गृह मंत्रालय

गुजरात शिक्षण संस्थेने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त, आज सरदार पटेल विद्यालय, नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे मुख्य अतिथी म्हणून संबोधन

Posted On: 31 OCT 2022 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2022

 

गुजरात शिक्षण संस्थेने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त, आज सरदार पटेल विद्यालय, नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मुख्य अतिथी म्हणून संबोधित केले.

सरदार वल्लभ भाई पटेल हे एक ‘कर्म योगी’ होते, ज्यांनी एकतेचा विचार सत्यात उतरविण्यासाठी कटिबद्धतेने काम केले,  असे याप्रसंगी अमित शाह म्हणाले.  सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, एकसंध भारताच्या निर्मितीसाठी आणि नव - भारताच्या पायाभरणीसाठी समर्पित केले होते. अनेक वर्षे सरदार पटेल यांचा वारसा पुसून टाकण्याचे प्रयत्न झाले, त्यामुळे त्यांचा भारतरत्न  देऊन सन्मान करायला, त्यांचे विचार लहान मुलांपर्यंत पोहोचावे म्हणून स्मारक आणि प्रेरणा केंद्र बांधण्यास अनेक वर्ष लागली. आपल्या कामातून सरदार पटेल अमर झाले आहेत, त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. सरदार साहेब हे द्रष्टे, सच्चे आणि जमिनीशी जोडलेले  व्यक्तीमत्व होते, असे शाह म्हणाले.

सगळ्या समस्या मुळातूनच सोडवण्यावर भर देण्याच्या कार्यपद्धतीवर त्यांचा भर असायचा, असे अमित शाह पुढे म्हणाले. सरदार पटेल यांनी देशात सहकार चळवळ पसरविण्याचे काम केले, फार कमी लोकांना हे माहित आहे, की सरदार पटेल यांनी अमूलचे बीज रोवले आणि त्रिभुवनदासजी यांनी सरदार पटेल यांचे विचार, मार्गदर्शन आणि प्रेरणेतून अमूलची स्थापना केली. ते म्हणाले की 1920 आणि 1930 दरम्यान देशभरात शेतकऱ्यांच्या पिळवणूकी विरुद्ध आवाज उठवला  जाऊ लागला आणि शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचे त्यांचे कौशल्य बघून महात्मा गांधीनी वल्लभभाई पटेलांना सरदार ही पदवी दिली.

सरदार पटेल नसते, तर आज भारताचा नकाशा जसा दिसतो, तसा दिसला नसता, असेही अमित शाह म्हणाले. स्वातंत्र्यानंतर, सरदार पटेल यांनी देशभरातील 500 पेक्षा जास्त संस्थाने आणि राजे- युवराज भारतात विलीन करण्यावर काम केले.

भारताची राज्यघटना तयार होत असताना सरदार पटेल यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी बाबासाहेब डॉ.  बी. आर. आंबेडकर यांना देण्यात यावी याचे सरदार पटेलांनी जोरदार समर्थन केले, असे अमित शाह म्हणाले.  

सरदार पटेलांनी आपल्या कल्पना अनेकदा घटना समिती समोर ठेवल्या जेणेकरून राज्यघटना समतोल असेल, असे अमित शाह यांनी सांगितले. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि राज्यघटनेचा गाभा समजून घेण्यासाठी लहान मुलांनी सरदार पटेल, के. एम. मुन्शी आणि डॉ बी आर आंबेडकर याच्यात झालेली राज्यघटनेवरची चर्चा वाचायला हवी, असे अमित शाह म्हणाले. सरदार पटेल यांच्यावरील लिखाण वाचून स्वातंत्र्याच्या शताब्दीवर्षापर्यंत भारताला जगातील अग्रगण्य आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

 

* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872473) Visitor Counter : 174