गृह मंत्रालय

शांत आणि समृद्ध ईशान्य भारत उभारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या दरम्यान दीर्घकाळ प्रलंबित असलेला सीमा प्रश्न सोडविण्यासंदर्भातील ऐतिहासिक करारावर केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या



केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आज आपण सर्वजण ईशान्य प्रदेशातील एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत, आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील प्रलंबित सीमाप्रश्न आता सुटला आहे

Posted On: 20 APR 2023 9:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 एप्रिल 2023

शांत आणि समृद्ध ईशान्य भारत उभारण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या दरम्यान दीर्घकाळ प्रलंबित असलेला  सीमा प्रश्न सोडविण्यासंदर्भातील  ऐतिहासिक करारावर  केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.देशाच्या ईशान्य भागात संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने मोदी सरकारने केलेल्या महत्त्वपूर्ण उपाययोजनांचा भाग असलेल्या या महत्त्वाच्या करारावर आसाम तसेच अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय गृह सचिव तसेच केंद्र आणि दोन्ही राज्यसरकारचे वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री  आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की आज आपण सर्वजण ईशान्य प्रदेश आणि भारतासाठीच्या   एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो आहोत.आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील 700 किलोमीटर लांबीच्या सीमेबाबतचा अनेक दशकांपासून प्रलंबित प्रश्न  आता पूर्णपणे सोडविण्यात आला आहे.

आज झालेला करार  म्हणजे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले, विकसित, शांत आणि तंटामुक्त ईशान्य प्रदेशाचे स्वप्न साकार करण्याच्या मार्गातील  महत्त्वाचा टप्पा आहे,असे शाह यांनी सांगितले.

देशाच्या ईशान्य भागात हिंसकता संपवून शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्ष 2018 पासून ब्रू , एनएलएफटी, कार्बी अंग्लोंग, आदिवासी शांतता करारासह विविध करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत अशी माहिती शाह यांनी दिले.या करारांमुळे, संपूर्ण ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत 8000 हून अधिक सशस्त्र युवक हिंसेचा मार्ग सोडून देऊन मुख्य प्रवाहात सहभागी झाले आहेत,असे त्यांनी सांगितले. वर्ष 2014 च्या तुलनेत आता ईशान्य भागातील हिंसेच्या घटनांमध्ये 67%घट झाली आहे, सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांचे बळी जाण्याच्या प्रमाणात 60%घसरण झाली आहे आणि सामान्य  नागरिकांचे होणारे मृत्यू 83%नी कमी झाले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ही फार मोठी कामगिरी आहे.  मोदी सरकारने ईशान्य प्रदेशातील अनेक ठिकाणी लागू केलेला एएफएसपीए मागे घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण ईशान्य भागात आता सर्वांगीण विकास झालेला दिसतो आहे असे सांगून केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आता हा सगळा भाग विकासाच्या वाटेवर मार्गस्थ झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत 50 हून अधिक वेळा या भागाला भेट दिली आहे आणि त्यांनी नेहमीच ईशान्येच्या भाषा, संस्कृती, साहित्य, वेशभूषा आणि आहार यांना प्रोत्साहन दिले आहे असे  केंद्रीय मंत्री शाह म्हणाले.

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच या  सीमा प्रश्नावर तोडगा काढला जाणे अपेक्षित होते, ते काम स्वातंत्र्य मिळाल्यावर 75 वर्षांनी होत आहे अशी टिप्पणी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केली.

 

 S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1918419) Visitor Counter : 157