पंतप्रधान कार्यालय
मुंबईतील वेव्हज परिषदमध्ये पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद
Posted On:
01 MAY 2025 8:35PM
|
Location:
PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2025
आज महाराष्ट्राचा स्थापना दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीतील सर्व बंधू-भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आज गुजरातचाही स्थापना दिवस आहे, जगभर पसरलेल्या सर्व गुजराती बंधू-भगिनींनाही गुजरात स्थापना दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वेव्हज परिषदे मध्ये उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, एल. मुरुगन जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सृजनशील विश्वातील सर्व मान्यवर, विविध देशांतून आलेले माहिती, संवाद, कला आणि संस्कृती विभागांचे मंत्री, विविध देशांचे राजदूत, जगभरातील सृजनशील विश्वातील चेहरे, इतर मान्यवर, बंधूंनो आणि भगिनींनो
मित्रांनो,
आज येथे मुंबईत 100 हून अधिक देशांतील कलाकार, नवकल्पक, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते, एका छताखाली एकत्र गोळा झाले आहेत. एका अर्थाने, आज येथे वैश्विक गुणवत्ता आणि वैश्विक सृजनशीलतेच्या परिसंस्थेची पायाभरणी होत आहे. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद म्हणजे वेव्हज. वेव्हज हे केवळ एक संक्षिप्त नाव नाही, तर ही खरंच एक लाट आहे. लाट – संस्कृतीची, सृजनशीलतेची, आणि सर्वत्र जोडणाऱ्या बंधाची. आणि या लाटेवर स्वार आहेत-चित्रपट, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, कथाकथन, सृजनशीलतेचा अथांग सागर. वेव्हज हे एक असे जागतिक व्यासपीठ आहे, जे प्रत्येक कलाकार, प्रत्येक सृजनशील व्यक्तीचे आहे, जिथे प्रत्येक कलाकार, प्रत्येक तरुण, नव्या कल्पनांनिशी सृजनशील विश्वाशी जोडला जाईल. या ऐतिहासिक आणि शानदार सुरुवातीसाठी, मी देश-विदेशातून एकत्र आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज 1 मे आहे, आजपासून 112 वर्षांपूर्वी, 3 मे 1913 रोजी भारतातील पहिला संपूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे निर्माते दादासाहेब फाळके होते, आणि कालच त्यांची जयंती होती. गेल्या एका शतकात, भारतीय सिनेमाने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात यश मिळवले आहे. रशियामध्ये राज कपूर यांची लोकप्रियता, कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सत्यजित राय यांची ओळख, आणि ऑस्करमध्ये आरआरआर या सिनेमाचे यश हे याचेच उदाहरण आहे. गुरु दत्त यांचे सिनेमॅटिक काव्य असो, किंवा ऋत्विक घटक यांचे सामाजिक प्रतिबिंब, ए. आर. रहमान यांचे सूर असोत की राजामौली यांची महागाथा, प्रत्येक कथा भारतीय संस्कृतीचा आवाज बनून जगभरातील कोट्यवधी लोकांच्या मनात पोहोचली आहे. आज वेव्हज च्या या मंचावर आपण भारतीय सिनेमाच्या अनेक दिग्गजांना टपाल तिकीटांच्या माध्यमातून स्मरले आहे.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत, मी कधी गेमिंग वर्ल्डमधील लोकांना भेटलो, कधी संगीत क्षेत्रातील लोकांना, कधी चित्रपट निर्मात्यांना, तर कधी रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या चेहऱ्यांना. या संवादांमध्ये अनेकदा भारताची सृजनशीलता, सर्जनक्षम क्षमता आणि जागतिक सहकार्य यावर चर्चा झाली. जेव्हा जेव्हा मी तुम्हा सर्व सृजनशील विश्वातील लोकांना भेटलो, तुमच्याकडून कल्पना घेतल्या, तेव्हा मला स्वतःलाही या विषयात खोलात जाण्याची संधी मिळाली. मग मी एक प्रयोग देखील केला. 6-7 वर्षांपूर्वी, जेव्हा महात्मा गांधीजींची 150वी जयंती होती, तेव्हा मी 150 देशांतील गायक-गायिकांना गांधीजींचे आवडते भजन – "वैष्णव जन तो तेणे कहिये" – हे गाण्यासाठी प्रेरित केले. नरसी मेहता यांनी लिहिलेलं हे भजन 500-600 वर्षे जुने आहे, पण 'गांधी 150' च्या काळात जगभरातील कलाकारांनी हे गाणे गायले आणि याचा खूप मोठा प्रभाव पडला – जग एकत्र आले. येथेही अनेक लोक उपस्थित आहेत, ज्यांनी ‘गांधी 150’ च्या वेळी 2-3 मिनिटांचे आपले व्हिडीओ बनवले होते आणि गांधीजींच्या विचारांना पुढे नेले होते. भारत आणि जगभरातील सृजनशील विश्वाची ताकद एकत्र आली, तेव्हा काय कमाल घडू शकते, याची एक झलक तेव्हा आपण पाहिली होती. आज त्याच कल्पना प्रत्यक्षात उतरून 'वेव्हज ' या रूपात साकार झाल्या आहेत.
