पर्यटन मंत्रालय

जी-20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन


दहशतवाद लोकांना विभाजित करतो, मात्र पर्यटन त्यांना एकत्र आणते : पंतप्रधान

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचे ब्रीदवाक्य ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ हेच जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य ठरू शकते: पंतप्रधान

गोवा रोडमॅप, शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठीचे एक साधन ठरू शकेल: पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी

पर्यटनाची ताकद वापरुन, आपण पुढच्या पिढ्यांसाठी जगाला अधिक चांगले स्वरूप देऊ शकतो : जी. किशन रेड्डी

जी-20 पर्यटन आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे यांच्यासाठी एक ऑनलाईन डॅश बोर्ड स्थापन करुन, जी-20 देशांमधील सर्वोत्तम पद्धती आणि अध्ययन अहवाल सामाईक करुन, त्याद्वारे शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करता येतील : जी किशन रेड्डी

Posted On: 21 JUN 2023 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2023
 
गोव्यात आयोजित जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संदेश दिला. या बैठकीत मार्गदर्शन करतांना  पंतप्रधानांनी अतुल्य भारताची भावना जागृत करण्याचे आवाहन केले.जागतिक स्तरावर दोन ट्रिलियन डॉलर्सचे क्षेत्र हाताळत असले  तरी पर्यटन मंत्र्यांना क्वचितच स्वतः पर्यटक होण्याची संधी मिळते,  असे पंतप्रधान म्हणाले.


भारताचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन प्राचीन संस्कृत श्लोक ‘अतिथी देवो भवः’ वर आधारित आहे,  याचा  अर्थ ‘अतिथी म्हणजे देवाचे रूप ’असा आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात  जी -20 अध्यक्षपदाच्या काळात देशभरातील 100 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास 200 बैठका आयोजित केल्या जात आहेत आणि प्रत्येक बैठकीच्या वेळी, प्रतिनिधींना भारतात वेगळी अनुभूती येत आहे.“  ज्यांनी या बैठकांसाठी याआधी भारताला भेट दिली आहे त्या तुमच्या मित्रांना तुम्ही विचारा , मला खात्री आहे की त्यांचे  दोन अनुभव सारखे नसतील,”  असे पंतप्रधान पुढे म्हणाले.  


पर्यटन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करताना भारताचे प्रयत्न समृद्ध वारसा जतन करण्यावर केंद्रित आहेत, असे पंतप्रधानांनी विशद केले. भारत जगातील प्रत्येक प्रमुख धर्माच्या यात्रेकरूंना आकर्षित करतो,  हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी आध्यात्मिक पर्यटनाच्या विकासावर भर दिला. वाराणसी हे प्राचीन काळापासून असलेले शहर प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे. या शहरात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत दहा पटीने वाढ झाली असून आजघडीला त्यांची संख्या 7 कोटी झाली आहे. भारत पर्यटनासाठी नवीन आकर्षणे निर्माण करत आहे हे त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उदाहरण देऊन सांगितले. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून अनावरण झाल्यानंतर एका वर्षातच सुमारे 2.7 दशलक्ष पर्यटक या स्थळाला भेट द्यायला आले असे पंतप्रधान म्हणाले. शाश्वत विकासाची उद्दिष्टे वेगाने गाठण्यासाठी भारताला पर्यटन क्षेत्राच्या समर्पिततेची जाणीव होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.  

“दहशतवाद फूट पाडतो पण पर्यटन एकत्र करतो”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. पर्यटनामध्ये समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्याची क्षमता आहे, असे ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या (युएनडब्ल्यूटीओ) भागीदारीत जी 20 पर्यटन डॅशबोर्ड विकसित केले जात आहेत. हे डॅशबोर्ड सर्वोत्तम पद्धती, तपशीलवार अभ्यास आणि प्रेरणादायी कथा एकत्र आणणारे या प्रकारातील पहिले व्यासपीठ असेल, असे मोदी म्हणाले. पर्यटनाच्या परिवर्तनीय शक्तीची जाणीव होण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांना विचारविमर्श आणि ‘गोवा रोडमॅपमुळे चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. "भारताच्या जी20 अध्यक्षतेचे ब्रीदवाक्य, 'वसुधैव कुटुंबकम्' - 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हे जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य होऊ शकते," असे ते पुढे म्हणाले.
 

पंतप्रधानांच्या संपूर्ण भाषणासाठी येथे क्लिक करा

मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना जी.किशन रेड्डी यांनी G20 सदस्य देशांचे पर्यटन मंत्री आणि प्रतिनिधी मंडळांचे प्रमुख,अतिथी देश  आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या  प्रतिनिधी मंडळाच्या प्रमुखांचे स्वागत केले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, G20 चे महत्त्व आणि जागतिक प्रशासनातील त्याची भूमिका आपण सर्वजण जाणतोच. प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांना G20 एकत्र आणते, असेही ते म्हणाले. जी. किशन रेड्डी पुढे म्हणाले की, सामुहिक प्रयत्नांद्वारे आपण पर्यटन क्षेत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करून, कोणीही मागे राहणार नाही हे सुनिश्चित करत  शाश्वत विकासाची उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने प्रगतीला चालना देऊ शकतो.

