पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्राझीलमध्ये बेलेम येथे आयोजित कॉप-30 बैठकीच्या जोडीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतील नेत्यांच्या सत्रात भारताने लहान विकसनशील द्वीपराष्ट्रांसाठी उर्जा सुरक्षिततेसाठी संयुक्त जागतिक कृतीचे आवाहन केले

Posted On: 20 NOV 2025 2:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 नोव्हेंबर 2025

 

ब्राझीलमध्ये बेलेम येथे आयोजित हवामान बदलासंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या आराखडा परिषदेच्या कॉप30 बैठकीच्या जोडीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतील (आयएसए) उच्च-स्तरीय मंत्री पातळीवरील नेत्यांच्या सत्रातील लहान विकसनशील द्वीपराष्ट्रांच्या (एसआयडीएस) व्यासपीठाला केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केले. ‘बेटांना एकत्र आणून कृतीला प्रेरणा – उर्जा सुरक्षिततेसाठी नेतृत्व’ या संकल्पनेअंतर्गत आयोजित सदर कार्यक्रमाने उर्जा सुरक्षितता, परवडण्याची क्षमता आणि लवचिकता यासाठी सामूहिक कृतीमध्ये पुढाकार घेण्यासाठी लहान विकसनशील द्वीपराष्ट्रे (एसआयडीएस), आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतील (आयएसए) सदस्य देश तसेच भागीदार संघटनांना एकत्र आणले.

सत्राच्या संकल्पनेकडून प्रेरणा घेत, एसआयडीएस राष्ट्रांना आयात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व, हवामानामुळे येणारे अडथळे तसेच दुर्बल पायाभूत सुविधा यांसारख्या विलक्षण असुरक्षितांना सामोरे जावे लागते हे सांगण्यावर’ या कार्यक्रमाने अधिक भर दिला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री यादव यांनी आयएसएच्या माध्यमातून स्वच्छ उर्जेच्या मार्गांवर वाटचाल करण्यात एसआयडीएस देशांना पाठबळ देण्याप्रति भारताची कटिबद्धता अधोरेखित केली. अत्यंत आशावादी सुरात भाषण सुरु करताना केंद्रीय मंत्र्यांनी नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रात भारताने केलेली वेगवान प्रगती अधोरेखित केली आणि ते म्हणाले, “आज, भारताने 500 गिगावॉट स्थापित विद्युत क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे – आणि यापैकी निम्मी क्षमता स्वच्छ उर्जा प्रकारची आहे. भारताने यापूर्वीच 50% बिगर-जीवाश्म उर्जा क्षमता गाठली असून याबाबतीत आपला देश राष्ट्रीय पातळीवर निश्चित केलेल्या योगदानविषयक लक्ष्याच्या 5 वर्ष आघाडीवर आहे.”

भारत आता जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नवीकरणीय उर्जा उत्पादक देश आहे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सौर ऊर्जा उत्पादक देश आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि प्रमाण, वेग तसेच सामान्य जनतेचे सामर्थ्य यावर त्यांनी दाखवलेला विश्वास यामुळे हे शक्य झाले आहे.” मूलभूत स्तरावरील गाथा सामायिक करताना त्यांनी पंतप्रधान सूर्यघर छतावरील सौर ऊर्जा कार्यक्रमाबद्दल माहिती दिली आणि या योजनेचा लाभ मिळालेल्या एका शाळा शिक्षकाचा अनुभव कथन केला. या योजनेच्या लाभार्थ्याचे जीवन प्रत्येक महिन्याला भयभीत अवस्थेत वीज बिलाची प्रतीक्षा करणाऱ्या व्यक्तीपासून आता उत्पन्न मिळवून देणाऱ्या सूर्यप्रकाशाची वाट बघणाऱ्या व्यक्तीमध्ये कसे रुपांतरित झाले आहे याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली.

छतावरील सौर ऊर्जानिर्मिती योजनेला “प्रत्येक कुटुंबासाठी स्वातंत्र्य” आणि “प्रत्येक छतावर एक छोटे ऊर्जा निर्मिती संयंत्र” असे संबोधत, भारतातील 20 लाख कुटुंबांनी या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेत भाग घेतला आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. कृषी क्षेत्रासाठी सौर उर्जेचा वापर करण्यासंदर्भात ते म्हणाले, “कृषी क्षेत्रात सौर उर्जेचा वापर ही आपल्या शेतकरी समुदायासाठी एक नवी पहाट आहे. आता हे शेतकरी सूर्याच्या मदतीने काम करतात आणि रात्री शांत झोप घेतात.” शेतीच्या सर्व गरजा भागवण्यासाठी दिवसाच्या कालावधीत खात्रीशीरपणे सौर उर्जेच्या शक्तीसह स्वच्छ उर्जेचा वापर करून सौर पंप आणि सौर उर्जेवर चालणारे फीडर्स यामुळे शेती करणे अधिक खात्रीचे आणि अधिक सन्मानाचे झाले आहे.  आता शेतकऱ्यांना डिझेलची गरज नाही, प्रतीक्षा करण्याची गरज नाही त्यामुळे ताणतणावही नाही असे ते म्हणाले.

सामायिक जागतिक कृतीचे आवाहन करत केंद्रीय मंत्र्यांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले, “सौर ऊर्जा तांत्रिक मार्गांपेक्षा अधिक प्रकारांनी आपला प्रकाश पसरवत आहे. ही ऊर्जा म्हणजे आशा आणि सक्षमीकरण आहे. यामुळे स्वातंत्र्य मिळते, सन्मान मिळतो, शांतता लाभते.”

 

* * *

शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे


(Release ID: 2192045) Visitor Counter : 10