शिक्षण मंत्रालय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या अत्याधुनिक वास्तूचे उद्घाटन
मुंबई ही भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून ती जगात चौथ्या स्थानावर आहे: धर्मेंद्र प्रधान
तरुणांनी उद्योजक व्हावे, तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगातील समस्या सोडवाव्यात, देशाच्या जीडीपीत योगदान द्यावे, रोजगार निर्माण करावा आणि दुर्बल घटकांचे उत्थान करावे – धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन
Posted On:
14 JUN 2025 8:23PM by PIB Mumbai
मुंबई, 14 जून 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज मुंबईत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नव्याने उभारलेल्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंगचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय, श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या (एसव्हीकेएम) प्रस्तावित शैक्षणिक संकुलाचा भूमिपूजन समारंभ आणि नर्सी मोन्जी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) वास्तूचे उद्घाटनही करण्यात आले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणाने (एनईपी) जागतिक स्तरावर भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी असे आवाहन केले की, आपला भर भारतीय मूलतत्त्वांवर असावा आणि त्याचबरोबर जागतिक ज्ञान घेण्याची तयारीही ठेवावी.
मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी मानवी भांडवल हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि भविष्यात देशाला अधिक कौशल्ययुक्त कार्यबलाची आवश्यकता भासणार आहे. जिथे कुशल कार्यबल उपलब्ध असते तिथेच उद्योग स्थलांतर करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विकसित भारत @ 2047 साठी मानवी भांडवल विकसित करणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, एनईपीने शिक्षण क्षेत्रातील स्थिरता दूर करून लवचिकता दिली आहे आणि त्यामुळे शिक्षण पद्धती अधिक गतिमान झाली आहे. या धोरणामुळे युवकांना आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडण्याचा मार्ग खुला झाला आहे, तसेच बहुविषय शिक्षणपद्धतीचा मार्गही मोकळा झाला आहे.
ते म्हणाले की, आजच्या युगात तंत्रज्ञानकेंद्रित कार्यबलाची नितांत आवश्यकता आहे आणि एआय व झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनी 'शिकणे, विसरणे आणि पुन्हा शिकणे' या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.
फडणवीस यांनी हेही सांगितले की, मुंबई आता भारताची स्टार्टअप राजधानी बनली आहे आणि महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये आघाडीवर आहे. स्टार्टअपसाठी परिसंस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासन आणि शैक्षणिक संस्थांकडून युवकांना सक्षम वातावरण देणे गरजेचे आहे आणि "देशाचे नेतृत्व करण्यासाठी आम्ही युवकांसाठी परिसंस्था तयार करू", असेही मुख्यमंत्री म्हणाले.


या प्रसंगी बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 चे महत्त्व अधोरेखित केले. हे धोरण केवळ सरकारी दस्तऐवज नसून तो एक तात्विक दृष्टिकोन आहे आणि देशात दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रभावी माध्यम आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या शिफारशींनुसार, आता प्राथमिक शिक्षण (इयत्ता पहिली ते पाचवी) मातृभाषा आणि आणि इतर भारतीय भाषांमध्ये देण्यावर भर दिला जात आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. ब्रिटिश काळात श्री अरबिंदो, रवींद्रनाथ टागोर आणि पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखे दूरदर्शी शिक्षणतज्ञांनी भारतीय भाषांमध्ये शिक्षण देण्यावर भर दिला होता, असेही ते म्हणाले. ज्या देशांनी खूप प्रगती केली आहे, त्यांनी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देऊन यश मिळवले आहे. त्यामुळे आपल्या मुलांनी आणि तरुणांनी इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेत शिक्षण घेऊन जागतिक नेतृत्व मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
पदवी मिळवण्यापेक्षा क्षमता विकसित करणे अधिक महत्त्वाचे आहे, हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अधोरेखित केले. तरुणांनी भारतीय पारंपारिक ज्ञानावर विश्वास ठेवावा आणि या विघटनकारी तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्यवृद्धीला प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तरुणांनी नोकरी शोधणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनण्याचे आवाहनही त्यांनी केले. तरुणांनी नवउद्योजक बनावे, जगाच्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकावे, तसेच देशाच्या जीडीपीमध्ये योगदान द्यावे आणि देशातील वंचित नागरिकांचे उत्थान करावे असा सल्ला त्यांनी दिला.
मुंबई ही भारताच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असून हे शहर जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या क्रमांकावर आहे, असेही त्यांनी सांगितले. ज्ञान परंपरा भारत-केंद्रित असायला हव्यात, हे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण बहुविद्याशाखीय, रोजगाराभिमुख आणि तंत्रज्ञान-सक्षम बनवले पाहिजे असेही ते म्हणाले. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तरुणांनी नोकरी शोधणारे बनण्याऐवजी नोकरी देणारे बनण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एसव्हीकेएम) आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) चे कुलपती अमरीश आर. पटेल, आमदार अमित साटम आणि पराग अळवणी, माजी आमदार कृपाशंकर सिंह हे देखील याप्रसंगी मान्यवरांमध्ये उपस्थित होते.

श्री विले पार्ले केळवाणी मंडळ (एसव्हीकेएम) आणि नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) विद्यापीठाने या अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या आहेत. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (AR-VR) आणि 3D प्रिंटिंग सारख्या इंडस्ट्री 4.0 तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रगत प्रयोगशाळांचा समावेश आहे. या उद्घाटनामुळे भारताच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला असून आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण आणि नवोन्मेषाला चालना देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला पुन्हा एकदा पुष्टी देते.
***
S.Patil/N.Gaikwad/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2136430)