वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कोलंबिया - भारत ऊर्जा संवादाला केले संबोधित
Posted On:
06 MAY 2025 8:38PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित कोलंबिया-भारत ऊर्जा संवादामध्ये सहभागी होत जागतिक ऊर्जा संक्रमणात भारताच्या नेतृत्वाची भूमिका अधोरेखित केली आणि सर्वसमावेशक व न्याय्य हवामान कृतीसाठी भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
आपल्या भाषणात गोयल यांनी हवामान बदलाशी लढा देणे ही जगातील सर्व राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले की, हवामान बदल ही एक खरी आणि तातडीने सोडवण्याची गरज असलेली समस्या आहे आणि प्रत्येक राष्ट्राने त्यासाठी आपले स्वयंसंयोजित उपाय शोधले पाहिजेत.
गोयल यांनी याबाबतीत खंत व्यक्त केली की, पॅरिस करारात विकसित राष्ट्रांनी दिलेली आश्वासने आजतागायत मोठ्या प्रमाणावर अपूर्ण राहिली आहेत.
भारताच्या यशांविषयी सांगताना, गोयल म्हणाले, “जगाच्या लोकसंख्येपैकी सुमारे 17% लोकसंख्या असलेल्या भारताचे जागतिक कार्बन उत्सर्जनातील योगदान फक्त 3% आहे. आम्ही आमचे 2030 पर्यंतचे 200 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा उद्दिष्ट निर्धारित कालावधीच्या आठ वर्षे आधी 2022 मध्येच पूर्ण केले . मागील दशकात सौर ऊर्जा 30 पट वाढली आहे. भारताने युएनएफसीसीसी कडे आपले अहवाल वेळेवर सादर करत जागतिक अनुपालनाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे.”
गोयल यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की, “भारत बदल किंवा स्पर्धा यापासून पळ काढत नाही. भारत हा जगाच्या सामायिक समृद्धीचा मित्र आणि भागीदार ठरेल. आम्ही केवळ स्वच्छ ऊर्जा चळवळीत सहभागी होणार नाही, तर तिचे नेतृत्व करू,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
***
S.Kakade/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2127356)
Visitor Counter : 13