संरक्षण मंत्रालय
कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान
“कारगिल युद्धातून योग्य धडा शिकणे आवश्यक आहे”
Posted On:
25 JUL 2024 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जुलै 2024
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी कारगिल युद्धाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त सशस्त्र दलांच्या सर्व श्रेणींचे अभिनंदन केले आहे आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात,सीडीएस यांनी कारगिल युद्धातील शूरवीरांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानावर जोर दिला."हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. हे बलिदान फक्त सैनिकांनाच नव्हे तर देशातील तरुण पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील,” असे ते म्हणाले.
कारगिल युद्धाच्या वैशिष्ट्यांना अधोरेखित करताना सीडीएस म्हणाले, या युद्धातून केवळ लष्करालाच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सर्वांना धडे मिळाले. रक्त सांडून शिकलेले हे धडे विसरले जाऊ नयेत, त्या चुका पुन्हा केल्या जाऊ नयेत आणि यातून योग्य त्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
सशस्त्र दलांमध्ये सुरू असलेल्या सुधारणांबाबत जनरल अनिल चौहान यांनी तिन्ही लष्करी सेवा काही प्रमुख सुधारणांच्या उंबरठ्यावर उभ्या असल्याचे सांगितले.ज्यामध्ये संघटनेच्या, संरचनेच्या, संकल्पनात्मक आणि सांस्कृतिक सुधारणांचा समावेश आहे. “या सुधारणा करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे लढाईतील कार्यक्षमता सुधारणे आणि सशस्त्र दलांना नेहमीच लढाईसाठी सज्ज ठेवणे. आपण जुन्या पद्धतींना सोडून द्यायला आणि नवीन पद्धती स्वीकारायला तयार असले पाहिजे. या सुधारणांचा आकार आणि रचना भारताच्या परिस्थितीला आणि आव्हानाला वैशिष्ट्यपूर्ण रीतीने दर्शवायला हवा” असे ते म्हणाले.
या प्रसंगी,सीडीएस यांनी नागरिकांना आश्वासन दिले की देश अमृतकालमध्ये प्रवेश करत असताना सशस्त्र दल नव्या उर्जेने भरलेले आणि उत्साही आहेत आणि भारताला ‘विकसित भारत’ बनवण्यासाठी देशाच्या इतर घटकांबरोबर पाऊल टाकण्याचे त्यांनी ठरवले आहे.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2037217)
Visitor Counter : 9