संरक्षण मंत्रालय

भारतीय तटरक्षक दलाची (ICGS) शौर्य आणि राजवीर ही जहाजे बांग्लादेशात तैनात

Posted On: 20 JAN 2023 4:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2023

भारत आणि बांग्लादेश तटरक्षक दलात(BCG) झालेल्या सामंजस्य कराराच्या (MOU) तरतुदींअंतर्गत परस्पर सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने, भारतीय तटरक्षक दलाची जहाजे (ICGS) ‘शौर्य’ आणि ‘राजवीर’ दिनांक 13 ते 19 जानेवारी, 2023 या कालावधीत बांग्लादेशच्या चट्टग्राम, इथे सहा दिवसांच्या भेटीस पाठविण्यात आली होती.

बांगलादेश तटरक्षक दलासोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने, ही भेट अत्यंत महत्वाची होती. गेल्या काही वर्षात, बांगलादेश तटरक्षक दलाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, या प्रदेशाची सुरक्षितता आणि सागरी सुरक्षा व स्वच्छता अबाधित राखण्यासाठी, ही भेट उपयुक्त ठरेल. या भेटीदरम्यान बीसीजी मधील विविध वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी झालेल्या फलदायी चर्चामुळे, मच्छिमार आणि नाविकांची  सुरक्षितता आणि संरक्षण करणे अधिक सहजसाध्य झाले आहे.

या भेटीदरम्यान, भारतीय तटरक्षक दलाच्या प्रदूषण प्रतिसाद पथकाने बांगलादेशमध्ये, 20 बीसीजी कर्मचार्‍यांसाठी प्रथमच पाच दिवसांचा आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचा 'प्रदूषण प्रतिसाद' याविषयावरील  प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केला होता.यावेळी बीसीजी कर्मचार्‍यांना आयसीजीएस  शौर्य आणि राजवीर या जहाजांवर पीआर(PR) उपकरणे चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले.

भेटीच्या शेवटी पर्यावरण संरक्षण तसेच शोध आणि बचाव क्षेत्रातील प्रमाणित कार्यान्वयन पद्धती (SOPs) प्रस्थापित करण्यासाठी बीसीजीच्या जहाजांसह समुद्रात एक संयुक्त सराव आयोजित करण्यात आला. यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींनी दाखवलेला उत्साह आणि रुची या प्रदेशातील संबंधित दोन्ही सरकारांच्या सागरी पर्यावरण संरक्षण उपक्रमांना नक्कीच चालना देईल.

 

 

R.Aghor/S.Patgaonkar/P.Malandkar

  सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1892478) Visitor Counter : 180


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu