पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन


भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र आजपासून नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले असून सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ केंद्र म्हणून उदयाला येईल : पंतप्रधान

अलिकडच्या वर्षांत, भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राने अभूतपूर्व वेगाने प्रगती केली असून आज, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे : पंतप्रधान

आम्ही मोठी स्वप्ने पाहत आहोत, भव्य निर्मिती करत आहोत आणि सर्वोत्तम गोष्टींचे वितरण करत आहोत : पंतप्रधान

गुंतवणूक करणाऱ्यांना आम्ही भारतात केवळ गुंतवणूकदार म्हणून बघत नाही तर सह निर्माते आणि विकसित भारताच्या दिशेने सुरु असलेल्या आमच्या प्रवासातील भागधारक समजतो : पंतप्रधान

Posted On: 26 NOV 2025 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राने अभूतपूर्व गतीने प्रगती केली आहे हे अधोरेखित करुन पंतप्रधान म्हणाले की आज भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या देशांतर्गत हवाईवाहतूक बाजारपेठेपैकी एक आहे. भारताची देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ जागतिक स्तरावरील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय लोकांच्या महत्त्वाकांक्षा नवीन उंची गाठत आहेत आणि त्याचवेळी देशातील हवाई वाहतुकीची मागणी देखील सातत्याने वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी विमान कंपन्या आपला सक्रिय ताफा सातत्याने वाढवत आहेत. भारतीय विमान कंपन्यांनी 1,500 हून अधिक नवीन विमानांसाठी ऑर्डर दिल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असताना, देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्रांची आवश्यकता देखील वाढली आहे, भारतातील देखभाल, दुरुस्ती आणि संधारणाचे 85 टक्के काम देशाच्या बाहेर केले जाते, ज्यामुळे किंमत वाढते, काम पूर्ण होण्यासाठी लागणारा अवधी वाढतो आणि विमान दीर्घकाळासाठी उड्डाण करु शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. भारतासारख्या मोठ्या हवाईवाहतूक बाजारपेठेला अशाप्रकारची परिस्थिती योग्य नाही. त्यामुळे केंद्र सरकार देशाला जगातील मोठ्या एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्रांपैकी एक बनवत आहे. एखाद्या जागतिक इंजिन ओईएम (Original Equipment Manufacturer-मूळ उपकरण निर्माता ) ने भारतात सखोल स्तरावरील देखभाल सुविधा सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

सफ्रानचे जागतिक स्तरावरील प्रशिक्षण, ज्ञानाचे आदानप्रदान आणि भारतीय संस्थांशी केलेल्या भागीदारीमुळे देशात येत्या काही वर्षात कुशल कार्यबल तयार होईल, आणि संपूर्ण देखभाल, दुरुस्ती आणि संधारण परिसंस्थेला नवीन गती आणि दिशा लाभेल, या सुविधा केंद्रामुळे दक्षिण भारतातील असंख्य युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले. भारताला केवळ विमान वाहतूक क्षेत्रातील एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि संधारण) संबंधित बाबींपर्यंतच मर्यादित राहायचे नसून जहाजबांधणीशी संबंधित एमआरओ परिसंस्था विकसित करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे असे त्यांनी सांगितले.

भारत प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर डिझाइन इन इंडियाला प्रोत्साहन देत आहे असे ते म्हणाले. सफ्रानने भारतात विमान इंजिन आणि संबंधित घटकांच्या डिझाइनच्या शक्यतांची चाचपणी करावी असे आवाहन त्यांनी केले. या प्रयत्नांमध्ये देशात सुक्ष्म लघू आणि मध्यम क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले जाळे आणि इथली विपूल युवा प्रतिभा मोठे पाठबळ पुरवतील असे त्यांनी नमूद केले. सफ्रान एअरोस्पेस, अंतराळयान प्रणोदन प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. कंपनीने प्रणोदन डिझाइन आणि उत्पादनासाठी भारताच्या प्रतिभेचा आणि संधींचा लाभ घ्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

आजचा भारत केवळ मोठी स्वप्ने पाहत नाही, तर मोठे निर्णयही घेत आहे आणि त्याहून मोठे यश साध्य करत आहे अस ते म्हणाले. आपण मोठी स्वप्ने पाहतो आहोत, त्याहून मोठे काम करतो आहोत आणि सर्वोत्तम परिणाम साध्य करत आहोत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आज देश प्राधान्याने व्यवसाय सुलभतेवर भर देत आहे असे त्यांनी सांगितले.

जागतिक गुंतवणूक आणि जागतिक उद्योगांना भारताकडे वळवण्यासाठी आम्ही स्वतंत्र भारतातील काही सर्वात मोठ्या सुधारणा केल्या. पहिल्यांदा अर्थव्यवस्थेची दारे खुली केली, दुसरे म्हणजे, देशाच्या मूलभूत आर्थिक घटकांना अधिक बळकटी दिली गेली. आणि तिसरे म्हणजे, व्यवसाय सुलभताही अधिक मजबूतीने विस्तारली गेली असे त्यांनी सांगितले.

