पंतप्रधान कार्यालय

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्ट अप महाकुंभचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन


“अभूतपूर्व ऊर्जा आणि चैतन्य निर्माण करणारा खऱ्या अर्थाने महाकुंभ”

"स्टार्ट -अप महाकुंभाला भेट देणारा प्रत्येक भारतीय भविष्यातील युनिकॉर्न आणि डेकाकॉर्नचा साक्षीदार असेल"

"स्टार्टअप ही एक सामाजिक संस्कृती बनली असून सामाजिक संस्कृतीला कोणीही रोखू शकत नाही"

"देशातील 45 टक्क्यांहून अधिक स्टार्ट अप्सची धुरा महिलांकडे"

"जागतिक अनुप्रयोगांसाठी भारतीय उपाय जगातील अनेक राष्ट्रांसाठी मदतीचा हात बनतील याचा मला विश्वास"

Posted On: 20 MAR 2024 3:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 मार्च 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे स्टार्ट-अप महाकुंभचे उद्‌घाटन केले.यावेळी त्यांनी तेथील प्रदर्शनाची पाहणीही केली.

पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना स्टार्ट-अप महाकुंभचे महत्त्व अधोरेखित केले आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी देशाच्या कृतीआराखड्यावर त्यांनी भर दिला. गेल्या काही दशकांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताने उमटवलेल्या ठशावर प्रकाश टाकत, नवोन्मेष आणि स्टार्ट-अप संस्कृतीचा नवा कल पंतप्रधानांनी अधोरेखित केला.  यामुळे येथे स्टार्टअप्सच्या जगतातील लोकांची उपस्थिती आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करते, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील स्टार्ट-अप्सच्या यशाकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी त्यांना यशस्वी बनवणाऱ्या प्रतिभाशाली घटकाकडे लक्ष वेधले.  त्यांनी गुंतवणूकदार, इनक्यूबेटर, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, उद्योजक आणि वर्तमान तसेच भविष्यातील उद्योजकांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. "खरंच हा एक अभूतपूर्व ऊर्जा आणि चैतन्य निर्माण करणारा एक महाकुंभ आहे" असे ते म्हणाले. 

अतिशय अभिमानाने आपल्या नवोन्मेषाच्या प्रदर्शन करणाऱ्या क्रीडा आणि प्रदर्शन स्टॉल्सना भेट देत असताना असाच उत्साह अनुभवल्याचा उल्लेख त्यांनी केला. स्टार्ट-अप महाकुंभला भेट देणारा प्रत्येक भारतीय भविष्यातील युनिकॉर्न आणि डेकाकॉर्नचा साक्षीदार असेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

योग्य धोरणांमुळे देशातील स्टार्टअप परिसंस्थेचा विकास झाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.  समाजात स्टार्टअप संकल्पनेबद्दल सुरुवातीला अस्वीकाराची आणि उदासीनता होती याची आठवण त्यांनी करुन दिली. स्टार्टअप इंडिया अंतर्गत नवोन्मेषी कल्पनांना कालांतराने व्यासपीठ मिळाले, असे ते म्हणाले. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील तरुणांना सुविधा देणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये, निधी स्रोत आणि शैक्षणिक संस्थांमधील इनक्यूबेटरच्या कल्पनांशी जोडून परिसंस्थेचा विकास करायला हवा असे ते म्हणाले. "स्टार्टअप ही एक सामाजिक संस्कृती बनली असून सामाजिक संस्कृतीला कोणीही रोखू शकत नाही", असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी सांगितले की स्टार्टअप क्रांतीचे नेतृत्व लहान शहरे करत आहेत आणि तेही कृषी, वस्त्रोद्योग, औषध, वाहतूक, अवकाश, योग आणि आयुर्वेद यासह अनेक क्षेत्रांमध्ये. अवकाश स्टार्टअप्सबद्दल स्पष्टीकरण देताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय स्टार्टअप्स, अवकाश शटलच्या प्रक्षेपणासह अवकाश क्षेत्रातील 50 हून अधिक क्षेत्रांमध्ये काम करत आहेत.

पंतप्रधानांनी स्टार्टअप्सबाबत बदलत्या मानसिकतेवर भाष्य केले.व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप पैसा लागतो ही मानसिकता स्टार्टअप्सने बदलली आहे असे ते म्हणाले. देशातील तरुणांनी नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्माण करण्याचा मार्ग निवडल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

भारत ही तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे. यात 1.25 लाख स्टार्टअप आहेत, त्यामध्ये 12 लाख तरुणांचा समावेश आहे जे त्यांच्याशी थेट जोडलेले आहेत, असे ते म्हणाले. उद्योजकांनी आपल्या पेटंटची नोंदणी लवकर करण्याबाबत सतर्क राहावे असे त्यांनी सांगितले. GeM पोर्टलने व्यवसाय आणि स्टार्टअप्सना 20,000 कोटींहून अधिक रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. नवीन क्षेत्रात उतरल्याबद्दल त्यांनी तरुणांचे कौतुक केले. धोरणात्मक मंचावर सुरू केलेले स्टार्ट-अप आज नवीन उंची गाठत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

