इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
परिवर्तनशील शासनाची 11 वर्षे साजरी करण्यासाठी “विकसित भारत 2025 प्रश्नमंजुषे”त सहभागी व्हा, जिंका रु. 1 लाखापर्यंत रोख बक्षिसे
Posted On:
06 JUN 2025 6:09PM by PIB Mumbai
भारताच्या ‘विकसित भारत’ बनण्याच्या प्रवासात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी आणि परिवर्तनशील शासनाच्या 11 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘मायगव्ह’ने विविध स्पर्धा व उपक्रम सुरू केले आहेत.
विकसित भारत 2025 प्रश्नमंजुषा
‘मायगव्ह’ने सर्व भारतीय नागरिकांना “विकसित भारत 2025 प्रश्नमंजुषे”त सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासाविषयी जनजागृती वाढविणे, सामूहिक यशांचा सन्मान करणे व नागरिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणे हे उद्देश या प्रश्नमंजुषेमागे आहेत.
प्रथम क्रमांकासाठी रु. 1,00,000/-, दुसऱ्या क्रमांकासाठी रु. 75,000/-, तिसऱ्या क्रमांकासाठी रु. 50,000/- याशिवाय 100 प्रोत्साहनपर बक्षिसे रु. 2,000/- प्रत्येकी, आणि 200 प्रोत्साहनपर बक्षिसे रु. 1,000/- प्रत्येकी अशी आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना आहे. सर्व सहभागींना सहभागाबद्दल डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल.
‘हर घर स्वदेशी – एक राष्ट्र, एक भावना’ छायाचित्राद्वारे कथाकथन स्पर्धा
नागरिकांमध्ये स्वावलंबनाचा संदेश अधिक बळकट करण्यासाठी ‘मायगव्ह’ने “हर घर स्वदेशी – एक राष्ट्र, एक भावना” या छायाचित्राद्वारे कथाकथन स्पर्धेची घोषणा केली आहे. नागरिकांनी दररोज वापरत असलेल्या एखाद्या स्वदेशी बनावटीच्या उत्पादनाचा फोटो व त्या उत्पादनाच्या वापराविषयी 150 ते 200 शब्दांची प्रेरणादायी कथा पाठवायची आहे. निवडलेल्या 11 विजेत्यांना प्रत्येकी रु. 11,000/- चे रोख बक्षीस दिले जाईल.
बदलता भारत मेरा अनुभव – मिनी व्लॉग स्पर्धा
आणखी एक उत्कंठावर्धक स्पर्धा म्हणजे “बदलता भारत मेरा अनुभव – मिनी व्लॉग स्पर्धा” या स्पर्धेत नागरीकांना वर्ष 2014 पासून आतापर्यंत त्यांच्या परिसरात झालेल्या महत्त्वपूर्ण, प्रभावी बदलाचे कथन आणि दृश्य चित्रण असा 2 मिनिटे कालावधीचा व्लॉग सादर करण्यास आमंत्रित करण्यात आले आहे. सुमारे शंभर ते दीडशे शब्दांच्या वर्णनासह हे व्लॉग पायाभूत सुविधा, सार्वजनिक सोयी किंवा डिजिटल प्रगतीतील सुधारणा अधोरेखित करतील. सर्वोत्कृष्ट 11 विजेत्यांना प्रत्येकी 11,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
भारत के बढते कदम – लोकसहभागविषयक छायाचित्र स्पर्धा
“भारत के बढते कदम – लोकसहभागविषयक छायाचित्र स्पर्धा” म्हणजे राष्ट्रीय उपक्रमांमध्ये लोकांच्या सहभागाचे महत्त्व टिपण्याची स्पर्धा आहे.सहभागींना स्वच्छ भारत, लाईफ अभियान यांसारख्या कोणत्याही लोकसहभागविषयक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग दर्शवणारे छायाचित्र तसेच 50 ते 100 शब्दांमध्ये यासंदर्भातील अनुभवाचे वर्णन सादर करायचे आहे.सर्वोत्कृष्ट 11 विजेत्यांना प्रत्येकी 11,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.
“एक भारत प्रगतीशील भारत- व्हिडिओ कथाकथन स्पर्धा”
या मालिकेतील आणखी एक उत्सुकतावर्धक उपक्रम म्हणजे “एक भारत प्रगतीशील भारत- व्हिडिओ कथाकथन स्पर्धा”यामध्ये नागरिकांनी विशिष्ट सरकारी योजनेने जीवनमानातील सुलभता, सन्मान किंवा सक्षमीकरण यांच्या माध्यमातून त्याच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम केला याचे वर्णन करणाऱ्या एखाद्या लाभार्थ्याचा 1 मिनिट कालावधीचा व्हिडीओ छायाचित्रीत करून सादर करायचा आहे. धोरणात्मक परिवर्तनांच्या मागच्या मानवी कहाण्यांवर प्रकाश टाकणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
उपरोल्लेखित विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी नागरिकांनी कृपया खालील मायगव्ह मंचाला भेट द्यावी
MyGov platform https://www.mygov.in
***
S.Kane/R.Bedekar/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134672)