रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 25-26 मध्ये 1 अब्ज टन मालवाहतुकीचा टप्पा ओलांडला
कोळसा, लोहखनिज, सिमेंट आणि कंटेनर वाहतुकीच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत मोठा यशस्वी टप्पा गाठला; मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दैनंदिन मालवाहतूक 4.4 दशलक्ष टनांवर
मोठ्या प्रमाणात वस्तूंची वाहतूक रेल्वेकडे वळवली गेल्याने कार्बन उत्सर्जन कमी होत असून, महामार्गांवरील कोंडी कमी झाली आहे, उद्योग व्यवसायांना तसेच ग्राहकांना लाभ मिळून, अधिक पर्यावरणपूरक, किफायतशीर दरातील मालवाहतूक पर्याय उपलब्ध झाले आहेत
Posted On:
22 NOV 2025 4:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025
भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक सेवेने दमदार कामगिरी नोंदवत भारताच्या आर्थिक कण्याला बळकटी दिली आहे. भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक सेवेने या वर्षभरात एकत्रितपणे 1 अब्ज टनांचा टप्पा ओलांडला असून, 19 नोव्हेंबर पर्यंतची मालवाहतूक 1020 दशलक्ष टनांवर पोहोचली आहे.
विविध प्रमुख क्षेत्रांनी पुरवलेल्या व्यापक पाठबळामुळे हे यश साध्य झाले आहे. या मालवाहतुकीत सर्वाधिक 505 दशलक्ष टन इतका वाटा कोळशाचा आहे. त्याखालोखाल लोहखनिज (115 दशलक्ष टन), सिमेंट (92 दशलक्ष टन), कंटेनर वाहतूक (59 दशलक्ष टन), पिग आयर्न आणि तयार पोलाद (47 दशलक्ष टन), खते (42 दशलक्ष टन), खनिज तेल (32 दशलक्ष टन), अन्नधान्य (30 दशलक्ष टन), स्टील प्रकल्पांसाठीचा कच्चा माल (अंदाजे 20 दशलक्ष टन), आणि उर्वरित इतर वस्तू (74 दशलक्ष टन) यांचा समावेश आहे. दैनंदिन मालवाहतुकीअंतर्गत मागच्या वर्षीच्या 4.2 दशलक्ष टन वाहतुकीच्या तुलनेत, यंदा सुमारे 4.4 दशलक्ष टन मालवाहतूक झाली आहे. यातून भारतीय रेल्वेची मालवाहतूक सेवेची सुधारित कार्यान्वयन क्षमता आणि सातत्यपूर्ण वाढती मागणी दिसून येते.

Coal Freight Train
एप्रिल ते ऑक्टोबर या महिन्यांदरम्यानच्या मालवाहतुकीतून या सकारात्मक प्रगतीची प्रचिती येते. 2025 मध्ये या कालावधीतील वाहतूक 935.1 दशलक्ष टनांवर पोहोचली, तर मागच्या वर्षी याच काळात मालवाहतुकीचे प्रमाण 906.9 दशलक्ष टन इतके होते. एका अर्थाने वर्षागणिक मालवाहतुकीत सुदृढ वाढीची नोंद होत गेली असल्याचे दिसून येते. या स्थीर गतीसह, दैनंदिन मालवाहतुकीच्या सुधारलेल्या प्रमाणातून भारताच्या औद्योगिक विस्तार आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठबळ देत राहण्याच्या भारतीय रेल्वेच्या क्षमतेचेही दर्शन घडले आहे.

Iron Loading
भारताच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीत सिमेंटची भूमिका महत्वाची आहे. याचीच दखल घेत रेल्वेने याबाबतीत आपल्या मालवाहतूक क्षमतांचा पुरेपुर वापर करून घेण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. मोठ्या प्रमाणातील सिमेंट टर्मिनल्स साठीचे धोरण आणि कंटेनरच्या वापराद्वारे सिमेंटच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीसाठी तर्कसंगत दर यांसारख्या अनेक सर्वसमावेशक सुधारणा अलिकडच्या काळात केल्या गेल्या आहेत. यातून सिमेंट वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी रेल्वे धोरणात्मक पातळीवर प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. मोठ्या प्रमाणात वस्तूमाल हाताळणीची क्षमता वाढवणे, वाहतुकीचा वेळ कमी करणे आणि मालवाहतुकीच्या खर्चात घट साध्य करणे हा या उपाययोजनांचा उद्देश आहे. यामुळे पुरवठा साखळीअंतर्गत कार्यक्षमतेत वाढत असून, अंतमतः उद्योग- व्यवसायांना तसेच ग्राहकांना थेट लाभ मिळतो आहे. निर्धारित उद्दिष्टांच्या दिशेने केलेल्या अशा उपाययोजना या क्षेत्राच्या परिवर्तनामागच्या कारक घटक ठरत आहेत.

Fertilisers Unloading
मोठ्या प्रमाणातील मालवाहतूक, रेल्वे सेवेकडे वळवल्याने व्यावसायिक स्वरुपातील लाभांशिवाय, इतर अनेक लाभही मिळत आहे. यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होत आहे, महामार्गांवरची वर्दळ कमी होऊन ते मोकळे होत आहे, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह इतर उद्योग व्यवसायांसाठीही, अधिक पर्यावरणपूरक मालवाहतुकीचे पर्याय उपलब्ध होऊ लागले आहे. अशा प्रकारच्या उपाययोजनांमुळे शाश्वत विकासाबद्दलची भारताची वचनबद्धता अधिक दृढ होत आहे. एकूणात भारतातील मालवाहतूक व्यवस्थेला देशाच्या शून्य कार्बन उत्सर्जनाच्या ध्येयपूर्तीला अनुकूल व्यवस्थेचे स्वरुप मिळू लागले असून, त्याला समांतरपणे रेल्वेने भारताच्या आर्थिक तसेच पर्यावरणविषयक प्रगतीचा उत्प्रेरक घटक म्हणून स्थान मिळवले आहे.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2192881)
Visitor Counter : 12