युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांचा समारोप
महाराष्ट्राला 13 पदके
Posted On:
12 MAR 2025 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी गुलमर्गचे क्रीडा केंद्रात रूपांतर करण्याची सरकारची योजना असल्याचे केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आज घोषित केले. गुलमर्ग गोल्फ क्लब येथे पाचव्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरचे युवा सेवा आणि क्रीडा मंत्री सतीश शर्मा, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारताकडे अफाट प्रतिभा असून, 9 ते 24 वर्षे वयोगटातील युवकांमध्ये त्या प्रतिभेचा शोध घेऊन आपल्याला ती जोपासायची आहे. यासाठी आपल्याला उपखंडातील प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा प्रशिक्षण विद्यालय उभारावे लागेल, जिथे नैसर्गिक पण अविकसित प्रतिभेचा शोध घेतला जाईल आणि त्यानंतर देशभरातील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (राष्ट्रीय सर्वोत्तमता केंद्र) त्यांना प्रशिक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले. त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचे पाठबळ देऊन, ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकतील, हे सुनिश्चित केले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये भारतातील सर्व राज्यांमधील प्रशिक्षकांसाठी सर्वोत्तम अपस्किलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जम्मू-काश्मीरने तयार केलेले प्रशिक्षण मॉडेल सर्व राज्यांनी अनुसरावे, अशी सूचना केल्याचे डॉ. मांडवीय यांनी सांगितले.

उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा 2036 चे यजमानपद भूषवता यावे, यासाठीच्या तयारीचा योग्य आराखडा तयार करण्यासाठी 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या वरिष्ठ सदस्यांची आपण भेट घेतल्याचे डॉ. मांडवीय यांनी सांगितले.
7 सुवर्ण 5 रौप्य आणि 6 कांस्य अशी एकूण 18 पदके जिंकून स्पर्धेच्या विजेते पदावर आपले नाव कोरणाऱ्या भारतीय लष्कराला डॉ. मांडवीय यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रदान केली.
पदकतालिकेवरून असे स्पष्ट होते की, हिवाळी खेळांसाठी नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती नसलेल्या राज्यांनी देखील खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेच्या या सत्रात उत्तम कामगिरी केली आहे. यावरून असे दिसून येते की, हा विशेष क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी भारत सरकार घेत असलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळत आहे. महाराष्ट्राने जिंकलेली 13 पदके, आणि तामिळनाडूची 5 पदके, हा याचा योग्य दाखला आहे. स्पर्धेत महाराष्ट्र चौथ्या स्थानी राहिला.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111064)
Visitor Counter : 16