विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 चे प्रक्षेपण येत्या जुलै महिन्यात करण्याचे नियोजन : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 14 JUN 2023 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2023

भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रयान 3 चे प्रक्षेपण येत्या जुलै महिन्याच्या उत्तरार्धांत नियोजित असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. ते आज नवी दिल्ली येथे आयोजित भव्य जनसभेच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, सर्व गोष्टी नियोजनानुसार घडल्या, तर इस्त्रो (ISRO), अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था चांद्रयान-3 चे प्रक्षेपण  करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाशयान उतरवण्यासाठीचे महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान प्रदर्शित करणे, हे या चे उद्दिष्ट आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 अवकाश यानाने आवश्यक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या असून, यामधून यानाची प्रक्षेपण आणि त्यानंतरच्या प्रवासादरम्यान कठोर वातावरणाचा सामना करण्याची क्षमता प्रमाणित केली गेली, असे ते म्हणाले.

चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चा पाठपुरावा करणारे अभियान असल्याचे नमूद करणे उचित ठरेल, असे ते म्हणाले. "चंद्राचे विज्ञान" या संकल्पनेनुसार, चांद्रयानाची चंद्रावर उतरण्याची प्रणाली (लँडर) आणि रोव्हरवरील वैज्ञानिक उपकरणे चंद्राचे पर्यावरण आणि जल-भौतिक गुणधर्मांसह चंद्राच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास सक्षम असतील. त्याच बरोबर, चांद्रयान-3 अभियानात समाविष्ट केलेले आणखी एक प्रायोगिक साधन पृथ्वीच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठीही  सक्षम असेल. ज्यामुळे ‘चंद्रावरून विज्ञान’ या संकल्पनेचीही प्रचिती येईल. 

त्यापूर्वी जनसभेला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षांत आणलेल्या विविध लोक-केंद्रित योजना या समाजातील यापूर्वीच्या  राजवटीत दुर्लक्षित राहिलेल्या  घटकांसाठी परिवर्तन तर घडवतीलच त्याचबरोबर या योजना दीर्घकाळात सामाजिक-आर्थिक परिवर्तन घडवून आणतील तसेच आपली सामाजिक संस्कृती आणि वर्तनात्मक परिवर्तन घडवतील. डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या रोजगार मेळा, स्टार्टअप इंडिया, मुद्रा योजना यासारख्या अनेक लोक-केंद्रित उपक्रमांमागे मोठी संवेदनशीलता आणि करुणा हा दृष्टीकोन असून, तरुणांना त्यांची क्षमता आणि परिश्रम याचे योग्य मोल मिळावे यासाठी समान संधींचे व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी आश्वस्त करण्याच्या  दृष्टीने आखण्यात आल्या आहेत.

महिलांच्या बाबतीत, उज्ज्वला आणि स्वच्छता (शौचालये) या योजनांनी भारतीय महिलांना, सन्मान आणि प्रतिष्ठेसह, सुविधा आणि सुरक्षा प्रदान केली आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

 

 N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1932438) Visitor Counter : 120