खाण मंत्रालय

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते राष्ट्रीय भूस्खलन वेधशाळेचे उद्घाटन आणि भूसंकेत वेब पोर्टल व भूस्खलन मोबाईल ॲपची सुरुवात

Posted On: 19 JUL 2024 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2024

केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज कोलकात्यातली ‘जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’ (जीएसआय), धरित्री परिसर, सॉल्ट लेक सिटी इथे राष्ट्रीय भूस्खलन वेधशाळेचे (नॅशनल लँडस्लाईड फॉरकास्टिंग सेंटर – एनएलएफसी) उद्घाटन केले. केंद्रीय मंत्र्यांनी भूसंकेत वेब पोर्टल व भूस्खलन मोबाईल ॲपची सुरुवातही केली.

भारतातील भूस्खलनाच्या समस्येबाबत उपाययोजना करण्याच्या हेतूने ‘एनएलएफसी’ची निर्मिती करण्यात आली आहे. ही वेधशाळा 20 जुलै 2024 पासून भूस्खलनाबाबत अंदाज वर्तवणार असून कालिंपाँग, दार्जिलिंग आणि निलगिरीतील रहिवाशांना त्याचा लाभ मिळेल.

आपात्कालीन घटनांची तीव्रता कमी करण्याच्या दिशेने भूसंकेत वेब पोर्टल हा मैलाचा टप्पा आहे. देशातील कमी आणि मध्यम पल्ल्याच्या भूस्खलनाचा अंदाज वर्तवणे आणि भूस्खलनासंदर्भातील विदा व माहितीच्या प्रसारणासाठी या पोर्टलची मदत होणार आहे. वापरास सुलभ असे भूस्खलन मोबाईल ॲप भूसंकेत वेब पोर्टलशी संलग्न असून त्याद्वारे भूस्खलनाचा दैनंदिन अंदाज जलद  वितरित केला जाईल. भूस्खलनाच्या घटनांमध्ये ठिकाण आणि वेळेबाबत माहिती सर्व भागीदारांना या ॲपमार्फत इतरांपर्यंत पोहोचवता येईल. हे ॲप भूसंकेत वेब पोर्टलवर उपलब्ध असून ते लवकरच गुगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

जी किशन रेड्डी यांनी आपल्या भाषणात ‘जीएसआय’ची आपात्कालीन व्यवस्थापनात विशेषतः भूस्खलनावर उपाययोजना करण्याबाबत असलेल्या  महत्त्वाची भूमिकेवर भर दिला.‘एनएलएफसी’च्या स्थापनेसाठी कटिबद्ध राहिल्याबद्दल त्यांनी ‘जीएसआय’च्या अधिकाऱ्यांची प्रशंसा केली. तसेच, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने काम करत 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्यासाठी देशाची खनिजांची आणि आपात्कालीन व्यवस्थापनाची गरज पूर्ण करण्यासाठी परिश्रमपूर्वक कार्यरत राहण्याची विनंती त्यांना केली.

भूस्खलन वेधशाळा, भूसंकेत वेब पोर्टल आणि भूस्खलन मोबाईल अॅपची सुरुवात हे ‘जीएसआय’चे मोठे यश असून भारताला आपात्कालीन स्थितीसाठी सज्ज करणे व सुरक्षितता वाढवण्यासाठी संस्थेच्या वचनबद्धतेची ग्वाही आहे. या उपक्रमामुळे ‘जीएसआय’चे तंत्रज्ञानावर पकड ठेवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी, संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी आणि आपात्कालीन व्यवस्थापनासाठी नवोन्मेषाची भूमिका अधोरेखित झाली आहे.

उद्घाटन कार्यक्रमापूर्वी आज केंद्रीय मंत्र्यांनी ‘जीएसआय’च्या परिसराला भेट दिली.संस्थेत सुरू असलेल्या उपक्रमांचे मूल्यांकन आणि संस्थेच्या यशाबाबत माहिती घेण्यासाठी त्यांनी आढावा बैठक घेतली.मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत त्यांनी पायाभूत विदा निर्माण,देशातील खनिज उत्पादनाच्या वाढीसाठी मात्र भूस्खलनावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या धोरणांच्या निर्मितीत ‘जीएसआय’ची निर्णायक भूमिका असल्याचे सांगितले. तसेच, भौगोलिक अभ्यास आणि खनिज संपत्ती शोधण्यासाठी अथक प्रयत्नांबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

‘जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’ विषयी –

‘जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’ (जीएसआय) ची स्थापना 1851 मध्ये प्रामुख्याने रेल्वेसाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी झाली. त्यानंतरच्या वर्षांमध्ये मात्र ‘जीएसआय’ने देशाला विविध क्षेत्रांसाठी आवश्यक भूविज्ञानाबाबत माहितीचा साठा निर्माण केला. आजघडीला ही आंतरराष्ट्रीय दर्जाची भूवैज्ञानिक संस्था म्हणून ओळखली जाते.

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2034519) Visitor Counter : 20