्ष' आणि 'साल' यांची  रोपे लावली आणि दररोज किमान एक रोप लावण्याचा संकल्प केला. त्यावेळी  त्यांनी सुरू केलेल्या 'हिरव्या' प्रवासानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन  केले आहे. ही प्रतिज्ञा घेतल्यापासून, त्यांनी दृढ वचनबद्धतेने आणि सातत्य राखून रोज एक रोपटे लावले. दररोज वृक्षारोपण करणे,  हा त्यांच्या दिनचर्येचा भाग बनला आणि पर्यावरणाविषयी असलेल्या  जबाबदारीचा  सार्वजनिक संदेश देणे हाही अविभाज्य भाग त्यांनी बनवला.

येत्या 19  फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचा प्रारंभ पाच रोपट्यांची  समारंभपूर्वक लागवड करून  होईल. शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेली  प्रतिज्ञा आणि त्याप्रमाणे कार्यामध्‍ये राखलेले  सातत्य आणि हिरव्यागार भविष्यासाठी  वचनबद्धतेचे प्रतीक आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होईल, याप्रसंगी शिवराज सिंह चौहान यांनी जे दररोज वृक्षारोपण केले, त्‍या पाच वर्षांच्या प्रवासावर आधारित एक विशेष दृक-श्राव्यफीत दाखवली जाणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक सादर केले जाईल.

‘दैनिक वृक्षारोपण’ प्रतिज्ञेची पार्श्वभूमी

19 फेब्रुवारी, 2021 रोजी नर्मदा जयंतीनिमित्त, शिवराज सिंह चौहान यांनी अमरकंटक येथे नर्मदा नदीच्या काठावर  रोपे लावली आणि दररोज किमान एक रोप लावण्याचा संकल्प केला. त्या दिवसापासून, त्यांनी हे काम  कोणत्याही व्यत्ययाशिवाय आणि  कसल्याही कारणामुळे  विरामाशिवाय चालू ठेवले आहे.

काही वर्षांपूर्वी कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या कठीण काळात, सार्वजनिक जीवन मोठ्या प्रमाणात थांबले होते, त्यावेळीही त्यांच्या वृक्षारोपणाच्या प्रतिज्ञेमध्‍ये खंड पडला  नाही. मंत्री  शिवराज सिंह चौहान गृहराज्यात असो, अथवा देशाच्या इतर भागात असो किंवा परदेशातही असो, त्यांनी पर्यावरणाविषयी असलेली आपली जबाबदारी पार पाडली आणि दररोज एक रोपटे लावणे सुरू ठेवले. आता, या वैयक्तिक प्रतिज्ञा अंतर्गत लावलेल्या रोपट्यांची संख्या 6000 च्या पुढे गेली आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2230031) अभ्यागत कक्ष : 7