डिजिटल इंडियाने स्टार्ट-अप्सना दिलेली चालना अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, की ही एक मोठी प्रेरणा आहे आणि महाविद्यालयांनी ते उदाहरण म्हणून  घेऊन त्याचा अभ्यास करावा असे त्यांनी सुचवले. देशात डिजिटल सेवांच्या विस्तारासाठी नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवांच्या विकासाचे नेतृत्व करणाऱ्या फिन-टेक स्टार्ट-अपसाठी यूपीआय UPI हा आधारस्तंभ बनत असल्याचे, त्यांनी नमूद केले. G20 शिखर परिषदेच्या वेळी भारत मंडपम येथे उभारण्यात आलेल्या बूथवर यूपीआयचे कार्य समजावून सांगणाऱ्या आणि चाचणी घेण्यास देत असताना उद्योग आणि जागतिक विश्वातील नेत्यांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या; याची त्यांनी आठवण करून दिली. पंतप्रधान म्हणाले की, यामुळे आर्थिक समावेशन बळकट झाले आहे आणि तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण होऊन ग्रामीण आणि शहरी भेद कमी झाला आहे. देशातील ४५ टक्क्यांहून अधिक स्टार्टअप महिलांच्या नेतृत्वाखाली आहेत, मग ते शिक्षण, कृषी किंवा आरोग्य असोत याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

पंतप्रधानांनी केवळ विकसित भारतासाठीच नव्हे तर मानवतेसाठी नवोपक्रमाच्या संस्कृतीच्या या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्टार्टअप-20 अंतर्गत जागतिक स्टार्टअपसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या भारताच्या पुढाकाराचा उल्लेख केला जो स्टार्टअपला वाढीचे इंजिन मानतो.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये भारताचा वरचष्मा असल्याबद्दलही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय क्वांटम मिशन,इंडिया एआय मिशन आणि सेमीकंडक्टर मिशन,यांचा उल्लेख करत,यात  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उद्योगाच्या आगमनाने तरुण नवोन्मेषक आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी निर्माण होत असलेल्या असंख्य संधींचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. श्री मोदींनी काही काळापूर्वी यूएस सिनेटमध्ये केलेल्या भाषणादरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय,AI)यावर चर्चा केल्याची आठवण करून दिली आणि भारत या क्षेत्रात अग्रेसर राहील,असा आशावाद व्यक्त केला. "जागतिक अनुप्रयोगांसाठी भारतीय उपाय जगातील अनेक राष्ट्रांसाठी मदतीचा हात बनतील,असा मला विश्वास मला आहे,असे पंतप्रधानांनी  नमूद केले.

हॅकाथॉन इ.च्या माध्यमातून भारतीय तरुणांकडून शिकण्याची जगातील लोकांची आकांक्षा आहे,असेही पंतप्रधानांनी नमूद केले. भारतीय परिस्थितीत चाचणी केलेल्या उपायांना जागतिक मान्यता आहे, असे ते म्हणाले. त्यांनी नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि सूर्योदय क्षेत्रातील क्षेत्रातील भविष्यातील गरजांसाठी संशोधन आणि नियोजनासाठी 1 लाख कोटी निधीचा त्यांनी उल्लेख केला.

स्टार्टअप्सना स्टार्टअप क्षेत्रात येण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना पाठिंबा देत समाजाचे देणे फेडून टाकण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. त्यांनी उष्मायन केंद्रे, शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन त्यांची माहिती विद्यार्थ्यांसोबत सामायिक करण्यास सांगितले. सरकारी समस्या मांडून हॅकाथॉनद्वारे त्यावर उत्तर  शोधण्यासाठी त्यात तरुणांना सहभागी करून घेण्याचे त्यांचे अनुभव कथन केले. शासनामध्ये अनेक चांगले उपाय स्वीकारले गेले आणि सरकारसाठी उपाय शोधण्याची हॅकाथॉन संस्कृती प्रस्थापित झाली, याबद्दलचे आपले निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्यांनी व्यवसाय आणि सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमईं) त्याचे अनुसरण करण्यास सांगितले. त्यांनी महाकुंभला कृतीयोग्य मुद्दे समोर  आणावयाचे आवाहन केले.

11 व्या स्थानावरून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात भारतातील तरुणांचे योगदान पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि भारताला आपल्या तिसऱ्या कार्यकाळात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्याची हमी पूर्ण करण्यासाठी स्टार्टअप्सद्वारे बजावल्या जाणाऱ्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, तरुणांशी संवाद साधल्याने त्यांना नवीन ऊर्जा मिळते तसेच त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल आणि श्री सोम प्रकाश आदी उपस्थित होते.

 

 

 

 

NM/PK/V.Ghode/S.Patgaonkar/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2015691) Visitor Counter : 68