पर्यटन कार्यगटाच्या बैठकींना मिळालेल्या यशाचा विशेष उल्लेख करून, केंद्रीय मंत्री म्हणाले की, हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य, एमएसएमई पर्यटन आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट या 5 प्राधान्यक्रमांवर बैठकींमध्ये विस्तृत चर्चा झाली. यावेळी G20 सदस्य देशांनी या पाच प्राधान्य क्षेत्रांमधील आपापल्या योगदानावर भर देत माहितीपूर्ण सादरीकरण केल्याचे त्यांनी सांगितले.

जी 20 कृती गटाच्या दोन्ही फलनिष्पत्ती दस्तावेजाचे त्यांनी स्वागत केले. जीवनासाठी प्रवास या संकल्पनेबद्दल जी. किशन रेड्डी यांनी मतप्रदर्शन केले. गोवा आराखड्यामध्ये समाविष्ट केलेला "ट्रॅव्हल फॉर लाईफ हा पंतप्रधानांचा दूरदर्शी उपक्रम 'मिशन लाईफ (पर्यावरणासाठी जीवनशैली) वर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले.

हवामान बदलाच्या दुष्परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी कृती करावी, असे आवाहन या उपक्रमाद्वारे केले जाते. पर्यटकांना आणि पर्यटन व्यवसायिकांनी शाश्वत पद्धती अंगीकारून आपल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या जतनात योगदान द्यावे हे "ट्रॅव्हल फॉर लाईफचे उद्दिष्ट आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी गोवा रोडमॅपचे स्वागत केले. “शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गोवा रोडमॅप फॉर टुरिझमचे स्वागत करतो' आणि पर्यटन उद्योगात विकास, नावीन्यता आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारताच्या जी 20 अध्यक्षपदा अंतर्गत निश्चित केलेल्या 5 प्रमुख प्राधान्य क्षेत्रांच्या निर्णायक भूमिकेला पुष्टी देतो. ", असे ते म्हणाले.

शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीच्या अनुषंगाने जी 20 सदस्य देशांमधल्या सर्वोत्कृष्ट पद्धती आणि तपशीलवार अभ्यासाची माहिती देण्यासाठी जी 20 पर्यटन आणि शाश्वत विकास उद्दिष्टांचे ऑनलाईन डॅशबोर्ड तयार केले जाणार आहेत. त्यामुळे सर्व भागधारकांना उत्तम पद्धती आत्मसात करून मार्गक्रमणा करता येईल, असे त्यांनी सांगितले.

" पर्यटनाच्या सामर्थ्याचा उपयोग करून आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगले जग घडवू शकतो यावर माझा भर आहे ", असेही ते म्हणाले. तत्पूर्वी 'सार्वजनिक खाजगी संवाद: जी 20 अर्थव्यवस्थांसाठी प्रवास आणि पर्यटनाचे महत्त्व' या विषयावरील चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी मार्गदर्शन केले आणि वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युलिया सिम्पसन यावेळी उपस्थित होत्या.

पर्यटन हे सध्या सर्वाधिक वेगाने वाढणारे आर्थिक क्षेत्र म्हणून उदयास येत आहे, असे रेड्डी यावेळी म्हणाले. व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि सामाजिक समावेशकता या सारख्या अनेक सामाजिक आर्थिक फायद्यांसह पर्यटन हा रोजगारनिर्मितीचा प्रमुख स्रोत आहे, याची आपल्या सगळ्यांना जाणीव असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. बहुतांश इतर क्षेत्रांपेक्षा पर्यटन क्षेत्र महिला आणि युवकांना अधिक रोजगार पुरवते. त्याचप्रमाणे वंचित आणि असुरक्षित समाज घटकांसाठी उपजीविकेच्या संधी तयार करते, असे त्यांनी नमूद केले.

फक्त कोविड साथीच्या पूर्वीची स्थिती परत आणण्यासाठीच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन प्रगती करण्यासाठी पर्यटन क्षेत्राने खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी आकर्षित केले पाहिजे तसेच नवीन नवीन क्षेत्रे शोधून नवीन धोरणे तयार केली पाहिजेत, असे ते म्हणाले.

हरित पर्यटन, डिजिटलीकरण, कौशल्ये, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग आणि पर्यटन स्थळे या पर्यटन क्षेत्रातील पाच प्राधान्याच्या क्षेत्रात खाजगी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात खाजगी क्षेत्र पर्यटन विकासाचे नेतृत्व करेल तर सार्वजनिक क्षेत्र पर्यटनाला अधिक सक्षम करेल आणि सुविधा देणारे ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, " गुंतवणूकीबद्दलचे निर्णय आणि भविष्यातील विकासाच्या केंद्रस्थानी शाश्वतता आणि समावेशकता आहे हे समजायला एका चांगल्या सार्वजनिक खाजगी भागीदारीमुळे मदत होईल ".


***


N.Chitale/S.Bedekar/Radhika/Prajna/Rajshree/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934378) Visitor Counter : 128