रेल्वे मंत्रालय
झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता; यामुळे रेल्वेचे जाळे सुमारे 318 किलोमीटरने वाढणार
या उपक्रमांमुळे प्रवासाची सुविधा वाढेल, वाहतूक, दळण-वळण खर्च कमी होईल, तेल आयात कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी झाल्यामुळे शाश्वत आणि कार्यक्षम रेल्वे क्रियान्वयनाला मिळेल पाठिंबा
प्रकल्पांसाठी अंदाजे 6,405 कोटी रुपये खर्च अपेक्षित
प्रकल्प उभारणीच्या काळात सुमारे 108 लाख मानव दिवसांसाठी थेट रोजगार होणार निर्माण
Posted On:
11 JUN 2025 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 6,405 कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. या प्रकल्पांमध्ये पुढील कामांचा समावेश आहे:-
1. कोडरमा - बरकाकाना दुहेरीकरण (133 किमी)– हा प्रकल्प झारखंडच्या प्रमुख कोळसा उत्पादक क्षेत्रामधून जाणार आहे. याशिवाय, हा प्रकल्प पाटणा आणि रांची दरम्यानचा सर्वात लहान आणि अधिक कार्यक्षम रेल्वे दुवा म्हणून काम करणार आहे.
2. बेल्लारी – चिकजाजूर दुहेरीकरण (185 किमी)– या प्रकल्पाची मार्गिका कर्नाटकातील बेल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांमधून आणि आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जाते.
वाढीव मार्गिकेच्या क्षमतेमुळे गतिशीलता लक्षणीयरीत्या वाढेल, त्यामुळे भारतीय रेल्वेची कार्यान्वयन कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता सुधारेल. हे बहु-मार्गिका प्रस्ताव कामकाज सुलभ करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी सहाय्य करतील. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहेत. त्यामुळे या भागातील लोकांना क्षेत्राच्या व्यापक विकासाद्वारे "आत्मनिर्भर" बनवेल. ज्यामुळे त्यांना रोजगार/स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण होतील.
‘मल्टिमॉडेल कनेक्टिव्हिटी’ साठीच्या पंतप्रधान-गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनमुळे हे प्रकल्प एकात्मिक नियोजनाद्वारे शक्य झाले आहेत. या प्रकल्पांमुळे प्रवासी, वस्तू आणि सेवा पुरवठा वेगवान होतील आणि अखंड दळण-वळण सुविधा प्रदान होवू शकेल.
झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधील सात जिल्ह्यांना व्यापणारे हे दोन प्रकल्प भारतीय रेल्वेचे विद्यमान नेटवर्क सुमारे 318 किमीने वाढवतील.
मंजूर झालेल्या बहु-मार्गिका प्रकल्पामुळे. या भागातील सुमारे 28.19 लाख लोकसंख्या असलेल्या 1,408 गावांना प्रकल्पाचा लाभ होईल.
कोळसा, लोह खनिज, तयार पोलाद, सिमेंट, खते, कृषी वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादने इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमता वाढीच्या कामांमुळे 49 एमटीपीए (प्रतिवर्षी दशलक्ष टन) अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्याने, हवामान उद्दिष्टे साध्य करण्यात आणि देशाचा वाहतूक खर्च कमी करण्यात, तेल आयात (52 कोटी लिटर) कमी करण्यात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात (264 कोटी किलो) मदत होईल. हे काम 11 कोटी झाडे लावण्याइतके असणार आहे.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135715)