कृषी मंत्रालय

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव, अतिरिक्त सचिव आणि फलोत्पादन आयुक्त यांनी महाराष्ट्रातील नाशिक मधील सहयाद्री शेतकरी उत्पादक कंपनी तसेच राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेला (एनएचआरडीएफ) भेट दिली

Posted On: 27 DEC 2022 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली/नाशिक, 27 डिसेंबर 2022

 

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज अहुजा, अतिरिक्त सचिव डॉ.अभिलक्ष लिखी आणि फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार यांनी आज महाराष्ट्रातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावात स्थित  सहयाद्री शेतकरी उत्पादक कंपनी तसेच नाशिक जिल्ह्यातील चितगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेला (एनएचआरडीएफ) भेट दिली आणि तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

   

केंद्र  सरकारने सुरु केलेल्या  12 समूह विकास कार्यक्रमांपैकी प्रायोगिक तत्वावरील कार्यक्रम अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहयाद्री शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्य शेतकऱ्याच्या द्राक्ष बागांना  भेट दिली आणि त्या शेतकऱ्याकडून दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी आवश्यक कृषी पद्धती आणि इतर महत्त्वाचे घटक याविषयी माहिती जाणून घेतली. आहुजा म्हणाले की, बियाण्यापासून ते उत्पादन तंत्रज्ञान व बाजारापर्यंत शेतकरी एकत्र येताहेत. ‘सह्याद्री‘च्या माध्यमातून असे पूर्ण मुल्यसाखळीचे मॉडेल उभे राहिले आहे. उत्तम दर्जाच्या द्राक्षांचे उत्पादन घेताना आलेले अनुभव त्या सदस्याने अधिकाऱ्यांना सांगितले आणि हवामानाच्या अनियमिततेमुळे उद्भवणाऱ्या समस्या देखील कथन केल्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन होते आणि महाराष्ट्रात नाशिक हा जिल्हा सर्वात मोठा द्राक्ष उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

   

आजच्या भेटीची मुख्य उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • भारतात, महाराष्ट्र राज्यातील आघाडीची शेतकरी उत्पादक कंपनी आणि द्राक्षांची सर्वात मोठी निर्यातदार असलेल्या सहयाद्री शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती जाणून घेणे.
  • समूह विशिष्ट हस्तक्षेपांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधणे.
  • देशांतर्गत आणि निर्यात बाजारातील स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी  एकात्मिक पद्धतीने  उत्पादन पूर्व घटक, उत्पादन, काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन तसेच मालवाहतूक, विपणन आणि ब्रँडीग या  फलोत्पादन मूल्यसाखळीतील समस्यांवर तोडगा शोधणे.

‘सह्याद्री’भेटीच्या पहिल्या सत्रात आहुजा यांनी शेतकरी गणेश कदम यांच्या शेतास भेट देत शेतीत वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतले. ‘सह्याद्री’ची अत्याधुनिक माती, पाणी, पानदेठ प्रयोगशाळा, कपडा उत्पादनाचा आरयू उद्योग, शेतकरी सुविधा केंद्र, आयात केलेल्या नव्या वाणांचे प्रक्षेत्र यांची पाहणी केली. सह्याद्रीच्या एफपीसी इन्क्युबेशन सेंटर मध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षणाची माहिती घेतली व प्रशिक्षणार्थी संचालकांचे अनुभव जाणून घेतले.

   

नंतर सर्व अधिकाऱ्यांनी, चितेगाव, नाशिक येथे कांदा आणि लसूण आणि एनएबीएल  मान्यताप्राप्त कीटकनाशक अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेला भेट दिली.  ‘सह्याद्री’च्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

केवळ शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान तयार करणारे तंत्रज्ञ, तरुण उद्योजक यांचेही जाळे उभे राहिले आहे ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. देशभरातील शेतीत या बाबींचा समावेश होणे आवश्‍यक आहे असे ते म्हणाले.

   

केवळ शेतीतील ताजे उत्पादन विक्री करण्यापर्यंतच न थांबता त्याचे मुल्यवर्धन करण्यावर सह्याद्रीने व त्यांच्याशी जोडलेल्या स्टार्ट कंपन्यांनी भर दिला आहे. ही काळाची गरज आहे. या सगळ्यांशी आपल्या राष्ट्रीय संशोधन केंद्र, आयसीएआर या सारख्या शासनाच्या संस्थाही जोडलेल्या आहेत. या परस्परांत तंत्रज्ञानाचे सामंजस्य करार होताहेत. हेच शेतीचे भवितव्य आहे. अशा काळात शेतकरी उत्पादक कंपन्या खूप महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असे ते म्हणाले

कृषी  सचिवांनी  कांद्याचे 14  आणि लसणाचे 18 वाण  दिल्याबद्दल एनएचआरडीएफच्या योगदानाचे कौतुक केले.

 

* * *

(Source: AIR Nashik) S.Kane/S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1886977) Visitor Counter : 316


Read this release in: English , Urdu , Hindi