राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्रीनारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन


श्रीनारायण गुरूंचा एकतेचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की सर्व मानवांमध्ये समान दिव्य तत्व आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 23 OCT 2025 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2025

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (23 ऑक्टोबर, 2025) शिवगिरी मठ, वर्कला, केरळ येथे श्री नारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, श्री नारायण गुरु हे भारतातील महान आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारकांपैकी एक होते. ते एक संत आणि तत्वज्ञानी होते ज्यांनी आपल्या देशाच्या सामाजिक आणि आध्यात्मिक परिदृश्यावर प्रभाव पाडला. त्यांनी पिढ्यांना समानता, एकता आणि मानवतेवरील प्रेमाच्या आदर्शांवर विश्वास ठेवण्यास प्रेरित केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, 19व्या शतकात झालेल्या संपूर्ण भारतीय पुनर्जागरणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री नारायण गुरु यांनी अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या अंधारातून लोकांना मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा सर्व अस्तित्वाच्या एकात्मतेवर विश्वास होता. त्यांनी प्रत्येक जीवात देवाची दैवी उपस्थिती असल्याचे सांगितले आणि त्यांनी "मानवजातीसाठी एक जात, एक धर्म, एक देव" असा शक्तिशाली संदेश दिला.

त्यांची शिकवण धर्म, जात आणि पंथाच्या सीमांच्या पलीकडे गेली असे  राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. त्यांचा असा विश्वास होता की खरी मुक्ती ज्ञान आणि करुणेतून येते, अंधश्रद्धेने नाही. श्री नारायण गुरुंनी नेहमीच आत्मशुद्धी, साधेपणा आणि वैश्विक प्रेमावर भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, श्री नारायण गुरुंनी स्थापन केलेली मंदिरे, शाळा आणि सामाजिक संस्था शोषित समुदायांमध्ये साक्षरता, स्वावलंबन आणि नैतिक मूल्यांची केंद्रे म्हणून काम करत. मल्याळम, संस्कृत आणि तमिळ भाषेतील त्यांच्या कवितांमध्ये खोल तात्विक अंतर्दृष्टी आणि साधेपणा यांचा समावेश होता. त्यांच्या कृतींमध्ये मानवी जीवन आणि अध्यात्माबद्दलची त्यांची सखोल समज दिसून येते.

आजच्या जगात, श्री नारायण गुरूंचा संदेश अधिक प्रासंगिक बनतो यावर राष्ट्रपतींनी भर दिला. एकता, समानता आणि परस्पर आदर यासाठीचे त्यांचे आवाहन मानवतेला नेहमीच भेडसावणाऱ्या संघर्षांवर कालातीत उपाय देते, असे त्या म्हणाल्या. श्री नारायण गुरूंचा एकतेचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की सर्व मानवांमध्ये समान दैवी तत्व आहे.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2181900) Visitor Counter : 7