आज बहुतांश क्षेत्रांमध्ये स्वयंचलित मार्गाद्वारे 100 टक्के परदेशी थेट गुंतवणूक शक्य झाली आहे. संरक्षणसारख्या क्षेत्रांतही, पूर्वी खासगी क्षेत्राला संधी नव्हती, मात्र आता स्वयंचलित मार्गातून 74 टक्के परदेशी थेट गुंतवणूक खुली करण्यात आली आहे असे ते म्हणाले. अंतराळ क्षेत्राच्या बाबतीतही असाच मोठा दृष्टिकोन अवलंबला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारताने उचललेल्या या पावलांमुळे भारतात गुंतवणुकीचे, नवोन्मेषाचे स्वागत केले जात असल्याचा संदेश जगाला पोहोचला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनांमुळे जागतिक उत्पादक मेक इन इंडियाकडे वळू लागले असल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या 11 वर्षांत 40,000 पेक्षा जास्त कंपनीविषयक अनुपालने कमी करण्यात आली आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. भारताने उद्योग व्यवसाय संबंधित शेकडो तरतुदी फौजदारी गुन्ह्यातून वगळल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय एक खिडकी व्यवस्थेमुळे अनेक मंजुऱ्या एकाच मंचाच्या माध्यमातून मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले.

वस्तू आणि सेवा करातील सुधारणा, फेसलेस कर मूल्यांकन, नवीन कामगार संहिता तसेच दिवाळखोरी आणि नादारी संहिता या सर्वांमुळे प्रशासन पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि पारदर्शक झाले असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे भारताकडे आता एक विश्वासार्ह भागीदार, एक मोठी बाजारपेठ आणि उदयोन्मुख वस्तुनिर्माण केंद्र म्हणून पाहिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

आज भारताकडे जलद प्रगती, स्थिर सरकार, सुधारणा-केंद्रित मानसिकता, विपुल प्रमाणातील युवा प्रतिभा आणि मोठ्या देशांतर्गत बाजारपेठेचे बळ आहे असे त्यांनी अधोरेखित केले. जे भारतात गुंतवणूक करत आहेत, त्यांना देश केवळ गुंतवणूकदार म्हणून नाही, तर सहनिर्माते आणि विकसित भारताच्या प्रवासातील भागधारक मानतो, असे ते म्हणाले. भारतावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणे हा या दशकातील सर्वात हुशारीचा व्यावसायिक निर्णय आहे, हीच बाब भारत सिद्ध करून दाखवत असल्याचे त्यांनी नमूद केले. या आधुनिक एमआरओ सुविधेच्या स्थापनेबद्दल त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, केंद्रीय मंत्री के राम मोहन नायडू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय), ही सफ्रानची लीप(LEAP-Leading Edge Aviation Propulsion) इंजिनसाठीची एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा आहे. ही इंजिन्स एअरबस 320neo आणि बोईंग 737 MAX विमानांना बळ पुरवतात. या सुविधेचा प्रारंभ हा एक मैलाचा टप्पा आहे. कारण,ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या विमान इंजिन एमआरओ सुविधांपैकी एक आहेच, शिवाय एखाद्या जागतिक इंजिन ओईएम (Original Equipment Manufacturer-मूळ उपकरण निर्माता ) ने भारतात एमआरओ संचालन सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझमध्ये 45,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेली, सुमारे ₹1,300 कोटींच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह विकसित केलेली ही अत्याधुनिक सुविधा आहे. दरवर्षी 300 लीप इंजिनना सेवा देण्यासाठी आखलेली, सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधा, 2035 पर्यंत पूर्ण कार्यक्षमता प्राप्त केल्यानंतर 1,000 हून अधिक उच्च कुशल भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना रोजगार देईल. या सुविधेत जागतिक दर्जाच्या इंजिन देखभाल आणि दुरुस्ती सेवा देण्यासाठी प्रगत प्रक्रिया उपकरणे असतील.

ही एमआरओ सुविधा विमानचालन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक मोठे पाऊल असेल. एमआरओमध्ये स्वदेशी क्षमता विकसित केल्याने परकीय चलनाचा बाहेर जाणारा ओघ कमी होईल, उच्च-मूल्य रोजगार निर्माण होईल, पुरवठा-साखळी लवचिकता मजबूत होईल आणि भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून स्थान मिळेल. केंद्र सरकार या क्षेत्राच्या वेगवान वाढीला पाठबळ देण्यासाठी एक मजबूत एमआरओ परिसंस्था तयार करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. सरकारच्या प्रमुख धोरणात्मक उपक्रमांमध्ये 2024 मधील जीएसटी सुधारणा, एमआरओ मार्गदर्शक तत्त्वे 2021 आणि राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरण 2016 यांचा समावेश आहे. कर संरचना तर्कसंगत करून आणि रॉयल्टीचा भार कमी करून एमआरओ प्रदात्यांसाठी परिचालन सुलभ करण्यात आले आहे.

 

 

सोनाली काकडे/भक्ती सोनटक्के/तुषार पवार/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2194639) Visitor Counter : 5