नौवहन मंत्रालय
नॉर्वे मधील ऑस्लो येथे आयोजित नॉर-शिपिंग मध्ये भारतीय नौवहन कंपन्यांनी जहाजबांधणीचे करार मिळवले तसेच हरित तंत्रज्ञान आणि ज्ञान भागीदारी प्राप्त केली
“भारताचे सागरी सामर्थ्य भरारी घेत असून जागतिक सहयोगातून मेक इन इंडिया उपक्रमाला मोठी चालना मिळत आहे”: केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल
Posted On:
05 JUN 2025 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2025
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आज नॉर्वे मधील ऑस्लो येथे आयोजित सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभाला उपस्थित होते. यावेळी, सहयोग तसेच भविष्यातील व्यापारासाठीच्या संधींचा शोध घेत, अनेक भारतीय नौवहन कंपन्यांनी जागतिक पातळीवरील अनेक प्रमुख कंपन्यांशी सामंजस्य करार केले.
या कार्यक्रमात 4 अतिरिक्त 7,500 डीडब्ल्यूटी बहुउद्देशीय जहाजांच्या बांधणीसाठी केलेल्या स्वारस्य करारावर केजी जर्मनीच्या कार्स्टन रेहदर शिफ्समाक्लर आणि रेहदर जीएमबीएच आणि गार्डन रीच जहाजबांधणी तसेच अभियांत्रिकी (जीआरएसई) यांच्यातर्फे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सदर जहाजांमध्ये मिश्र पद्धतीचे प्रोपल्शन असेल तसेच अत्याधुनिक सायबर सुरक्षा नियमांनुसार त्यांची बांधणी करण्यात येईल. जीआरएसईच्या कोलकाता येथील गोदीत सध्या उभारण्यात येत असलेल्या अशा 8 जहाजांच्या विद्यमान ऑर्डरखेरीज आणखी जहाजांच्या बांधणीसाठी हा करार करण्यात आला आहे. “ऑफशोअर प्लॅटफॉर्म आणि जहाजे यांच्या बांधणी”साठी जीआरएसईने युएई येथील एरीस मरीन एलएलसी कंपनीसोबत देखील सामंजस्य करार केला असून ग्लोबल इंजिन उत्पादक कंपनीसोबत देखील करार केला आहे.
नॉर्वेच्या दालनाला केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या भेटीदरम्यान, भारतातील लार्सन आणि टुब्रो उद्योगसमूह (एल अँड टी) आणि नॉर्वेची डीएनव्ही कंपनी यांच्यात सहयोगाच्या विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये जहाजबांधणी, ऑफशोअर आणि सागरी बंदरसंबंधित पायाभूत सुविधा तसेच विस्तार, उर्जा यंत्रणा, औद्योगिक उपाययोजना तसेच स्मार्ट पायाभूत सुविधा, शाश्वतता, ईएसजी तसेच जोखीमविषयक सेवा, सॉफ्टवेअर, सायबर सुरक्षा मंच तसेच डिजिटल उपाययोजना यांचा समावेश आहे.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, “नॉर्वे हा देश फार पूर्वीपासून भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे. आमचे अखंडित सहकार्य सामायिक मूल्ये, परस्पर आदर आणि शाश्वत विकासाप्रती सामायिक कटिबद्धतेवर उभारलेले आहे. विस्तीर्ण सागरकिनारे आणि समृद्ध महासागरी परंपरा असलेले हे दोन अभिमानी सागरी देश हे जाणून आहेत की नील अर्थव्यवस्थेचे भविष्य केवळ विकासावरच नव्हे तर शाश्वत, समावेशक आणि लवचिक वृद्धीवर अवलंबून आहे. सागरी क्षेत्रातील सहयोगाप्रती आपली बांधिलकी आणखी दृढ करत अनेक भारतीय कंपन्या नॉर्वेतील कंपन्यांसह विविध कंपन्यांशी सामंजस्य करार करत आहेत हे पाहून अत्यंत आनंद होत आहे.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल पुढे म्हणाले,“आपल्या देशांची सरकारे देखील हरित नौवहन मार्गिका, कार्बन-मुक्तीच्या दिशेने प्रयत्न , जहाजांचा पुनर्वापर तसेच क्षमता निर्मिती यांवर एकत्रितरीत्या काम करत आहेत. नील अर्थव्यवस्थेसंदर्भातील भारत-नॉर्वे कृती गट हा या दृढ सहकार्याचा कणा आहे.”


S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134231)