पंतप्रधान कार्यालय

नागपूर रेल्वे स्थानकावरून पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

Posted On: 11 DEC 2022 10:54AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधानांनी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची पाहणी केली आणि स्थानकावरील सोयी सुविधांचा आढावा घेतला.  पंतप्रधान मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकोमोटिव्ह इंजिनच्या नियंत्रण केंद्राची पाहणी केली आणि नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांच्या विकास योजनांचा आढावाही घेतला.  या रेल्वे सेवेमुळे नागपूर ते बिलासपूर प्रवासाची वेळ 7-8 तासांवरून 5 तास 30 मिनिटे एवढी कमी होईल.

पंतप्रधान ट्विट मध्ये म्हणाले,

"नागपूर ते बिलासपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या ट्रेनमुळे कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या वाढेल.”

यावेळी पंतप्रधानांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उपस्थीत होते. 

पार्श्वभूमी

 ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल आणि प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल. नागपूर ते बिलासपूर प्रवासाची वेळ 5 तास 30 मिनिटे असेल. देशात दाखल होणारी ही सहावी वंदे भारत रेल्वे असेल आणि पूर्वीच्या तुलनेत ही प्रगत आवृत्ती आहे, ती खूपच हलकी आणि कमी कालावधीत जास्त वेगाने पोहोचण्यास सक्षम आहे. वंदे भारत 2.0 अधिक प्रगती आणि सुधारित वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे जसे की 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 52 सेकंदात आणि कमाल वेग 180 किलोमीटर प्रति तासापर्यंत असेल. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 392 टन असेल, जे आधी 430 टन होते. यात वाय-फाय कंटेंट ऑन-डिमांड सुविधाही असेल. प्रत्‍येक कोचमध्‍ये 32” स्‍क्रीन आहेत जे मागील आवृत्‍तीत 24'' होते. यामुळे प्रवाशांना माहिती आणि इंफोटेनमेंट आणखी सहजपणे उपलब्ध होतील. वंदे भारत एक्स्प्रेस पर्यावरणपूरकही असेल कारण  यातली वातानुकूल सेवा (एसी)ही १५ टक्के जास्त ऊर्जा कार्यक्षम असतील. ट्रॅक्शन मोटरच्या धूळ-मुक्त स्वच्छ हवा कूलिंगसह, प्रवास अधिक आरामदायक होईल. याआधी फक्त एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांना दिलेली साइड रिक्लायनर सीट सुविधा आता सर्व वर्गांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180-डिग्री फिरणाऱ्या आसनांचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट (RMPU) मध्ये फोटो-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली स्थापित केली आहे. चंदीगडच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIO) शिफारसीनुसार, ताजी हवा आणि परतीच्या हवेतून येणारी जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादीपासूनची मुक्त हवा फिल्टर आणि स्वच्छ करण्यासाठी ही प्रणाली आरएमपीयू (RMPU) च्या दोन्ही टोकांवर डिझाइन आणि स्थापित केली आहे.

वंदे भारत एक्सप्रेस 2.0 उत्कृष्ट आणि विमानासारखा प्रवास अनुभव देते. ती प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे ज्यात स्वदेशी विकसित रेल्वे टक्कर टाळण्याची कवच (KAVACH)प्रणाली समाविष्ट आहे.

****

Mahesh C/Vikash Y/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1882460) Visitor Counter : 209