गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पश्चिम बंगालमधील भारतीय भूमी बंदरे प्राधिकरण तसेच सीमा सुरक्षा दलाशी संबंधित विविध विकास प्रकल्पांच्या कार्याचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली

Posted On: 09 MAY 2023 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पश्चिम बंगालमध्ये भारतीय भूमी बंदरे प्राधिकरण तसेच सीमा सुरक्षा दलाशी  संबंधित विविध विकास प्रकल्पांच्या कार्याचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसेच त्यांनी आयसीपी पेट्रापोल येथील मैत्रीद्वार या बीएसएफच्या नव्याने बांधलेल्या  चौक्या  तसेच इतर इमारतींचे दूरदृश्य प्रणालीद्वारे  उद्घाटन देखील केले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज भारतीय भूमी बंदरे प्राधिकरण तसेच बीएसएफच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन तसेच भूमी पूजन करण्यात आले. ते म्हणाले की भारतीय भूमी बंदरे प्राधिकरण एक संघटना म्हणून  केवळ भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यास मदत करते असे नाही तर ती भारताच्या मैत्री संदेशाचा दूत देखील आहे.   भारतीय भूमी बंदरे प्राधिकरण ही मोठी संस्था असून दक्षिण आशियायी देशांशी सामायिक असलेल्या 15 हजार किलोमीटर लांबीच्या भूसीमेच्या परिसरात ही संस्था आपले सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध पुढे नेण्यास मदत करते असे सांगून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले की दररोज 600 ते 700 पेक्षा जास्त ट्रक व्यापारासाठी पेट्रापोल येथे येतात, आणि त्यातून बहुतेकदा अतिगर्दीची समस्या देखील उद्भवते.मात्र, आता दुसऱ्या कॉर्गो गेटच्या उभारणीमुळे ही समस्या सुटेल.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की भारत-बांगलादेश यांच्यातील संबंध सामायिक संस्कृती, कला आणि जीवनाच्या परंपरा यांसारख्या मूल्यांवर आधारित आहेत. बांगलादेशच्या मुक्ती संग्रामातील सीमा सुरक्षा दलाचे योगदान सुवर्णाक्षरांनी नोंदलेले आहे आणि त्यातून आजपर्यंत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सौहार्दपूर्ण आणि स्नेहमय संबंध अधोरेखित झाले आहेत आणि यापुढे देखील या संबंधांना  नवी उर्जा आणि चैतन्य  मिळत राहील असे ते म्हणाले.

भारताच्या शेजारी देशांशी व्यवहार करताना भारतीय भूमी बंदरे प्राधिकरण  एखाद्या राजदूताप्रमाणे काम करून आगेकूच करत आहे अशा शब्दात  केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रशंसा केली.

ते म्हणाले की बीएसएफविना भारतीय भूमीच्या सीमांच्या सुरक्षिततेची कल्पनाच करू शकत नाही. जेव्हा बीएसएफचे जवान सीमेवर तैनात असतात तेव्हा देशाच्या भूमीवरील सीमांच्या सुरक्षिततेबद्दल कोणाला काळजी वाटत नाही असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922889) Visitor Counter : 107