कृषी मंत्रालय

केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांच्या हस्ते “कृषी निवेश पोर्टल”चे उद्घाटन


सरकारने महिला शेतकऱ्यांच्या सबलीकरणावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे: मेलिंडा गेट्स यांच्यासमवेतच्या बैठकीत केंद्रीय मंत्री तोमर यांचे प्रतिपादन

Posted On: 05 DEC 2022 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2022

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे बिल आणि मेलिंडा गेट्स फौंडेशन या संस्थेच्या सह-अध्यक्ष मेलिंडा गेट्स यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीत, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने तयार केलेल्या कृषीविषयक गुंतवणूकीसंदर्भातले  “कृषी निवेश  पोर्टल पोर्टल”चे तोमर यांनी उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारने महिला शेतकऱ्यांच्या कल्याणावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

देशातील कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने उभी आहेत आणि त्यांना तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सातत्याने प्रभावीपणे कार्य करत आहे असे ते म्हणाले. आपल्या देशात लहान शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचे बळ वाढवले तर कृषी क्षेत्राचे सामर्थ्य वाढेल आणि त्यातून कृषी उत्पादन देखील वाढेल असा सरकारचा विश्वास असल्यामुळे सरकार त्या दिशेने कार्य करत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री तोमर यांनी दिली. ते म्हणाले की कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीचे प्रमाण आणखी वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने  आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी दीड लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची तरतूद केली आहे. 1 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा निधीसह या संदर्भातील तरतुदींच्या अंमलबजावणीवर काम सुरु आहे. या तरतुदी लागू झाल्यानंतर भारतीय कृषी क्षेत्राला नवजीवन मिळेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री तोमर यांनी दिली.

तोमर म्हणाले की भारताच्या कृषी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत. त्यांची संख्या आणखी वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय देखील महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाची योजना राबवीत आहे. या योजनेत, केंद्रीय कृषी मंत्रालयाची भागीदारी आहे. “कृषी निवेश पोर्टल” अर्थात “कृषीविषयक गुंतवणूक पोर्टल” हे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संदर्भात महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की कृषी क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कृषी आणि तत्सम क्षेत्रांशी संबंधित विभागांनी राबवलेल्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे केंद्रीकृत एकल पोर्टल असेल. गुंतवणूकदारांसाठी हे फार सुलभ पोर्टल असेल आणि त्यांना याच्या वापरापासून मोठा लाभ मिळेल.

मेलिंडा गेट्स म्हणाल्या की कृषी मंत्रालयासह काम करणे त्यांच्यासाठी आनंदाचे आहे. त्यांच्या संस्थेच्या कार्यात महिला शेतकऱ्यांना अधिकाधिक प्रमाणात सामावून घेतल्या जाव्यात असे त्या म्हणाल्या.  त्यांची संस्था जगातील अनेक देशांमध्ये  कार्यरत असून भारतात त्यांना उत्तम अनुभव आला असे मेलिंडा यांनी सांगितले.

 

* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881057) Visitor Counter : 186


Read this release in: Tamil , Telugu , English , Urdu