अर्थ मंत्रालय

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातमधील केवडिया येथे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे चिंतन शिबीर संपन्न


केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी अधिकाऱ्यांना सरकारी यंत्रणेतील साधनसंपत्तीच्या प्रचंड साठ्याचा तसेच अनुभवाचा सुयोग्य वापर करण्याच्या केल्या सूचना

Posted On: 22 AUG 2023 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023

गुजरातमधील केवडिया येथे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित तीन दिवसीय चिंतन शिबीराचा आज समारोप झाला. केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या चिंतन शिबिरामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी तसेच डॉ. भागवत किसनराव कराड उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या पंचप्रण अनुसरत अमृत काळातली उद्दिष्टे साध्य करण्याबाबत या शिबिरामध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयातील तसेच केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातील 100 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोकळी चर्चा केली.

अमृत काळामध्ये अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची भूमिका, स्वतःच्या  क्षमता विकसित करणे आणि स्वतःची कार्यक्षमता सुधारणे या विषयावर संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विपुल साधन-संपत्तीचा आणि अनुभवांचा  जास्तीतजास्त वापर करावा, अशी सूचना अर्थमंत्री सीतारामन यांनी केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, 2047 साला पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने अमृत काळात अपेक्षित यश मिळवण्यासाठी नवीन/युवा  सहकाऱ्यांना सतत मार्गदर्शन करावे असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेत, धोरणांची सातत्त्याने पुनर्रचना करण्याची आणि कार्यक्षमतेसह परिणामकारकता वाढवण्यासाठी निर्णय प्रक्रियेत जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

चर्चेदरम्यान, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी, 2047 पर्यंत विकसित देश बनण्याच्या  भारताच्या प्रवासा दरम्यान, उत्पादनाची महत्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्याचे आवाहन केले.

अधिवेशनादरम्यान आपल्या भाषणात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किसनराव कराड यांनी ज्ञान आणि कौशल्याच्या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर दिला. डॉ. कराड म्हणाले की, मागणीच्या पूर्ततेचे अद्ययावत मूल्यांकन करण्यासाठी योग्य अभिप्राय यंत्रणा विकसित करण्याबरोबरच, जाणकार भागीदार आणि लाभाधारकांशी सल्लामसलत करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

‘स्वतःच्या क्षमता विकसित करणे’, या विषयावरील सत्रात, मनुष्यबळ विकास आणि संस्था, तंत्रज्ञानाची भूमिका आणि सॉफ्टवेअर-सक्षम प्रणाली, अंतर्गत आणि आंतर मंत्रालयीन सल्लामसलत, विविध पातळ्यांवरील प्रशिक्षणाचे महत्व, आणि 2047 साला पर्यंत प्रबळ आणि लवचिक, असा विकसित भारत बनवण्याच्या प्रवासात, अमृत काळामध्ये प्रमुख भूमिका बजावण्यासाठी युवा पिढीला मार्गदर्शन करणे, यासारख्या क्षमता विकासाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चेचा भर राहिला.

‘क्षमता बांधणी’ या विषयावरील सत्रात, कौशल्य विकास, मजबूत संस्थात्मक प्रक्रिया कायम राखणे, फाइल व्यवस्थापन प्रणाली सुव्यवस्थित करणे, वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्रालयातील   निर्णय प्रक्रियेला गती देणे आणि भविष्यासाठी सज्ज राहण्याकरता, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या मुद्द्यांवर चर्चा झाली.

चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताच्या G20 फायनान्स ट्रॅकशी देखील संवाद साधला. G20 फायनान्स ट्रॅकने, भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या पहिल्या नऊ महिन्यांमधील आपल्या कामाचे आत्मपरीक्षण अर्थमंत्री सीतारामन यांच्यापुढे सादर केले. 

 

N.Chitale/S.Chitnis/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951241) Visitor Counter : 113


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu