अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहकांना जीएसटी सवलतीचा फायदा देण्याचा आणि तळागाळापर्यंत लाभ पोहोचवण्याचा उद्योग क्षेत्रातील धुरिणांकडून दृढ संकल्प

Posted On: 11 SEP 2025 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) सहकार्याने आज अन्न प्रक्रिया क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांच्या  मुख्‍य कार्यकारी अधिकारी तसेच धुरिणांबरोबर  विशेष संवाद कार्यक्रमाचे  आयोजन केले. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गोलमेज परिषदेनमुळे  सरकार आणि उद्योग भागधारकांमध्ये खुल्या संवादासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले.महत्त्वाच्या जीएसटी सुधारणांसाठी पंतप्रधान, अर्थमंत्री आणि अन्न प्रक्रिया मंत्र्यांचे  उद्योग प्रतिनिधींनी आभार मानले. 

अमूल, ब्रिटानिया, कोका-कोला, डाबर, डीएस ग्रुप, आयटीसी, पेप्सिको, रसना, मार्स, ऑर्कला फूड्स, मोंडेलेझ, बिसलेरी, क्रेमिका फूड्स, मिसेस बेक्टर, श्रीनिवास फार्म्स, हायफुन फूड्स इत्यादी कंपन्यांमधील व्यावसायिक धुरिणांनी  स्वेच्छेने जीएसटी दर कपातीचे फायदे ग्राहकांना देण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी परिसंस्थेतील लहान उद्योगांविषयी संवेदनशील बनणे, शेतकऱ्यांना चांगले मूल्य मिळावे याची खात्री करणे आणि आयात वस्तूंना पर्याय शोधणे  आणि ‘’मेक इन इंडिया’’ची उद्दिष्टे पुढे नेणे यासाठी वचनबद्धता दर्शविली. उद्योग क्षेत्रातील धुरिणांनी  नमूद केले की,  या सुधारणांमुळे केवळ किंमती कमी होतीलच असे नाही;  तर मागणीलाही चालना मिळेल, ज्यामुळे संपूर्ण अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राचा विकास होईल.

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी आपल्या प्रमुख भाषणात, अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूक, नवोन्मेष आणि समावेशक वाढीसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी उद्योग धुरिणांना   जीएसटी प्रणालीच्या   सुसूत्रीकरणाचे फायदे,  शेतकरी आणि एमएसएमईपासून ग्राहकांपर्यंत मूल्य साखळीत समानतेने पोहोचवले जातील याची खात्री करण्याचे आवाहन केले.

आजच्या संवादाचे उद्दिष्ट ‘जीएसटी’मधील   सुधारणांच्या   सुरळीत अंमलबजावणीसाठी सामूहिक जबाबदारी वाढवणे आहे, यावर मंत्र्यांनी भर दिला.  उद्योजकांनी  या करसवलतीचे फायदे सर्व  ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी, असंघटित क्षेत्राचे औपचारिकीकरण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी  अधिक उत्पन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सक्रियतेने काम करण्याचे आवाहन केले.


सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165827) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi