मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय

आंध्र प्रदेश आणि पुदुचेरी मधल्या विविध ठिकाणी 1 जानेवारी 2024 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या सागर परिक्रमा (दहावा टप्पा) मध्ये केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला सहभाग नोंदवणार


सागर परिक्रमाच्या दहाव्या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि यनम (पुदुचेरी) च्या उर्वरित  किनारपट्टी भागांचा सहभाग असणार

मच्छीमार, जल शेतकरी आणि इतर संबंधित लाभार्थ्यांना केंद्रीय मंत्री किसान क्रेडिट कार्डचं (KCC) वितरण करणार

Posted On: 31 DEC 2023 12:41PM by PIB Mumbai

 

आंध्र प्रदेश आणि पुदुचेरी मध्ये विविध ठिकाणी येत्या 1जानेवारी 2024 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या सागर परिक्रमा (दहावा टप्पा) या कार्यक्रमात केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला आणि राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन सहभागी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री यावेळी मच्छीमार जल शेतकरी आणि इतर संबंधित आधुनिक शेतकरी  विशेषतः किनारपट्टी मच्छीमार आणि मत्स्य शेतकरी युवा मत्स्य व्यावसायिक इत्यादींना किसान क्रेडिट कार्डचं (KCC) वितरण करणार आहेत. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), किसान क्रेडिट कार्ड KCC या माध्यमातून आखलेल्या कल्पना आणि इतर योजनांचा यावेळी मच्छीमारांच्या लाभासाठी प्रसार केला जाणार आहे. मत्स्य व्यवसाय विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आंध्र प्रदेश सरकार, राष्ट्रीय मत्स्य व्यवसाय विकास मंडळ, भारतीय किनारपट्टी सुरक्षा, भारतीय मत्स्य व्यवसाय सर्वेक्षण, मच्छीमार संघटना आणि इतर मान्यवर सुद्धा या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

मच्छीमार, मत्स्य शेतकरी आणि इतर संबंधितांशी  मंत्र्यांचा सुसंवाद हे सागर परिक्रमा यात्रेचे वैशिष्ट्य आहे. किसान क्रेडिट कार्ड संबंधित मोहिमा आणि इतर उपक्रम सुद्धा आंध्र प्रदेश आणि पुदुचेरीच्या किनारपट्टी भागात आखल्या जात आहेत. राज्य मत्स्य व्यवसाय अधिकारी, मच्छीमारांचे प्रतिनिधी, मत्स्य शेतकरी, उद्योजक, मच्छिमार सहकारी संस्थांचे नेते, व्यावसायिक, वैज्ञानिक आणि देशभरातून या व्यवसायाशी संबंधित इतर अनेकजण या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

सागर परिक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रवासाला 5 मार्च 2022 रोजी गुजरातच्या मांडवी इथून सुरुवात झाली होती आणि सागर परिक्रमाचे एकूण नऊ टप्पे त्यानंतर पूर्ण झाले आहेत. गुजरात, दमण आणि दीव, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, अंदमान आणि निकोबार, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्याचा काही भाग ही किनारपट्टी राज्य/केंद्रशासित प्रदेश दहाव्या टप्प्याला सुरुवात होण्याआधी पूर्ण झाले आहेत. सागर परिक्रमाचा दहावा टप्पा हा यापुढे सुरू झाला असून यात नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, गोदावरी पश्चिम, कोनासीमा, काकीनाडा, विशाखापट्टणम, विझीयानगरम, श्रीकाकुलम आणि यनम (पुदुचेरीचा केंद्रशासित प्रदेश) या आंध्र प्रदेशच्या उर्वरित किनारपट्टी जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे.

आंध्र प्रदेश 974 किलोमीटरचा किनारा, 33,227 किलोमीटरचे खंडीय क्षेत्र, 555 सागरी मच्छीमार गावे, 2 मासेमारी बंदरे, 350 मत्स्य साठवणूक  केंद्रे, 31147 मच्छीमार बोटी, 65 शीतगृहे, 64 प्रक्रिया प्रकल्प, 235 शीतप्रकल्प, 28 मत्स्य खाद्य गिरण्या, 357 प्रजनन केंद्र आणि 234 जल प्रयोगशाळांसह प्रतिभा आणि वैविध्यपूर्ण जल संसाधनांनी संपन्न आहे.

आंध्र प्रदेशमध्ये, भारत सरकारची प्रमुख योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत, मत्स्यपालन क्षेत्रात 5 वर्षांसाठी एकूण 2300 कोटी रुपये गुंतवणूक प्रस्तावित आहे. PMMSY अंतर्गत हाती घेतलेल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये मत्स्य साठवणूक केंद्रांचे बांधकाम, मासेमारी बंदरांचे बांधकाम, शीतगृहे/शीत प्रकल्पांचे बांधकाम, पारंपरिक मच्छिमारांसाठी खोल समुद्रातील नवीन मासेमारी जहाजांचे संपादन, प्रजनन बँक बांधणे, गोड्या पाण्यातील व्यावसायिक मच्छीमारी आणि खाऱ्या पाण्यातील प्रजनन केंद्रे, मत्स्यपालनासाठी विस्तारित क्षेत्र, मासोळ्यांची साठवणूक, रोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांची स्थापना, पारंपरिक आणि मोटारयुक्त बोटींसाठी उच्च दर्जाची फ्रिक्वेन्सी असलेल्या तसेच रडारयुक्त जहाजांसाठी मागोवा घेणारी उपकरणे इत्यादींचा समावेश आहे.

सागर परिक्रमा हा मच्छीमार समाजाच्या कल्याणासाठी आणि किनारपट्टीच्या विकासासाठी दूरदर्शी नेतृत्वाच्या परिवर्तनीय सामर्थ्याचा परिपाक आहे. मच्छीमारांच्या, इतर भागधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सरकारद्वारे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) आणि मत्स्यव्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) यांसारख्या विविध मत्स्यपालन योजना आणि कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.

सागर परिक्रमेच्या माध्यमातून लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे जीवनमान आणि आर्थिक कल्याण सुधारण्यात मोठा प्रभाव पडत आहे. तसेच, यामुळे मच्छिमारांना मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी घरबसल्या संवाद साधण्याची महत्वपूर्ण संधी मिळत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि भारत सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या इतर कार्यक्रमांसारख्या विविध मत्स्यपालन योजनांद्वारे मच्छिमार, मत्स्यपालकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सागर परिक्रमा सातत्याने सहकार्य करत राहील.

***

H.Akude/S.Naik/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1991944) Visitor Counter : 88