आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील एकूण लोकसंख्येपैकी एकही लस न दिलेल्या (शून्य मात्रा) बालकांच्या टक्केवारीत 2023 मधील 0.11% वरून 2024 मध्ये 0.06% पर्यंत घट
बाल आरोग्याचे हे जगासाठी चांगले उदाहरण असल्याचा संयुक्त राष्ट्रसंघाच्या बालआरोग्य विषयक समितीच्या 2024 च्या अहवालात उल्लेख
लसीकरण न झालेल्या बालकांचे अधिक प्रमाण असलेल्या 11 राज्यांतील 143 जिल्ह्यांमध्ये शून्य मात्रा अंमलबजावणी आराखडा 2024 लागू
राष्ट्रीय लसीकरण दिवस आणि उप-राष्ट्रीय लसीकरण दिवसांद्वारे भारताने 2014 पासून टिकवला पोलिओमुक्त देशा हा दर्जा
Posted On:
28 JUN 2025 11:06AM by PIB Mumbai
लसीकरण ही सर्वात प्रभावी आणि कमी खर्चाची सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना ठरली आहे. भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या (यूआयपी) रुपाने त्याने लसीकरणाबद्दलची आपली अढळ बांधिलकी दाखवून दिली आहे. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 2.9 कोटी गर्भवती महिला आणि 2.6 कोटी अर्भकांना (0-1 वर्षे) मोफत लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्यात येते. आपल्या देशातील आशा आरोग्य सेवा कार्यकर्त्या आणि ANM द्वारे देशभरात 1.3 कोटींहून अधिक लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाते. देशभरातील या लसीकरणाशी संबंधित मोहिमांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि तीव्रतेने केलेल्या अंमलबजावणीचा परिणाम एकूण लोकसंख्येमध्ये शून्य डोस असलेल्या मुलांची टक्केवारी 2023 मधील 0.11% वरून कमी होऊन 2024 मध्ये 0.06% वर आली आहे.
या उपलब्धीमुळे बाल आरोग्यामध्ये भारत जगासाठी उदाहरण ठरला असून, त्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटर-एजन्सी ग्रुप ऑन चाइल्ड मॉरटॅलिटी एस्टिमेशन (UN IGME) ने 2024 च्या अहवालात कौतुक केले आहे. भारताला गोवर आणि रुबेला भागीदारी (अमेरिकन रेड क्रॉस, BMGF, GAVI, US CDC, UNF, UNICEF आणि WHO) द्वारे 6 मार्च 2024 रोजी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी येथे अमेरिकन रेड क्रॉस मुख्यालयात गोवर आणि रुबेला चॅम्पियन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
जीवरक्षक लसींच्या वाढलेल्या संख्येमुळे अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर आणि एन्सेफलायटीसमुळे मुलांमधील मृत्यू आणि विकृती कमी करण्यासाठीबाबत झालेला परिणामही स्पष्टपणे दिसून येत आहे.
ताज्या SRS (2020-22) नुसार, भारतातील माता मृत्यूचे प्रमाण (MMR) 2014-16 मधील एक लाख जिवंत जन्मांमागे 130 वरून 2020-22 मध्ये 88 वर आले आहे. युनायटेड नेशन्स मॅटर्नल मॉर्टॅलिटी एस्टिमेट्स इंटर-एजन्सी ग्रुप (UN-MMEIG 2000-2023) च्या अहवालानुसार, भारतातील MMR दर लाख जिवंत जन्मांमागे 80 इतका असून 1990 पासून जागतिक पातळीवर अशा मृत्यूंच्या संख्येत 48% घट झालेली असताना भारतात हे प्रमाण 86% नी घटल्याचे आढळते.
युनायटेड नेशन्स इंटर-एजन्सी ग्रुप ऑन चाइल्ड मॉर्टॅलिटी एस्टिमेशन (UNIGME 2024 अहवाल) च्या माहितीनुसार, भारतात पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यू दरात (U5MR) 78% घट झाली आहे, त्यामुळे जागतिक स्तरावरील नवजात मृत्यूंचा सरासरी दर (NMR) 54% असताना त्यामध्ये भारताने सरस कामगिरी केली आहे.
या शिवाय लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यावर भर देण्यासोबतच, भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात (यूआयपी) जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केलेल्या लसींच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे. 2013 पर्यंत, कार्यक्रमात केवळ 6 लसी उपलब्ध होत्या. 2014 पर्यंत, कार्यक्रमात सहा नवीन लसी (निष्क्रिय पोलिओव्हायरस लस, रोटाव्हायरस लस (RVV), न्यूमोकोकल संयुग्म लस (PCV), गोवर-रुबेला लस, जपानी एन्सेफलायटीस लस आणि टिटॅनस-डिप्थीरिया लस) समाविष्ट करण्यात आल्या. सध्या, भारताच्या UIP मध्ये 12 लस-प्रतिबंधक रोगांचा अंतर्भाव असून त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यावर सातत्याने भर देण्यासोबतच, भारताने सेवांपासून वंचित असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्रिय आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन अवलंबला आहे. भारत सरकारने, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करून, एकही लस न दिल्या गेलेल्या मुलांमधील समस्या, विशेषत: शहरातील झोपडपट्ट्या, पेरी-शहरी भाग, स्थलांतरित लोकसंख्या, दुर्गम भाग आणि लस घेण्यास टाळाटाळ केल्याने प्रभावित झालेल्या समुदायांमधील आरोग्य समस्या दूर करण्यासाठी लक्ष्यित मोहिमा सुरू केल्या आहेत. हे प्रयत्न गोवर आणि रुबेलाचे निर्मूलन करण्याच्या राष्ट्रीय ध्येयाशी सुसंगत आहेत.
***
A.Chavan/M.Ganoo/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140404)