मित्रांनो,
जसे सूर्य नव्याने उगवल्यावर आकाश रंगवतो, तसेच ही परिषद आपल्या पहिल्या क्षणापासूनच उजळू लागली आहे – "Right from the first moment, The summit is roaring with purpose." पहिल्याच आवृत्तीत वेव्हज ने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या सल्लागार मंडळातील सर्व सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत आज येथे दिसत आहे. आपण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर 'क्रिएटर्स चॅलेंज', 'क्रिएटोस्पिअर' हे अभियान राबवले आहे, जगातील सुमारे 60 देशांतील एक लाख सृजनशील लोकांनी यात भाग घेतला. आणि 32 स्पर्धांमध्ये 800 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले आहेत. अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या सर्व स्पर्धकांना मी अनेक शुभेच्छा देतो. तुम्हाला जगात काहीतरी मोठं करून दाखवायची संधी मिळाली आहे.
मित्रांनो,
मला सांगण्यात आलं आहे की येथे भारत पॅव्हिलियनमध्ये आपण अनेक नवे प्रयोग केले आहेत, नवे काहीतरी साकारले आहे. मी ते पाहण्यासाठी उत्सुक आहे, ते
पाहायला मी नक्की जाईन. वेव्हज बाजार हे उपक्रम देखील खूपच रंजक आहे. यामुळे नवीन सृजनशील लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि ते नव्या बाजारपेठांशी जोडले जातील. कला क्षेत्रात, खरेदीदार आणि विक्रेत्यांना जोडण्याची ही कल्पना खरोखरच उत्तम आहे.
मित्रांनो,
आपण पाहतो की एका लहान मुलाच्या जीवनाची सुरुवात, म्हणजे त्याचा जन्म झाल्यापासूनच आईशी त्याचे नाते अंगाई मधूनच सुरू होते. आईकडूनच त्याला पहिला स्वर ऐकू येतो. तो स्वर संगीतातूनच समजतो. एक आई जी आपल्या बाळासाठी स्वप्ने विणते , त्याचप्रमाणे सृजनशील विश्वातील लोक एका युगाची स्वप्नं गुंफतात. वेव्हज चा हेतू असेच लोक एकत्र आणण्याचा आहे.
मित्रांनो,
लाल किल्ल्यावरून मी "सबका प्रयास" ची गोष्ट मांडली होती. आज माझा हा विश्वास आणखी दृढ झाला आहे की तुमचा हा सामूहिक प्रयत्न वेव्हज ला येत्या काळात नवीन उंचीवर घेऊन जाईल. माझा उद्योग जगतातील सहकाऱ्यांना हा आग्रह कायम राहील की जसे आपण पहिल्या परिषदेमध्ये मार्गदर्शन केले, तसेच पुढेही करत राहा. अजून वेव्हज मध्ये अनेक सुंदर लाटा यायच्या आहेत. भविष्यात 'वेव्हज पुरस्कार' देखील सुरू होणार आहेत. हे पुरस्कार कला आणि सृजनशीलतेच्या जगतातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार ठरणार आहेत. आपल्याला सतत एकत्र राहायचं आहे, जगाच्या मनाला जिंकायचं आहे, प्रत्येक व्यक्तीचं मन जिंकायचं आहे.
मित्रांनो,
आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. आज भारत जागतिक आर्थिक तंत्रज्ञान (फिनटेक) स्वीकारण्याचे बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे . जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक आहे. जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टम भारतात आहे. विकसित भारताची ही यात्रा अजून सुरू झाली आहे. भारताकडे त्याहून अधिक देण्यासाठी खूप काही आहे. भारत, जसे अब्ज लोकसंख्येचे राष्ट्र आहे, तसेच अब्जो कथांचेही राष्ट्र आहे. दोन हजार वर्षांपूर्वी, भरतमुनींनी नाट्यशास्त्र लिहिले, त्याचा संदेश होता – "नाट्यं भावयति लोकम्" – याचा अर्थ, कला जगाला भाव, भावना आणि अनुभूती देते. शतकांपूर्वी जेव्हा कालिदासांनी 'अभिज्ञान शाकुंतलम्' लिहिले, तेव्हा भारताने शास्त्रीय नाट्याला नवीन दिशा दिली. भारतातील प्रत्येक गल्लीमध्ये एक कथा आहे, प्रत्येक पर्वत एक गीत आहे, प्रत्येक नदी काही ना काही गुणगुणते. आपण भारतातील 6 लाखांहून अधिक गावांमध्ये जाल, तर प्रत्येक गावाची स्वतःची लोककथा आहे. त्यांची कथाकथनाची स्वतःची विशेष शैली आहे. येथे विविध समाजांनी लोककथांद्वारे आपला इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवला आहे. आपल्याकडे संगीत ही सुद्धा एक साधना आहे – भजन असो, गझल असो, शास्त्रीय असो किंवा आधुनिक – प्रत्येक सुरामध्ये एक कथा आहे, प्रत्येक तालामध्ये एक आत्मा आहे.
मित्रांनो,
आपल्याकडे "नाद ब्रह्म" म्हणजेच "साउंड ऑफ डिवाइन" ची कल्पना आहे. आपले देवही स्वतःला संगीत व नृत्याद्वारे व्यक्त करतात. भगवान शिवांचा डमरू –
सृष्टीचा पहिला नाद आहे, माता सरस्वतींची वीणा – विवेक आणि विद्येचा ताल आहे, श्रीकृष्णांची बासरी – प्रेम आणि सौंदर्याचा अमर संदेश आहे, विष्णूंचा शंख – शंखध्वनी म्हणजे सकारात्मक ऊर्जा बोलावणारा आहे. इतकं काही आपल्या कडे आहे आणि येथे सादर झालेल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक सादरीकरणातही याची झलक दिसली. म्हणूनच मी म्हणतो – हीच ती वेळ आहे,हीच खरी वेळ आहे. हे "Create In India, Create For The World" ची खरी वेळ आहे. आज जग जेव्हा कथाकथनासाठी नवीन मार्ग शोधत आहे, तेव्हा भारताकडे हजारो वर्षांपासून गोष्टींचा एक अमूल्य खजिना आहे. आणि हा खजिना कालातीत आहे, विचार करायला प्रवृत्त करणारा आहे आणि खऱ्या अर्थाने वैश्विक आहे. आणि असे नाही की या कथा केवळ संस्कृतीशी संबंधित आहेत – यामध्ये विज्ञान, खेळ, शौर्यगाथा, त्याग आणि तपस्येच्या कथा आहेत. आपल्या कथा विज्ञान, कल्पनारम्य, धैर्य, शौर्य यांनी युक्त आहेत. भारताच्या या खजिन्याची टोपली अतिशय मोठी आणि विशाल आहे. हा खजिना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, आणि पुढील पिढीसमोर नव्या व रंजक पद्धतीने मांडणे – ही वेव्हज या मंचाची मोठी जबाबदारी आहे.
मित्रांनो
आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती असेल की, स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच आपल्या देशात पद्म पुरस्कार सुरू झाले. इतक्या वर्षांपासून हे पुरस्कार प्रदान केले जात आहेत, मात्र आम्ही या पुरस्कारांना लोकांचे पद्म असे स्वरूप दिले आहे. जे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात देशासाठी जगत आहेत, समाजाची सेवा करत आहेत, त्यांची आम्ही पारख केली, त्यांचा आदर केला आणि अशा प्रकारे पद्माच्या परंपरेचे स्वरूपच बदलले. आता संपूर्ण देशाने याचा खुल्या मनाने स्विकार केला आहे, आता हा केवळ एक कार्यक्रम नसून संपूर्ण देशाचा उत्सव बनला आहे. वेव्हज सुद्धा याच प्रकारचे आहे. वेव्हजने निर्मिती क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रात, संगीतात, अॅनिमेशनमध्ये, गेमिंगमध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर जग नक्कीच त्याचे कौतुक करेल.
मित्रांनो
कंटेंट निर्मितीमध्ये भारताच्या आणखी एक वैशिष्ट्याची तुम्हाला खूप मदत होणार आहे. आपण, आ नो भद्रा: क्रत्वो यन्तु विश्वताह या कल्पनेवर विश्वास असणारे आहोत. याचा अर्थ, चारही दिशांनी आपल्या मनात शुभ विचार येऊ दे. आपल्या सभ्यतेच्या खुलेपणाचा हा पुरावा आहे. याच भावनेने पारशी येथे आले. आणि आजही पारशी समुदाय भारतात मोठ्या अभिमानाने भरभराटीला येत आहे. यहुदी येथे आले आणि भारताचेच बनून गेले. जगातील प्रत्येक समाजाचे, प्रत्येक देशाचे स्वतःचे यश आहे. या कार्यक्रमात अनेक देशांचे मंत्री आहेत, प्रतिनिधी आहेत, त्या देशांचे स्वतःचे यश आहे. जगभरातील कल्पना आणि कला यांचे स्वागत करणे, त्यांचा सन्मान करणे, ही आपल्या संस्कृतीची ताकद आहे. यासाठी आपण एकत्रितपणे, प्रत्येक संस्कृतीच्या वेगवेगळ्या देशांच्या कामगिरीशी संबंधित उत्तम सामग्री देखील तयार करू शकतो. यामुळे जागतिक संपर्कव्यवस्था वृद्धिंगत करण्याचा आपला दृष्टीकोन आणखी बळकट होईल.
मित्रांनो
मी आज जगातील लोकांना, भारताबाहेरील सृजनशील जगतातील लोकांनाही याबाबत विश्वास पटवून देऊ इच्छितो की, जेव्हा तुम्ही भारताशी जोडले जाल, जेव्हा तुम्हाला भारताच्या गाथा कळतील, तेव्हा तुम्हाला अशा काही कथा पहायला मिळतील, की तुम्हाला वाटेल की अरे, हे तर माझ्या देशातही अनुभवयास मिळते. तुम्हाला भारताशी एक अतिशय नैसर्गिक संबंध जाणवेल, तेव्हा आमचा 'क्रिएट इन इंडिया' हा मंत्र तुम्हाला अधिक सहजसुलभ जाणवेल.
मित्रांनो
भारतातील भगव्या अर्थव्यवस्थेचा हा उदयकाळ आहे. आशय, सृजनशीलता आणि संस्कृती - हे भगव्या अर्थव्यवस्थेचे तीन अक्ष आहेत.
भारतीय चित्रपटांचा आवाका आता जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आहे. आज शंभराहून अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशी प्रेक्षकही आता भारतीय चित्रपट केवळ वरकरणी पाहत नाहीत, तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आज मोठ्या संख्येने परदेशी प्रेक्षक सबटायटल्स अर्थात उपशीर्षकांसह भारतीय कंटेंटचा आस्वाद घेत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील ओटीटी उद्योगाने 10 पट वाढ दर्शवली आहे. पडद्याचा आकार लहान होत असला तरी, त्याची व्याप्ती अमर्याद आहे. पडदा सूक्ष्म होत चालला आहे, पण संदेश भव्य होत चालला आहे. आजकाल भारतीय खाद्यपदार्थ जगाच्या पसंतीस उतरत आहेत. मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात भारताचे गाणे देखील जगाला परिचित होईल.
मित्रांनो
भारताची सृजनशील अर्थव्यवस्था आगामी काळात जीडीपीमध्ये आपले योगदान आणखी वाढवू शकते. आज भारत चित्रपट निर्मिती, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि संगीताचे जागतिक केंद्र बनत आहे. लाईव्ह कार्यक्रमांशी संबंधित उद्योगासाठी आपल्यासमोर अनेक संधी आहेत. जागतिक अॅनिमेशन बाजारपेठेचे आकारमान आज चारशे तीस अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
येत्या 10 वर्षांत ते दुप्पटीने वाढू शकते असा अंदाज आहे. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स उद्योगासाठी ही एक खूप मोठी संधी आहे.
मित्रांनो
भगव्या अर्थव्यवस्थेच्या या तेजीत, मी वेव्हजच्या या व्यासपीठावरून देशातील प्रत्येक तरुण निर्मात्याला सांगू इच्छितो की, तुम्ही गुवाहाटीतील संगीतकार असाल, कोच्चीचे पॉडकास्टर असाल, बंगळुरूमध्ये गेम डिझाइन करत असाल किंवा पंजाबमध्ये चित्रपट बनवत असाल, तुम्ही सर्वजण भारताच्या अर्थव्यवस्थेत एक नवीन लाट निर्माण करत आहात - सृजनशीलतेची लाट, एक अशी लाट जी तुमच्या कठोर परिश्रम आणि तुमच्या आवडीने निर्माण होणार आहे. आणि आमचे सरकारही तुमच्या प्रत्येक प्रयत्नात तुमच्यासोबत आहे. कुशल भारतापासून ते स्टार्टअप सहाय्यापर्यंत, AVGC उद्योगासाठीच्या धोरणांपासून ते वेव्हज सारख्या व्यासपीठांपर्यंत, आम्ही प्रत्येक टप्प्यावर तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सतत वचनबद्ध राहत आहोत.
आम्ही असे वातावरण तयार करत आहोत जिथे तुमच्या कल्पना आणि विचारांची कदर केली जाईल. जे नव्या स्वप्नांना जन्म देईल आणि ती स्वप्ने साकार करण्याचे सामर्थ्य तुम्हाला देईल. वेव्हज शिखर परिषदेद्वारे देखील तुम्हाला एक मोठे व्यासपीठ प्राप्त होईल. हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे सृजन आणि कोडींगही त्याबरोबरच होईल, जिथे सॉफ्टवेअर आणि कथाकथन बरोबरीने केले जाईल, जिथे कला आणि ‘ऑगमेंटेड रियालिटी’ म्हणजेच वर्धित वास्तव एकत्र नांदेल. तुम्ही या व्यासपीठाचा पुरेपूर वापर करावा, मोठी स्वप्ने पहावीत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्ती लावावी.
मित्रांनो,
माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, आशय निर्मात्यांवरही माझा विश्वास आहे आणि यामागे एक विशेष कारण देखील आहे. युवकांच्या चैतन्यामध्ये, उत्साहामध्ये, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत कोणतीही बाधा, कोणताही बोजा किंवा सीमा नसतात. म्हणूनच तुमची सर्जकता अगदी ओघावती असते, यात कसलाही संकोच नसतो किंवा तुम्ही काही नाखुषीने काम करणारे नाहीत. नुकतेच मी अशा काही युवा आशय निर्मात्यांशी, गेमर्सशी आणि असे कार्य करणा-या अन्य लोकांशी व्यक्तिगतरित्या प्रत्यक्ष संवाद साधला. समाज माध्यमांवरही मी तुमचे सर्जक कार्य पहात असतो, तुमची ऊर्जा अनुभवतो, हा कसलाही योगायोग नाही की, आज ज्यावेळी भारतामध्ये इतर देशांपेक्षा सर्वात जास्त तरुण लोकसंख्या आहे, अगदी त्याच वेळी आपल्या सर्जनात्मकतेचे नवनवीन पैलू समोर येत आहेत. रिल्स, पॉडकास्ट, ॲनिमेशन, स्टार्टअप्स, ऑगमेंटेड रियालिटी म्हणजेच वर्धित वास्तव आणि व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तव (एआर-व्हीआर) यासारखे प्रकारांमध्ये आपल्याकडील प्रज्ञावंत युवक खूप चांगले काम करत आहेत. तसे पाहता वेव्हज शिखर परिषद आपल्या पिढीसाठीच आहे, जेणेकरून तुम्ही आपली ऊर्जा, आपले कर्तृत्व दाखवावे आणि याद्वारे आपल्या सर्जकतेच्या या क्रांतीचा पुनर्विचार करता येईल. युवापिढीला या नव्या कामाने त्यांचे कार्य पुनर्भाषित करता येणार आहे.
