भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत निवडणूक आयोग मतदान ओळखपत्राच्या (EPIC) वितरणाला देणार गती


मतदार यादीत अद्ययावत झाल्यापासून 15 दिवसांच्या आत मतदारांना मिळणार आपले मतदार ओळखपत्र (EPIC)

Posted On: 18 JUN 2025 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2025

मतदारांना त्यांचे मतदार ओळपत्र (EPIC) लवकर  मिळावेत, याची सुनिश्चिती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने (ECI) एक नवीन मानक कार्यपद्धती (SOP) लागू केली आहे. याअंतर्गत नवीन मतदार नोंदणीसह, मतदाराने आपल्या विद्यमान तपशीलात बदल वा सुधारणा केल्यानंतर ते मतदार यादीत अद्ययावत केल्यापासून 15 दिवसांच्या आत मतदान ओळखपत्रांचे मतदारांपर्यंत वितरण शक्य होणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी मतदारांच्या सुलभतेसाठी केलेल्या संकल्पानुसार भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबवल्या जात असलेल्या विविध उपाय योजनांना अनुसरून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

या नवीन प्रणालीअंतर्गत आता निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांद्वारे (ERO) मतदार ओळखपत्र क्रमांक जारी  केल्यापासून ते टपाल विभागाद्वारे मतदाराला त्याचे मतदार ओळखपत्र मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याच्या प्रगतीची प्रत्यक्ष त्या त्या वेळची माहिती उपलब्ध असेल याची सुनिश्चिती केली गेली आहे. याचबरोबर मतदारांनाही त्यांच्या मतदार ओळखपत्राच्या प्रत्येक टप्प्यावरील स्थिती -गतीची माहिती  एसएमएसद्वारे सूचना पाठवून दिली जाणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, भारत निवडणूक आयोगाने आपल्या नुकत्याच सुरू केलेल्या ‘ECINet’ या व्यासपीठाला  एक समर्पित माहिती तंत्रज्ञानाधारीत प्रारूपाची जोड दिली आहे. हे माहिती तंत्रज्ञानाधारीत नवीन व्यासपीठ विद्यमान प्रणालीला पुनर्अभियांत्रित करून आणि कार्यप्रवाहाचे सुव्यवस्थिकरण करून त्याच्या जागा कार्यान्वित होणार आहे. याचबरोबरीने सुरळीत वितरणाच्या सुनिश्चिततेसाठी टपाल विभाच्या ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेसचे (API) ECINet सोबत एकात्मिकरण घडवून आणले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून माहिती साठ्याच्या सुरक्षिततेसोबतच सेवा वितरणात वृद्धी घडवून आणण्याचे उद्दिष्ट भारत निवडणूक आयोगाने समोर ठेवले आहे.

सर्व मतदारांना निर्धारित वेळेत आणि कार्यक्षमतेने निवडणूक विषयक सेवा प्रदान करण्याला भारत निवडणूक आयोगाने आपल्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर ठेवले आहे. त्यादृष्टीनेच भारत निवडणूक आयोगाने गेल्या चार महिन्यांत मतदारांसह इतर भागधारकांच्या हितासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

S.Bedekar/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2137527)
Read this release in: English , Urdu , Hindi