उपराष्ट्रपती कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा संग्रह असलेल्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या पुस्तकाच्या खंडांचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन
Posted On:
22 SEP 2025 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2025
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यामध्ये पंतप्रधानांच्या दुसऱ्या कार्यकाळातील चौथ्या आणि पाचव्या वर्षातील भाषणांचा समावेश आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या या प्रकाशन समारंभात बोलताना उपराष्ट्रपतींनी सर्वप्रथम देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा आपला हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती म्हणाले की, या दोन खंडांमधून आपल्याला पंतप्रधानांचे देशासाठीचे काम, दृष्टीकोन आणि स्वप्न समजून घेता येईल. पंतप्रधान मोदी देश-परदेशातील असंख्य लोकांचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या आचरणातून ते लोकांना प्रत्येक कामात आपले शंभर टक्के योगदान देण्याची प्रेरणा देतात. सामान्य माणसांचा प्रतिनिधी ते लोकांचा नेता हा त्यांचा प्रवास विलक्षण आहे. अशक्यप्राय गोष्टी शक्य कशा करता येतात ,नामुमकीन को मुमकीन करना, असंभव को संभव करना हे त्यांच्या निर्धारातून आपल्याला दिसून येते.
या दोन पुस्तकांमध्ये 2022-23 मधील 76 भाषणे व 12 मन की बात संदेश आणि 2023-24 मधील 82 भाषणे व 9 मन की बात संदेश एकत्रित करुन प्रत्येकी 11 विशिष्ट संकल्पनांनुसार त्यांची मांडणी करण्यात आली आहे, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले. ते म्हणाले, यामधून पंतप्रधानांची विचारांमधली स्पष्टता, भविष्यवेधी दृष्टीकोन आणि सर्वसमावेशक प्रशासनाप्रतीची वचनबद्धता दिसून येते. भाषणांची अचूक निवड व उत्कष्ट सादरीकरण यासाठी उपराष्ट्रपतींनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचेही अभिनंदन केले.

एक भारत श्रेष्ठ भारत, काशी तमिळ संगमम, जनजातीय गौरव दिवस आणि राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण यातून भारताची सांस्कृतिक ओळख पुनरुज्जिवित करण्यामधली पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उपराष्ट्रपती म्हणाले की, वारसा, इतिहास, भाषा आणि संस्कृती याविषयीची नव्याने वाढलेली आस्था हे देशाच्या अमृत काळाचे प्रतीक आहे. नव्या भारताचे सामर्थ्य आणि आकांक्षा समजून घेण्यात वाचकांना या पुस्तकांची मदत होईल. अमृत काळात आपल्या कर्तव्यांप्रती वचनबद्ध राहून 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याची प्रेरणा यातून मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
* * *
सुषमा काणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169751)