मित्रांनो,
सर्जकांच्या जगतातील तुम्हा दिग्गजांसमोर आणखी एका विषयावर चर्चा करू इच्छितो. हा विषय आहे - सर्जनात्मक जबाबदारी. आपण सर्वजण हे पाहतच आहोत की 21 वे शतक हे तंत्रज्ञान चलित आहे, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तंत्रज्ञानाची भूमिका विस्तारत आहे. अशावेळी मानवाच्या संवेदना कायम राखण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. आणि हे काम कला जगतच करू शकते. आपल्याला मनुष्याला रोबोट बनवायचे नाही. आपल्याला मानवाला अधिकाधिक संवेदनशील बनवायचे आहे, मानवाला अधिकाधिक समृद्ध करायचे आहे. मानवाची ही समृद्धी माहितीच्या महाकाय डोंगरातून येणार नाही, किंवा तंत्रज्ञानाच्या गती आणि उपलब्धतेतूनही येणार नाही, यासाठी आपण गीत, संगीत, कला, नृत्य यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. गेल्या हजारो वर्षांपासून हे कलाप्रकार मानवी संवेदना जागृत ठेवत आहेत. आपल्याला त्या आणखीन मजबूत करायच्या आहेत. याशिवाय आपल्याला आणखीन एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची आहे. आज आपल्या तरुण पिढीला काही मानवता विरोधी विचारांपासून वाचवण्याची गरज आहे. वेव्हज एक असा मंच आहे, जो हे काम योग्य रीतीने करू शकतो. जर आपण ही जबाबदारी टाळली तर आपल्या तरुण पिढीसाठी हे खूप घातक ठरेल.
मित्रांनो,
आज तंत्रज्ञानाने सर्जनात्मक जगतासाठी संपूर्ण आसमंत खुले केले आहे. म्हणूनच आता जागतिक सुसूत्रता देखील तितकीच महत्त्वाची आहे. मला विश्वास आहे हे व्यासपीठ आपल्या सर्जनकर्त्यांना जागतिक कथा मांडणीच्या पद्धतीशी संपर्कात ठेवण्यात मदत करेल, आपल्या ॲनिमेटर्सना जागतिक दृष्टिकोनाशी जोडेल, आपल्या गेमर्सना जागतिक स्तरावरील विजेत्यांमध्ये रूपांतरित करेल. मी सर्व जागतिक गुंतवणूकदारांना, जागतिक आशय निर्मात्यांना आमंत्रित करतो की, त्यांनी भारताला आपल्या सर्जनाचे अंगण बनवावे. जगातील आशय निर्मात्यांनों - मोठी स्वप्ने पहा आणि तुमची कहाणी जगाला सांगा. गुंतवणुकदारांनो - केवळ व्यासपीठावरच नाही तर लोकांमध्येही गुंतवणूक करा. भारतीय तरुणांनो - आजवर जगासमोर न आलेल्या तुमच्या अब्जावधी गोष्टी जगाला सांगा!
तुम्हा सर्वांना पहिल्या वेव्हज शिखर परिषदेच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आपणा सर्वांचे खूप खूप आभार!
नमस्कार!
* * *
JPS/H.Raut/S.Bedekar/Gajendra/Sandesh/Shraddha/D.Rane
Release ID:
(Release ID: 2125955)
| Visitor Counter:
10