इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये 417 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजुरी
Posted On:
25 JUN 2025 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2025
केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर येथे 417 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी 2.0) च्या उभारणीला मंजुरी दिली आहे. स्थानिक उत्पादन आणि नवोन्मेषाला चालना देणे हे याचे उद्दीष्ट आहे.
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. हा प्रकल्प राबवण्यात राज्य सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. हे ओळखून, प्रकल्पाची जलद अंमलबजावणी व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांना राज्यांबरोबर समन्वय साधून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रकल्पाबद्दल:
मंजूर झालेला ईएमसी 2.0 प्रकल्प यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणा (YEIDA) द्वारे विकसित केला जाईल. हे क्लस्टर 200 एकर क्षेत्रावर असेल आणि त्यामध्ये 2,500 कोटी रुपये गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे.
अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले, “या प्रकल्पामुळे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील आणि 15,000 रोजगार निर्मिती होईल. भारतात उत्पादनाला चालना देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाशी हे पूर्णपणे सुसंगत आहे. यामधून सरकारचा रोजगार निर्मिती आणि विकसित भारताच्या उभारणीवर विशेष भर असल्याचे दिसून येते.”
उत्पादने:
हे क्लस्टर ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे, संगणक हार्डवेअर आणि दूरसंवाद उपकरणे यासारख्या प्रमुख क्षेत्रांमधील उत्पादनाला पाठबळ देईल. स्टार्टअप्स आणि एमएसएमईना जागतिक दर्जाचे प्लग-अँड-प्ले पायाभूत सुविधा आणि सामायिक सुविधा मिळतील.
यामध्ये स्टँडर्ड फॅक्टरी शेड, वीज, पाण्याची व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया, वसतिगृहे, कौशल्य विकास केंद्रे, आरोग्य केंद्रे आदींचा समावेश आहे. यामुळे पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स चा खर्च कमी होईल.
प्रकल्पाचे स्थान:
क्लस्टरचे स्थान त्याचे महत्व वाढवत आहे. ते रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चांगले जोडले आहे. यमुना एक्सप्रेस वे, ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे आणि आगामी पलवल-खुर्जा एक्स्प्रेस वे या धोरणात्मक दृष्ट्या महत्वाच्या मार्गांशी ते जोडले जाईल. हे ठिकाण रेल्वे स्टेशन आणि जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांच्या जवळ आहे. याव्यतिरिक्त, ईएमसी मेडिकल डिव्हाइस पार्क, एमएसएमई आणि अपैरल पार्क आणि एव्हिएशन हब यासारख्या महत्वाच्या औद्योगिक क्षेत्रांनी ते वेढले आहे.
ईएमसी:
या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ईएमसीने 520 कंपन्यांना आकर्षित केले आहे, ज्यामुळे 86,000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील या नवीन ईएमसीसह, भारत जागतिक उत्पादन केंद्र बनण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देत आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना देशात आपले कामकाज सुरु करण्यासाठी भक्कम आधार मिळेल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139694)