नागरी उड्डाण मंत्रालय

मुंबई विमानतळाच्या हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या हाताळण्यासाठी केंद्र  सरकारने उचलली पावले

Posted On: 14 FEB 2024 1:25PM by PIB Mumbai

 

साथरोगाच्या काळात लागू करण्यात आलेले प्रवासावरील निर्बंध हटवल्यानंतर, विमानतळांवरील हवाई वाहतूक आणि हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावर गर्दी वाढत आहे आणि  त्याच्या धावपट्टीवर क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत आहे. त्यामुळे विमानतळाच्या हवाई क्षेत्रात वाहतूक कोंडी होत असून विमानांना धावपट्टीवर उतरायला विलंब होतो आणि जवळजवळ 40 ते 60 मिनिटे इतका दीर्घ काळ शहरावरून घिरट्या घालाव्या लागतात. 

एखादे विमान दर तासाला सरासरी 2000 किलो इंधन वापरते हे लक्षात घेता, एवढा दीर्घ कालावधी हवेत फेऱ्या मारल्यामुळे विमानाच्या इंधनाचा लक्षणीय अपव्यय होतो. 40 मिनिटे हवेत फेऱ्या मारण्यासाठी 1.7 किलो लिटर (सुमारे 1.8 लाख रुपये खर्च) इतक्या जेट इंधनाचा अपव्यय होतो, तर 60 मिनिटे हवेत घिरट्या घालण्यासाठी जवळजवळ 2.5 किलो लिटर (सुमारे 2.6 लाख रुपये खर्च) इंधनाचा अपव्यय होतो. इंधनाच्या या वाढत्या खर्चाचा भार सरतेशेवटी ग्राहकांनाच उचलावा लागेल, ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. याचा विमानतळांच्या कार्यक्षमतेवरही मोठा परिणाम  घडत असून, दीर्घ प्रतीक्षा कालावधी, आणि विमानसेवेतील विलंब, याचा विपरीत परिणाम प्रवासी आणि विमान कंपन्यांवर होत आहे.

हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या समस्येचे विश्लेषण केले. त्यामध्ये असे आढळून आले की, हाय इंटेन्सिटी रनवे ऑपरेशन्सच्या (HIRO) म्हणजेच सर्वात जास्त वाहतूक असलेल्या 6 तासांमध्ये (सकाळी 0800 ते 1100 आणि संध्याकाळी 1700 ते 2000) या काळात परवानगी देण्यात आलेली प्रति तास हवाई वाहतूक, जवळजवळ दिवसाच्या उर्वरित 18 तासांमध्ये प्रति तास परवानगी असलेल्या हवाई वाहतुकीएवढीच होती. या स्लॉट (कालावधी) व्यतिरिक्त, सर्वसामान्य हवाई वाहतूक आणि लष्करी विमान वाहतुकीला देखील कोणत्याही निर्बंधांशिवाय परवानगी देण्यात आली होती. याशिवाय, ट्रान्सव्हर्स धावपट्टी मुळे, निर्धारित नसलेल्या (नॉन-शेड्युल्ड) उड्डाणांमुळे गर्दीच्या वेळेला (पीक अवर्स) वाहतूक कोंडी वाढताना दिसून आली.

भारतीय विमानतळ प्राधिकरण हे एअर नेव्हिगेशन सेवा पुरवठादार असल्यामुळे, प्राधिकरणाने 2 जानेवारी 2024 रोजी, विमानतळ परीचालकांना नोटिस टू एअर मेन (NOTAMs) या स्वरुपात निर्देश जारी केले. यानुसार, HIRO, अर्थात सर्वात जास्त वाहतुकीच्या ( म्हणजेच सकाळी 0800 ते 1100, संध्याकाळी 1700 ते 2000, आणि रात्री 2115 ते 2315 वा.) तासांमध्ये उड्डाणांची संख्या कमी  करून प्रति तास 46 वरून 44 आणि बिगर- HIRO कालावधीत प्रति तास 44 वरून 42 वर आणण्याचे निर्देश दिले आहेत.     

त्याशिवाय, HIRO कालावधीत होणार्‍या सर्वसामान्य हवाई वाहतुकीवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. सर्व विमान कंपन्या या निर्बंधांचे पालन करत आहेत, या गोष्टीची खात्री करण्याच्या दृष्टीने मुंबई आंतरराष्ट्र्रीय विमानतळ लिमिटेडने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. हवाई क्षेत्राची सुरक्षा, परिचालन कार्यक्षमता आणि प्रवाशांचे समाधान या गोष्टी लक्षात घेऊन, व्यापक सार्वजनिक हितासाठी ही कार्यवाही करण्यात आली आहे. 

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2005899) Visitor Counter : 100