उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

विकासाच्या बाबतीत राजकारण करू नका - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

Posted On: 21 SEP 2024 8:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 सप्‍टेंबर 2024

 

दिवसातले 24 तास राजकारणाला बळी पडू नका, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. “राजकारण देशापेक्षा वरचढ असू शकत नाही. विकासाच्या बाबतीत राजकारण होता कामा नये. राष्ट्रवाद, राष्ट्राची प्रगती आणि विकासाचे मोल देऊन आपण अतिरेकी राजकारणाला बळी पडू शकत नाही,” अशी टीका त्यांनी केली.

दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव येथील डोकमर्डी सभागृहात आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करत होते. परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्राचा सन्मान आणि अभिमान राखण्याचे महत्त्व उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले. “कोणालाही भारताबाहेर जाऊन भारताबद्दल वाईट बोलण्याचा, भारताच्या शत्रूंसोबत बसण्याचा अधिकार नाही” हे त्यांनी स्पष्ट केले. “आपण जेव्हा देशाबाहेर जातो तेव्हा देशाचे राजदूत असतो, त्यामुळे राष्ट्रवाद सोडून इतर कशाचाही विचार करणे योग्य नाही” असेही ते म्हणाले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अनुकरणीय आचरणाचा दाखला देत, उपराष्ट्रपतींनी अशा काळाकडे निर्देश केला जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत असताना विरोधी पक्षाचे नेते असले तरी वाजपेयी भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व परदेशात करत होते. "अटलजींच्या सर्व कृती एकाच ध्येयाने भारलेल्या होत्या - ‘माझा भारत महान, माझा भारत, माझा राष्ट्रवाद’, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले.

समानता आणि सामाजिक गतिशीलतेच्या दिशेने भारताचा अविश्वसनीय प्रवास प्रतिबिंबित करताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विविध पार्श्वभूमीच्या व्यक्तींना नेतृत्वाच्या सर्वोच्च पदांवर जाण्यासाठी सक्षम करून देश आपले यश साजरे करत असल्याचे सांगितले.

मंत्री म्हणून काम करत असताना 1990 मधील आपल्या जम्मू आणि काश्मीर भेटीच्या आठवणीला उजाळा देत उपराष्ट्रपतींनी तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमधील फरक लक्षात आणून दिला.  "त्यावेळी, माझ्या भेटीदरम्यान मला 30 लोक सुद्धा दिसले नव्हते आणि या वर्षी सुमारे 2 कोटी पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरला भेट दिली," असे त्यांनी सांगितले, आणि, एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून या प्रदेशाचे महत्त्वपूर्ण पुनरुत्थान अधोरेखित केले.

शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सरकार राबवित असलेल्या उपक्रमांचा उल्लेख करून उपराष्ट्रपतींनी भारताच्या कृषी क्षेत्राच्या वाढ आणि विकासाची प्रशंसा केली. "आज, 10 कोटी शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा थेट त्यांच्या बँक खात्यात मदत पोहोचवली जात आहे" असे ते म्हणाले.

दादरा आणि नगर हवेली; दमण आणि दीव तसेच लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, दादरा आणि नगर हवेली’च्या खासदार डेलकर कलाबेन मोहनभाई आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2057422) Visitor Counter : 31