कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

“संबंधांना बळकटी आणि शासनाचे सक्षमीकरण” : बांगलादेशच्या उपायुक्तांसाठी भारताचा क्षमतावृद्धी कार्यक्रम


“एनसीजीजीच्या सार्वजनिक धोरण आणि शासनविषयक विशेष क्षमता उभारणी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बांगलादेशच्या 16 उपायुक्तांसोबत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी साधला संवाद”

“आयटीईसी, परराष्ट्र मंत्रालय यांच्यासोबत भागीदारीद्वारे एनसीजीजीने पूर्ण केला बांगलादेशच्या 16 उपायुक्तांसाठी सार्वजनिक धोरण आणि शासनविषयक विशेष क्षमता उभारणी कार्यक्रम”

Posted On: 21 JUL 2024 11:12AM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय सुशासन केंद्राने (एनसीजीजी) 15 ते 20 जुलै, 2024 दरम्यान बांगलादेशच्या 16 उपायुक्तांसाठी सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावरील एक आठवड्याचा विशेष क्षमता बांधणी कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार केलेल्या 'वसुधैव कुटुंबकम' आणि 'शेजारी प्रथम' धोरणाच्या तत्वाला अनुसरून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याशी संवाद साधण्याची संधी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या उपायुक्तांना मिळाली. या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी सामाईक आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे परस्परांना होणारे फायदे अधोरेखित केले. पंतप्रधान आवास योजना, आयुष्मान भारत आणि सीपीजीआरएएमएस सारख्या भारताच्या विकासात्मक कार्यक्रमांच्या यशावर त्यांनी भर दिला, ज्यांचे बांगलादेशमध्ये अनुकरण केले जात आहे. सहकार्याला चालना देण्यासाठी भारत आणि बांगलादेशमधील एकसारख्याच समस्या असलेल्या 'ट्वीन डिस्ट्रिक्ट' जिल्ह्यांची निवड करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले.

क्षमता बांधणी, पायाभूत सुविधा विकास आणि लोकांमधील परस्पर संबंध यावर लक्ष केंद्रित करून, 'विकसित भारत @2047' आणि 'स्मार्ट बांगलादेश व्हिजन 2041' च्या दृष्टिकोनाशी सुसंगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'शेजारी प्रथम' धोरणाच्या माध्यमातून बळकट झालेल्या भारत-बांगलादेश संबंधांची त्यांनी प्रशंसा केली.

1, 500 नागरी सेवकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, एनसीजीजी ने 2025 पर्यंत अतिरिक्त 1,800 नागरी सेवकांच्या क्षमतावृद्धीसाठी बांगलादेश सरकारशी सामंजस्य करार केला.परराष्ट्र मंत्रालयाच्या पाठबळाने आणि ढाक्यामधील भारतीय मिशनच्या घनिष्ठ सहकार्याने एनसीजीजीने आतापर्यंत बांगलादेशच्या सुमारे 2650 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. एक आठवडा चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात भारत सरकारचे वरिष्ठ सचिव आणि जिल्हाधिकारी तसेच दंडाधिकारी यांच्यासोबत विविध उपक्रमांवर आणि महत्त्वाच्या विषयांमधील सर्वोत्तम पद्धतींबाबत संवादांचा समावेश करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या समारोप समारंभात डीएआरपीजी आणि डीपीपीडब्लूचे सचिव आणि एनसीजीजीचे महासंचालक आयएएस अधिकारी व्ही. श्रीनिवास आणि एनसीजीजीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रिस्का पॉली मॅथ्यू उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमावर एनसीजीजीचे सहाय्यक प्राध्यापक आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. ए. पी. सिंग, एनसीजीजीचे सहाय्यक कार्यक्रम समन्वयक आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. गजला हसन, एनसीजीजीचे कार्यक्रम सहाय्यक संजय दत्त पंत आणि एनसीजीजीचे युवा व्यावसायिक आकाश सिकदर यांनी एनसीजीजीच्या समर्पित प्रशिक्षण चमूसोबत  समन्वय साधला. 

***

NM/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2034765) Visitor Counter : 33